गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, October 24, 2023

हिंदी चित्रपटातील गझला...


     गझल (ग़ज़ल) हा अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द आहे.ज्याचा अर्थ 'प्रेयसीशी केलेला वार्तालाप' असा आहे.उर्दू आणि फारसी मधील कवितेच्या एका प्रकारास गझल म्हणतात. एका गझलेत कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त अकरा शेर असतात.सर्व शेर एकाच 'रदीफ़, आणि 'काफ़िया'त असतात.प्रत्येक शेरात स्वतंत्र भाव असून ते एक पूर्ण 'स्टेटमेंट' असते.गझलच्या पहिला शेराला 'मतला' व शेवटच्या शेराला 'मक्ता' म्हणतात.मक्त्यामध्ये शायर स्वतःचे नाव/उपनाव टाकतो.गझल संग्रहास 'दिवान' म्हणतात.

     गझल ही शृंगारपूरक असल्यामुळे काव्य रसिक आणि संगीत प्रेमींच्या व सुफींच्या आवडीची होती.काझी हमीदुद्दीन नागौरीचे कव्वाल महमूदने सुलतान शमसुद्दीन अल्तमश (१२१०-१२३५) याला गझल गाऊन खुश केल्याचा उल्लेख (मुसलमान और भारतीय संगीत) आहे.ग्यासुद्दीन बलबनच्या (१२६५-१२८७) मुलाने शेख बहाउद्दीन जकरियाचा मुलगा शेख कदवा याला निमंत्रित करून त्याच्याकडून अरबी गझला गाऊन घेतल्याचा उल्लेख पण आहे.कैकुबादच्या (१२८७-१२९०) काळात गल्लो-गल्ली गझल गायक उत्पन्न झाले होते.जलालुद्दीन खिलजीच्या काळात अमीर खुसरोने त्याच्या गझलातून सुंदर गायिका व सुंदर तरुणींच्या सौंदर्याचे वर्णन करीत होते.अल्लाउद्दीन खिलजीच्या (१२९६-१३१६) काळात महमूद,मुहम्मद आणि खुदादी हे गझल गायक प्रसिद्ध होते.कुतुबुद्दीन खिलजी (१३१६-१३२०),ग्यासुद्दीन तुगलक (१३२०-१३२५), आणि मुहम्मद तुगलक (१३२५-१३५१) या काळात गझल लोकप्रिय होती.फिरोज तुगलकच्या (१३५१-१३८८) काळात गझलेकडे सन्मानपूर्वक पहिल्या जात होते.

          बहमनी सुलतान मुहम्मद शाह प्रथम याच्या दरबारात खुसरोच्या गझला गाणारे तीनशे गायक होते.ई.स. १५३५ मध्ये बैजू ने हुमायूनला फारसी गझल गाऊन रिझविले होते.अकबराचा अंगरक्षक बैराम खान रामदास या गवैय्याच्या गझल गायन शैलीवर फिदा होता.बैजू व रामदास या शास्त्रीय गायकांचे गझल गायनावरही तेवढेच प्रभुत्व होते.जहांगीरने गझल गायक शौकीला 'आनंद खां' ही उपाधी दिली होती.

          तात्पर्य हे की आज सांगीतिक दृष्टीने गझलकडे तुच्छ रीतीने पहिल्या जात असेल,पण वास्तविक रुपात गझल गाणे एवढेही सरळ नाही.संगीताच्या जाणकार बादशहांनी आणि सुफींनी गझलेचा सदैव सन्मानच केला आहे.गझलांसाठी वापरले जाणारे सर्व छंद भारतीय छंद शास्त्रांतर्गत मान्यता प्राप्त आहेत.तसेच भारतीय रागांची शुद्धता राखून गाणारे गझल गायक विशिष्ट परंपरेत होत आले आहेत. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांचे सभा पंडित लक्ष्मीनारायण यांनी आपल्या 'संगीत सूर्योदय' या ग्रंथात 'कौल' (कव्वाली) आणि 'गझल'ची चर्चा केली आहे.'कौल'चा अर्थ कथन,कौल गाणार कव्वाल.आणि कव्वालांची गानशैली 'कव्वाली'.कव्वालांच्या गानशैलीत गायिल्या जाणाऱ्या गेय रूपातील गझला म्हणजे कव्वाली.कव्वालीमध्ये तान, पलटा, जमजमा,बोलबांट, सरगम सगळे काही असायचे.प्रसिद्ध ख्यालगायक उस्ताद तानरसखान चांगले कव्वाल होते.म्हणजेच गझल आणि कव्वालीचे आदर्श रूप नेहमीच सन्मानित राहिले आहे.ज्यांची नक्कल हस्सू खान आणि हद्दू खान यांनी केली, ते प्रसिद्ध उस्ताद बडे मुहम्मद खान 'कव्वाल बच्चे' होते. म्हणजेच ग्वाल्हेरची ख्याल गायकी कव्वाल बच्चांच्या गायनाने प्रभावित होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.तरी पण जितका प्राचीन इतिहास शास्त्रीय संगीताच्या विविध शैलींचा आहे तितका गझलचा नाही.स्वातंत्र्य मिळण्या अगोदर गझल लोकप्रिय झाली होती.बराच काळ रसिकांच्या मनोरंजनासाठी कोठयांवर तवायफ गझला गात होत्या.असे जरी असले तरी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कालखंडात मोठ मोठे गायक गझला गात असल्यामुळे जो मान त्यांना मिळायचा तो मान पुनः मिळावा म्हणून 

आज भारतीय (शास्त्रीय) संगीतकारांनी गझल गायनावर पुनः गंभीर चिंतन करणे आवश्यक आहे,असे मला वाटते. 

      हा झाला गझलचा प्राचीन इतिहास.उर्दू गझल गायकीचा आधुनिक शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातून गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांनी केली.

उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...


१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले..

              जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.

       भारतीय चित्रपट संगीताच्या सुरवातीच्या काळापासून तर एकोणविसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत चित्रपटांच्या गाण्यात गझलांची भरमार दिसते.अगदी सुरवातीच्या काळात तर बहुतेक चित्रपटांची पटकथा उर्दूमधेच लिहिल्या गेलेली दिसते.१९५० ते १९८० पर्यंत अतिशय सुंदर गझला चित्रपटांनी दिल्या.नंतरही येत राहिल्या पण एकट-दुकट. त्यातही काही गझला एकदम सुगम संगीताप्रमाणे स्वरसाज चढवून आल्यामुळे अपल्याला ते चित्रपटातील गीत वाटले.जसे:-'संसार से भागे फिरते हो' (चित्रलेखा),'ये हवा ये रात ये चांदनी' (संगदिल),'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' (हम दोनो) वगैरे वगैरे...आणि या उलट काही गीते गझलच्या अंगाने स्वरबद्ध झाल्यामुळे त्या गझला वाटतात.उदा:- 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' (चित्रपट-गझल),'गुजरे हैं आज इश्क में हम उस मकाम से' (दिल दिया दर्द लिया).

     चित्रपटांच्या निर्मितीचा वेग वाढल्यावर चित्रपटतील संगीत निर्मितीचाही जोर वाढला.त्यात पारंपरिक शास्त्रीय व सुगम संगीत (उप शास्त्रीय) शैलींचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग सुरू झाले.त्यात गझल शैलीची परंपरा प्रकर्षाने दिसून येते.सुरवातीच्या काळात हलक्या फुलक्या स्वरूपात गझला समोर आल्या.कुंदनलाल सहगल, तलत महमूद,मोहम्मद रफी यांच्या सारख्या अनेक गायकांद्वारा चित्रपटात गायिलेल्या गझला लोकप्रिय झाल्या.सांगीतिक दृष्टीने सुद्धा ह्या श्रीमंत रचना होत्या.चित्रपट गीतांमुळे संगीत घरोघरी पोहोचले व लोकप्रिय झाले हे मान्य करावेच लागेल. खोलात जाऊन विचार केला तर शास्त्रीय संगीतापेक्षा चित्रपट गीते व गझल आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे असे दिसते.याला अनेक घटक कारणीभूत आहेत.ठुमरी-दादऱ्याप्रमाणे व एक रागात गझल गाणे असे न राहता गझलच्या अर्थानुसार,स्वभावानुसार बंदिश तयार करणे, विवादी स्वरांनी सजवणे, विविध रागांचे मिश्रण करणे,तसेच काही विशिष्ठ शब्दांना वेगवेगळ्या सुरावटींनी सजवणे,ताल आणि आलापांचा योग्य स्थानावर योग्य प्रयोग अशा विविध बाबींमुळे गझल गायन अधिक प्रगल्भ होत गेले.सध्या तर ऑर्केस्ट्रेशन,ध्वनिमुद्रण याकडे विशेष करून बारकाईने पाहून वेगवेगळे प्रयोग केल्या जात आहे.

● चित्रपटातील गझला...

'हमें तो शाम-ए-ग़म में काटनी है ज़िंदगी' नूरजहां. चित्रपट-जुगनू.(१९४७)

'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज़.(१९४९)

'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल' तलत महमूद.चित्रपट-आरज़ू . (१९५०)

'दुनिया बदल गयी' शमशाद बेग़म.चित्रपट-बाबुल.(१९५०)

'हम दर्द के मारों का इतना ही फ़साना है' तलत महमूद.चित्रपट-दाग़.(१९५२)

'दिल में छुपाके प्यार का तुफान ले चले' रफी.चित्रपट-आन.(१९५२)

'ये हवा ये रात ये चांदनी तेरी इक अदा पे निसार है' तलत महमूद.चित्रपट-संगदिल.(१९५२)

'हैं सब से मधुर वो गीत' तलत महमूद.चित्रपट-पतिता.(१९५३)

'बहारें हम को ढुंढेंगी न जाने हम कहा होंगे' लता.चित्रपट-बाग़ी.(१९५३)

'इश्क़ मुझको नहीं वहशत ही सही' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब..(१९५४)

'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'दिले नादां तुझे हुवा क्या है' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'नुक्ता ची है ग़मे दिल' सुरैय्या.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम' रफी.चित्रपट-प्यासा.(१९५७)

'जाना था हमसे दूर बहाने बना लिए' लता.चित्रपट-अदालत.(१९५८)

तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा' रफी.चित्रपट-आखरी दाव.(१९५८)

'युं हसरतों के दाग़' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)

'उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)

'ना हंसो हम पे ज़माने के है ठुकराए हूए' चित्रपट-गेट वे ऑफ इंडिया.

'चौदवी का चांद हो या आफ़ताब हो' रफी.चित्रपट-चौदवी का चांद.(१९६०)

'बेकसी हद से जब गुज़र जाये' आशा भोसले.चित्रपट-कल्पना.(१९६०)

'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.(१९६१)

'कभी खुद पे कभी हालात पे रोना आया' रफी.चित्रपट-हम दोनो.(१९६१)

''तेरी ज़ुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी' रफी.जब प्यार किसी से होता है.(१९६१)

'दिल ग़म से जल रहा है जले पर धुआं न हो' सुमन कल्याणपूर.चित्रपट-शमा.(१९६१)

'है इसी में प्यार की आबरु' लता.चित्रपट-अनपढ.(१९६२)

'मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया' रफी.चित्रपट-जब प्यार किसी से होता है.(१९६२)

'अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शबाब की' रफी.चित्रपट-आरती.(१९६२)

'ज़िंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया.(१९६२)

'जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं' लता.

चित्रपट-ताजमहल.(१९६३)

'जरा सुन हसीना ओ नाज़नी' रफी.चित्रपट-कौन अपना कौन पराया.(१९६३)

'ज़ुल्फ की छांव में चेहरे का उजाला लेकर' आशा,रफी. चित्रपट-फिर वो ही दिल लाया हूँ.(१९६३)

'हाले दिल यूं उन्हे सुनाया गया' लता.चित्रपट-जहांआरा.(१९६४)

'वो चुप रहे तो दिल के दाग़ जलते है' लता. जहांआरा.(१९६४)

'इश्क़ की गर्मी-ए-जज़बात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'दिल खुश है आज ऊनसे मुलाकात हो गयी' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'मुझे ये फुल ना दे तुझे दिलबरी की कसम' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'अदा क़ातिल नज़र बर्क़-ए-बला' आशा भोसले.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'नग़्मा ओ शेर की सौग़ात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'संसार से भागे फिरते हो' लता.चित्रपट-चित्रलेखा.(१९६४)

'मुझे दर्दे दिल का पता न था' रफी.चित्रपट-आकाशदीप.(१९६५)

'ये ज़ुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा' रफी.चित्रपट-काजल.(१९६५)

'छलके तेरी आंखों से शराब और जियादा' रफी.चित्रपट-आरज़ू.(१९६५)

'बहारों मेरा जीवन भी संवारों' लता.चित्रपट-आखरी खत.(१९६६)

 'न किसी की आंख का नूर हूँ' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)

 'लगता नहीं है दिल मेरा' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)

'भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जायें' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)

'नसीब में जीसके जो लिखा था' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' रफी. चित्रपट-दिल दिया दर्द लिया.(१९६६)

गुज़रे हैं आज इश्क़ में हम उस मक़ाम से' रफी.दिल दिया दर्द लिया.(१९६६)

'रहते थे कभी जिनके दिल में' लता.चित्रपट-ममता.(१९६६)

'दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब देंगे' लता.चित्रपट-बहू बेगम.(१९६७)

'मेरी ज़िंदगी के चिराग़ को तेरी बेरुख़ी ने बुझा दिया' लता. चित्रपट-जाल.(१९६७)

'मिले न फूल तो कांटों से दोस्ती कर ली' रफी.चित्रपट-अनोखी रात.(१९६८)

'हर तरफ के जज़बात का एलान है आंखें' रफी.चित्रपट-आंखें.(१९६८)

'वो ज़िंदगी जो थी अब तक तेरी पनाहों में' आशा भोसले.चित्रपट-नील कमल.(१९६८)

'मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी' लता.चित्रपट-आंखें.(१९६८)

'आज सोचा ती आंसू भर आये' लता.चित्रपट-हंसते ज़ख़्म.(१९७०)

'हम है मता-ए-कूचा ओ बाज़ार की तरह' लता.चित्रपट-दस्तक.(१९७०)

उनके ख़याल आये तो आते चले गए' रफी.चित्रपट-लाल पत्थर.(१९७१)

'चलते चलते युं ही कोई मिल गया था' लता.चित्रपट-पाकिज़ा.(१९७२)

'रस्मे उल्फ़त को निभाए तो निभाए कैसे' लता.चित्रपट-दिल की राहें.(१९७३)

'अपनी खुशी से अपना ही दिल तोडना पडा' लता. चित्रपट-कुंवारा बदन.(१९७३)

'हाल क्या है दिलों का न पूछो सनम' किशोर कुमार. चित्रपट-अनोखी अदा.(१९७३)

'संसार की हर शै का इतना ही फ़साना है' महेंद्र कपूर.चित्रपट-धुंद.(१९७३)

'देखा है ज़िंदगी को कुछ इतने करीब से' किशोर कुमार.चित्रपट-एक महल हो सपनो का.(१९७५)

'रुके रुके से क़दम रुक के बार बार चले' लता.चित्रपट-मौसम.(१९७६)

'दूर रहकर न करो बात क़रीब आ जाओ' रफी.चित्रपट-अमानत.(१९७७)

'आंखों में दिल गया अपना' आनंद कुमार.चित्रपट-सांच को आंच नहीं.(१९७९)

'ज़िंदगी में जब तुम्हारे ग़म नहीं थे' अनुराधा पौडवाल, भुपेंद्र सिंग.चित्रपट-दूरीयां.(१९७९)

'पत्थर से शीशा टकरा के' आनंद कुमार.चित्रपट-सावन को आने दो.(१९७९)

'सरकती जाये है नक़ाब आहिस्ता आहिस्ता' लता,किशोर कुमार. चित्रपट-दीदार-ए-यार.(१९८०)

'ज़िंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'माना तेरी नजर में तेरा प्यार हम नहीं' सुलक्षणा पंडित.चित्रपट-आहिस्ता आहिस्ता.(१९८१)

'दिल चीज़ क्या है आप मेरी जान लिजीए' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है' गुलाम अली.चित्रपट-निकाह.(१९८२)

'दिखाई दिये यूं के बेख़ुद किया' लता.चित्रपट-बाजार.(१९८२)

'दिल के अरमां आंसुओं में बह गए' सलमा आगा..चित्रपट-निकाह.(१९८२)

'तुमको देखा तो ये ख़याल आया' जगजीत सिंग.चित्रपट-साथ साथ.(१९८२)

'तू नहीं तो ज़िंदगी में और क्या रह जायेगा' जगजीत,चित्रा. चित्रपट-अर्थ.(१९८२)

'झुकी झुकी सी नज़र बेक़रार है के नहीं' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८२)

'दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है' लता.चित्रपट-आखिर क्यों.(१९८५)

'किसी नज़र को तेरा इंतजार आज भी है' आशा भोसले,भुपेंद्र सिंग.चित्रपट-ऐतबार.(१९८५)

'तेरे प्यार की तमन्ना, ग़म-ए-जिंदगी के साये' महेंद्र कपूर.चित्रपट-तवायफ.(१९८५)

'तुम्हारी नज़रों में हमने देखा अजब सी चाहत झलक रही है' आशा भोसले,कुमार शानू. चित्रपट-कल की आवाज.(१९९२)

'किसी ने भी तो ना देखा निगाह भर के मुझे' पंकज उधास.चित्रपट-दिल आशना है.(१९९२)

'होश वालों को खबर क्या' जगजीत सिंग.चित्रपट-सरफ़रोश.(१९९९)

-सुधाकर कदम

गझलकार ब्लॉगवरील 'सीमोल्लंघन' विशेषांकामधून साभार...

https://gazalakar23.blogspot.com/?m=0&fbclid=IwAR3JsO3WsFyOddiinFPUWA7V2WWnWmJeVNs0FFR4Eg3_C5oA_Pqr9i7gA9Y





संगीत आणि साहित्य :