गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 14, 2023

राग-रंग (लेखांक २८) जैजवंती.

     खमाज थाटोत्पन्न जैजवंती राग नावाप्रमाणेच अतिशय गोड,  चित्ताकर्षक व मर्मस्पर्शी आहे.कुणी याला जैजैवंती तर कुणी जयजयवंतीअसेही म्हणतात. थोडा कठीण असल्यामुळे फार कमी गायक हा राग गाताना दिसतात.याला संपूर्ण-संपूर्ण जातीचा वक्र राग असे म्हटले तरी हरकत नाही.यात अल्हैया,छाया आणि देस अंग एकमेकांत मिसळलेले दिसून येतात.अनेक गायक याला बागेश्री अंगाने पण गाताना दिसतात.परंतू देस अंगाचे (रेमपनिसां) रूप जास्ती प्रचलित आहे.या रागाचा विस्तार तीनही सप्तकात मुक्तपणे केल्या जातो.याचा गायन वादन समय रात्रीचा दुसरा प्रहर असून.वादी स्वर रिषभ व संवादी स्वर पंचम आहे.यात दोन्ही गांधार व दोन्ही निषाद स्वरांचा प्रयोग केल्या जातो.हा गारा नावाच्या रागाला जवळचा आहे.

     गुरु ग्रंथ साहेबानुसार हा राग बिलावल व सोरठ या दोन रागांमिळून बनला आहे.हा राग गुरुबानी नंतरच्या खंडात दिसून येतो.या रागात शिखांचे नववे गुरू तेगबहाद्दूर द्वारा फक्त चार भजनांची रचना केल्या गेली आहे.या भजनांना त्यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी गुरू गोविंद साहेब सिंग यांनी १७०५ मध्ये यात जोडले होते.या रागाचा उल्लेख भारतीय शास्त्रीय संगीताच्या कुठल्याच ग्रंथात केलेला नसल्याचा उल्लेख केला आहे. रागमालामध्ये हा राग मिळत नाही. परंतु १४ व्या शताब्दीच्या सुरवातीला याला 'जावंता' नावाने ओळखल्या जात होते. सध्या खमाज थाटातील एक महत्वपूर्ण राग म्हणून याला मान्यता आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार जैजैवंती (ਜੈਜਾਵੰਤੀ) राग साधन साध्य झाल्याचा आनंद व तृप्तीची भावना व्यक्त करतो.सोबतच काही तरी गमावल्याचे दुःखही व्यक्त करतो.आनंद आणि दुःख  ह्या दोन्ही भावनांचा अतिरेक होऊ देत नाही.


     उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद फतेह अली खान, पं. भीमसेन जोशी, पं. कृष्णराव, पं. जसराज, पं. राजन साजन मिश्र, पं. विनायकराव पटवर्धन, पं. जगदीश प्रसाद, पं.व्यंकटेश कुमार गुरव,पं. अजय चक्रवर्ती, पं. दिनकर कैकिणी,पं.अजय पोहनकर, उस्ताद राशीद खान, पं.उल्हास कशाळकर, शुभदा मराठे,फरीद हसन, उस्ताद शराफत हुसेन खान, कौशिकी चक्रवर्ती, डॉ.निवेदिता कौर, जयश्री पाटणकर, पं. विजय कोपरकर, पं. विजय देशमुख व इतर वादकांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

        मी शिकत असताना 'मोरे मंदर अब क्यों नहीं आये' ही चीज शिकविल्या गेली.पुन्हा तेच, काव्याचा भावार्थ न कळता फक्त रागरूप कळणे! मला जैजवंती राग खऱ्या अर्थाने आवडला तो पंडित जसराजजींची 'चंद्रवदन राधिका' ही झपलातील चीज ऐकल्यानंतर.व्यक्तिमत्व दरबारी होतेच पण त्यांची गाण्याची पद्धतही अतिशय आकर्षक होती.पुढे सुरेश भटांसोबत मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करताना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९८२ मध्ये आयोजित केलेल्या 'अशी गावी मराठी गझल' या फक्त मराठी गझल गायकीच्या,महाराष्ट्रातील तीन तासाच्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात सुरेश भटांचीच 

'दिशा गातात गीते श्रावणाची

कुणाला याद तान्हेल्या तृणाची

ही जैजवंती रागात स्वरबद्ध केली गझल गायिलो होतो.यातील 'तान्हेल्या' या शब्दाकरिता मी जैजवंती रागात नसलेल्या कोमल धैवताचा प्रयोग करून प्रचंड दाद घेतली होती.त्याबद्दल पुण्याच्या केसरी या दैनिकाने दि.२५/७/१९८२ च्या अंकात याबद्दल "या बंदिशीतील कोमल धैवताचा रागबाह्य प्रयोग (तिरोभाव) लक्षणीय वाटला. विशेषतः 'तान्हेल्या' शब्दाच्या स्वरा-सहीत उच्चारणात तो मनावर ठसला." असा उल्लेख केला होता.गझल गायकीमध्ये असा एखाद्या शब्दाचा अर्थ अधिक सक्षमपणे रसिकांपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयोग केला तर तो आवडतोच.हा माझा गझल गायक व संगीतकार म्हणून इतक्या वर्षाचा अनुभव आहे.असो!

या रागात खूप कमी गाणी आहेत.पण जी आहेत ती अगदी अफलातून...

● हिंदी चित्रपट गीते...

'हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे' लता. चित्रपट-बागी, संगीत-मदन मोहन (१९५३).           

'मनमोहना बडे झुठे' लता. चित्रपट-सीमा, संगीत-शंकर जयकिशन (१९५५). 

'बैरन हो गई रैन' मन्ना डे. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७). 

'मौसम सुहाना दिल है दिवाना' लता. चित्रपट-सुवर्ण सुंदरी, संगीत-आदि नारायण राव (१९५७). 

'जाईए हम से खफा हो जाईए' लता. चित्रपट-चालबाज, संगीत-मदन मोहन (यात चारुकेशी पण दिसतो.) १९५८. 

'दिल का दिया जलाया' नूर जहां. चित्रपट-कोयल, संगीत-खुर्शीद अन्वर (१९५९). 

'ये दिल की लगी कम क्या होगी' लता. चित्रपट-मुगले आझम, संगीत- नौशाद (१९६०). 

'जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया, संगीत-नौशाद (१९६२)

'वो जो मिलते थे कभी हम से दिवानो की तरह' चित्रपट-अकेली मत जइयो, संगीत-मदन मोहन (१९६३). या गाण्यात तीव्र माध्यमाचा सुंदर प्रयोग केल्या गेला आहे.

'बालमवा बोलो ना बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत-एस.मोहिंदर (१९६६). 

'सुनी सुनी साज की सतार पर' किशोर कुमार. चित्रपट-लाल पत्थर, संगीत शंकर जयकिशन (१९७१). 

'मोरे नैना बहाये नीर' लता. चित्रपट-बावर्ची, संगीत-मदन मोहन (१९७२). 

'मैं राधा तू शाम' शंकर एहसान लॉय, कमल हसन, शंकर महादेवन. चित्रपट-विश्वरूप, संगीत एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा. 

गांधीजींचे आवडते भजन 'रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम' जैजवंती रागावर आधारित आहे.

दक्षिण भारतातील अनेक चित्रपटात जैजवंतीचा मुक्तहस्ताने वापर केला आहे.

● नॉन फिल्मी...

'दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला' -गुलाम अली.


 

पुरस्कार...



     आयुष्यात आपली वाहव्वा व्हावी, सत्कार व्हावा, एखादा तरी शासकीय पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते.नुसतेच वाटत नसते तर प्रत्येकजण या सुखाकरीता आसुसलेला असतो.परंतू काही खास लोकच पात्र ठरतात, त्याला आपण काय करू शकतो ?
     खरे म्हणजे शासकीय पुरस्कारासाठी पात्र होणे ही एक फार मोठी कला आहे.ती साऱ्यांनाच जमते असे नाही.ज्याला जमली त्याला जमली.येऱ्या गबाळ्याचे ते काम नोहे.आमचा एक साहित्यिक मित्र हा खेळ करण्यात पटाईत होता.(पण....अती पटाईत असल्यामुळे कुठेच काही जमले नाही.) कोणत्या तरी मंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळून सन्मानित व्हावे यासाठी निळ्या टोपीचा आश्रय घेऊन  काँग्रेसशी अंग-संग सुरू केला.दलितोद्धारक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी नको नको ती सोंगे केली.पण दलित काही फसले नाही.व काँग्रेसवाल्यांनीही धतुरा दाखवला.तरी पण काँग्रेसचे शासन असेपर्यंत त्याचे लांगुलचालन सुरूच होते.पुढे काँग्रेसचे शासन जाऊन युतीचे सरकार आले.आमच्या या मित्राने लगेच कोलांटउडी घेऊन भगवी पताका खांद्यावर घेतली.व सेना भवनाच्या वाऱ्या करून 'कीर्तन' करणेही सुरू केले.इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्ष किती वाईट होता यावर साहित्य निर्मितीही सुरू केली.हे सगळे कशाकरीता तर मान-सन्मान, अध्यक्षपद, सत्कार,पुरस्कार या 'आत्मिक' सुखाकरीता. पण भगवे सरकारही याला पूर्णपणे ओळखून असल्याने त्याची कुठेच वर्णी लागली नाही.थोड्याच दिवसात हा 'वार'करी भगवी पताका उतरवून संयुक्त मोर्चाची पंचरंगी पताका खांद्यावर घेऊन फिरायला लागला...तर मंडळी शासकीय पुरस्काराची लालसा माणसाला किती लाचार बनविते हे आपल्या लक्षात आलेच असेल!
     आदर्श संगीत शिक्षकाचा राज्य/राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असे आम्हासही वाटत होते.पण त्याकरीता करावे लागणारे लांगुलचालन न जमल्यामुळे जिल्हा समितीने निवड केल्यावरही आम्हाला टाळण्यात आले.खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळले की,आर्णीत शिवजयंती उत्सव सुरू केल्यामुळे लागलेल्या कलमांमुळे पुरस्कारापासून वंचित करण्यात आले.
आपल्याच महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती साजरी केल्यामुळे आपल्यावरच कलमा लागतात व न्यायालयाचे खेटेही घ्यावे लागतात हे कळले.तसेच साध्यासुध्या किरकोळ कलमा लागल्यामुळे आपल्या देशात पुरस्कारापासून वंचित केल्या जावू शकते,पण ३०२,४२० वगैरे पर्यंतच्या कलमा लागलेली व्यक्ती मात्र आमदार, खासदार,मंत्री होऊ शकते. हे पाहून आम्हाला आमच्या शिक्षकी पेशाची लाज वाटायला लागली.व आपण शिवजयंतीसारखे समाजविघातक काम करण्यापेक्षा खून,मारामाऱ्या,बलात्कार,जाळपोळ वगैरेंसारखी 'राष्ट्रीय' कार्ये केली नाही याचे वैषम्य वाटायला लागले.या सगळ्या अनुभवामुळे पुरस्कार मिळविणे ही सुद्धा एक कला आहे हे आम्हाला पटायला लागले.ज्याने काहीही न करता फक्त 'कलाबाजी' केली तो जिंकला.व जो नुसतेच 'कार्य' करत राहिला तो हरला.
      शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठी समोरची व्यक्ती आदर्शच असली पाहिजे असे काही नाही.ती फक्त मालदार व 'दर्शनीय' असली तरी चालते.एक तर त्या व्यक्तीला चांगले राजकीय वजन हवे.किंवा राजकीय वजन पेलण्याची क्षमता तरी हवी.तसेच लाळघोटेपणा हा दुसरा गुणही त्याच्या रोमारोमात भिनलेला असायला हवा.हे दुसरे 'क्वालिफिकेशन' यात अतिशय महत्वाचे असते.अर्थात योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळतच नाही,असेही नाही.कधी-मधी, चुकून-माकून अनेक योग्य व्यक्तींनाही पुरस्कृत केल्याचे दिसून येते.पण अशी उदाहरणे कमीच!
     पुरस्कार मिळल्यावरही कधी कधी काय गंमत घडते बघा! १९९६ मध्ये आर्णीतील (यवतमाळ) माझ्या सर्वंकष कार्याबद्दल तसेच संगीत व मराठी गझल गायन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा कै. मोतीलालजी बंग हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा  पुरस्कार (मानपत्र व ५००० रुपये रोख) माझ्या नावे जाहीर झाला.पुरस्कार वितरणाचा नयनरम्य सोहळा आर्णीतच झाल्यामुळे पाहुणा व यजमान अशी दुहेरी भूमिका वाटयाला आली. सरस्वती स्तवन,स्वागतगीत आम्हीच सादर केले.व थोड्याच वेळात पुरस्कार घ्यायलाही पुढे आलो.त्यामुळे आपल्या लग्नात आपणच बँड वाजवण्याचा आनंद काय असतो तो आम्हाला उपभोगायला मिळाला.
      पुरस्कारामुळे व्यक्तीचे मोठेपण वाढते की, व्यक्तीमुळे पुरस्काराला मोठेपणा येतो हे अजूनपर्यंत आम्हाला कळले नाही.कारण काही सामान्य व्यक्ती पुरस्कारामुळे मोठ्या झाल्याचे तर काही पुरस्कार व्यक्तींमुळे मोठे झाल्याचे आम्ही पाहिले आहे.थोर समाजसेवकाला दंगली घडवतांना पाहून, आदर्श शिक्षकाला मद्यपान करून गटारात लोळताना पाहून, गुणवंत कामगाराचे अवगुण पाहून, समजगौरवाचा 'माज' पाहून, देशबंधूंच्या देशविघातक कारवाया पाहून, हरिभक्तपरायणाची स्त्री भक्ती पाहून, वनमित्राची आरामशिन पाहून, पर्यावरणवाद्याचा (वृक्षमित्र) लाकडाचा धंदा पाहून, सर्वोदयवाद्याच्या अनेक खाजगी संस्था व जमवलेली माया पाहून, वेदशास्त्रसंपन्नाचे बायाबापड्यांना नादी लावणे पाहून, व्यसनमुक्तीवाल्याचे दारूकाम पाहून उपाध्या व पुरस्कार किती तकलादू असतात ते कळले.तरी पण त्याची ओढ मात्र कमी होत नाही.

-सुधाकर कदम


 





संगीत आणि साहित्य :