सुलभाचे आणि माझे प्रेम प्रकरण यवतमाळात चर्चेचा विषय व्हायला लागला होता.मी कुणबी (पाटील) व सुलभा ब्राह्मण.त्यातही तिवसा (यवतमाळ) येथील प्रसिद्ध जमीनदार स्व.मुकुंदराव सुभेदाराची भाची. ( नुकतेच निधन झालेले शेतीतज्ज्ञ आनंदराव सुभेदार यांची सख्खी मामेबहीण.) त्यामुळे दोन्हीकडून प्रचंड विरोध झाला.पण आम्ही दोघे आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे सुरवातीला असलेला विरोध दोन्ही घरातून चर्चेने सोडवला गेला व लग्न करायचे ठरले.लग्नाची तारीख काढण्यासाठी माझे सासरे स्व.दत्तात्रय चांदेकर हे यवतमाळात प्रसिद्ध असलेल्या एका 'शास्त्री'कडे गेले.शास्त्रीने तारीख तर काढलीच नाही, पण 'तुमच्या मुलीची काही भानगड असल्यामुळे लग्नाची घाई करता काय?' असा उलट प्रश्न करून डिवचले.सासरेबुवा जितके प्रेमळ तितकेच रागीटही होते.त्यांनी शास्त्रीबुवाला 'तसे काही नाही,पण शंकाच असेल तर एक वर्ष लग्न करणार नाही.आणि आता लग्न तिथीवर न लावता नोंदणी पद्धतीने करीन.पण तुमच्याकडे येणार नाही'.असे सणकावून तेथून निघून आले.अशा प्रकारे आमचे लग्न एक वर्ष पुढे ढकलल्या गेले.(याच शास्त्रीबुवांनी पुढे आपल्या शिष्येशीच काहीतरी गडबड केल्याची चर्चा अख्ख्या यवतमाळात होती.त्याची परिणती मूल होण्यात झाल्याचेही बोलले जात होते.असो!)
गावात,नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायला लागल्या म्हणून कुठे तरी काम करून चार पैसे कमावणे आवश्यक होते.त्याशिवाय लग्न करणे शक्य नव्हते.कल्याणला शंकर बडेचे जावई रहायचे.त्यांना आम्ही दाजी म्हणत असू.शंकरला नट व्हायचे होते व मला संगीतकार. त्यासाठी अधून मधून मुंबई वारी करत असू.असेच एका उन्हाळ्यात दाजीकडे जाऊन मुंबईत दूरदर्शन,एच एम व्ही,संगीतकार,नाटककार यांचे उंबरठे झिजवत असताना दाजीकडे माझ्या वडिलांचे पत्र आले.त्यात आर्णीतील महंत दत्तराम भारती विद्यालकडून संगीत शिक्षकाच्या जागेसाठीच्या मुलाखतीचे पत्र आल्याचा उल्लेख होता.तसेच त्वरित निघून ये अशी आज्ञा पण! मला कळेचना की हा चमत्कार कसा झाला.कारण मी कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नव्हता.कल्याणला असल्यामुळे जाहिरात केव्हा आली तेच माहीत नव्हते तर अर्ज कसा करणार?पण बापजींची आज्ञा म्हटल्यावर वापस जाणे भाग होते.यवतमाळला पोहोचल्यावर अर्जाचा उपदव्याप कवी मित्र सुभाष परोपटेने केल्याचे कळले.त्यावरून सुभाषची बरीच धुलाई केली.कारण मला शिक्षक व्हायचे नव्हते.मग आलीया भोगासी म्हणत मुलाखतीला जायची तयारी करणे सुरू केले.तुम्ही म्हणाल तयारी म्हणजे काय उत्तरे द्यायची वगैरे वगैरेची तयारी...पण नाही! माझी तयारी वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्ट.(त्या काळी कपड्याच्या पन्ह्याइतक्या बॉटमचा पायजामा असायचा).हा अवतार कशासाठी?तर मुलाखतीमध्ये निवड होऊ नये म्हणून.म्हणता म्हणता मुलाखतीचा दिवस उजाडला.या मुलाखतीच्या वेळी शंकरने मित्रवर्य डॉक्टर सुधाकर पुरी यांना सोबत घेऊन जायला सांगितले.का ते मात्र सांगितले नाही.डॉक्टर व मी आर्णीला पोहोचलो.मी शाळेत व डॉक्टर संस्थेचे अध्यक्ष चित्घनानंदजी भारती यांचेकडे गेले.शाळेतील बाबूने बरोबर अकरा वाजता भारतीजींच्या भव्य वाड्यातील बैठकीबाहेर असलेल्या बेंचवर सगळ्या मुलाखतकारांना नेऊन बसवले.माझा पुकारा झाला...वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्टअशा अवतारात आत गेलो.थोडीफार प्रश्नोत्तरे व प्रमाणपत्रे पाहून 'दुपारी पुन्हा या' असे सांगून सोडले.या दरम्यान डॉक्टर पुरी कुठे होते ते कळलेच नाही.त्यावेळी आर्णी गाव इतके लहान होते की खानावळ सुद्धा नव्हती.त्यावेळी गांधी गेटजवळ 'शाम' हे एकमेव हॉटेल होते. हॉटेलमध्ये जे मिळेल ते खाऊन दुपारी बैठकीत हजर झालो.तिथे संस्थाध्यक्ष भारतीजी,
सदस्यगण,संगीत रसिक दानशूर बापुसाहेब बुटले,
मुख्याध्यापक शंकरराव बुटले काही ज्येष्ठ शिक्षक बसले होते.(अर्थात ही नावे मला नंतर कळली.)आणि मग मला गायला सांगितले.अर्धा-पाऊण तासाची मैफल केल्यावर मला शाळेत जाण्यास सांगितले.मुख्याध्यापक अगोदरच पोहोचले होते.एकूण निवड होण्याची लक्षणे दिसायला लागली होती.निवड होऊ नये म्हणून काय करावे हा विचार सुरू असताना मुख्याध्यापकांनी 'तुमचे लग्न झाले काय' असा प्रश्न केला.मी हीच वेळ साधून अगदी टपोरी पोरासारखे 'नौकरी नहीं तो छोकरी कौन देंगा' असे उत्तर दिले. त्यांनी तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले व बाबूकडून नियुक्तीपत्र घेवून जाण्यास सांगितले.माझी सगळी मेहनत पाण्यात गेली होती.हिरमुसला होऊन शाळेच्या बाहेर आलो तर डॉक्टर पुरी माझी वाट बघत असल्याचे दिसले. यवतमाळला वापस जाण्यासाठी बस स्थानकावर आलो तर कळले की सायंकाळी चार नंतर यवतमाळसाठी कुठलीच बस नाही.कसे बसे एका ट्रकवाल्याला पैसे देऊन यवतमाळ गाठले.ठरलेल्या दिवशी कामावर रुजू झालो.पण माझी निवड का झाली हे कळेचना.बऱ्याच कालावधीनंतर शंकरने खुलासा केला की, मुलाखत प्रसंगीची माझी मैफल छान रंगली होती व मला बरीच वाद्ये वाजविता येतात हे त्यांना आवडले होते, (१९७१ मध्ये आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आर्णीला होऊन गेला होता.त्यावेळी माझे अकॉर्डियन वादन आर्णीकरांनी अनुभवले होते.ती कीर्ती पण संस्थाचालकांपर्यंत अगोदरच पोहोचली होती.) आणि या सोबतच महत्वाचे म्हणजे डॉ.पुरी हे भारतींचे जवळचे नातेवाईक आहेत हे ही शंकर कडून कळले.व सगळे कोडे उलगडत गेले अशा प्रकारे शिक्षक न होण्याची प्रतिज्ञा करूनही मी जून १९७२ मध्ये संगीत मास्तर म्हणून श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात रुजू झालो.
शास्त्रीबुवाला बोलल्याप्रमाणे सासरेबुवांनी नोकरी लागल्यावर एक वर्षानंतर २१ नोव्हेंबर १९७३ ला नोंदणी पद्धतीने आमचे लग्न लावून दिले. हे लग्न जास्ती टिकणार नाही,दोन तीन वर्षातच घटस्फोट होईल असे भाकित करणाऱ्या यवतमाळातील होरातज्ज्ञ व भविष्यकर्त्यांना, आज पन्नास वर्षे होऊनही आमचे प्रेम तसेच 'तरुण' असून, लग्नही टिकून आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटत आहे. माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये सुलभाचा सिंहाचा वाटा आहे.माझा उत्कर्ष व्हावा म्हणून तिने खूप सोसले.आज मी जो काही आहे त्यात ७५ टक्के वाटा तिचा आहे.हे कबूल करण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही.माझ्या दृष्टीने ती आदर्श सून,आदर्श पत्नी,आदर्श आई व आदर्श आजी आहे.(आदर्श मैत्रीण पण आहे असे तिच्या मैत्रिणी सांगतात.विशेषतः संगीता सिडाना,अमृतसर... पूर्वाश्रमीची रिता वर्मा, यवतमाळ.)