. #हा_असा_चंद्र
दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवा निमित्त झालेल्या मैफलीत गायिलेली
"#हा_असा_चंद्र_अशी_रात_फिरायासाठी" ही सुरेश भटांची गझल, ते १९८१ मध्ये आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना झाली आहे.(त्यांच्या हस्ताक्षरातील ही गझल तारखेसह माझ्याकडे आहे.) बंदिश सुद्धा त्याच काळातील आहे.किरवाणी राग ''बेस' आहे.पण सुरवातीलाच किरवाणीत नसलेला कोमल निषाद आला आहे.पहिल्या शेरातील 'फुलांची वस्ती', दुसऱ्या शेरातील 'रंग', तिसऱ्या शेरातील 'घाव' इत्यादी शब्दांवरील वेगवेगळ्या सुरावटी त्या त्या शब्दांचा अर्थ अधोरेखित करतात.आमच्या चर्चेतून अशा अनेक गझलांना योग्य बंदिशी झाल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" हा उपक्रम आम्ही दोघांनी महाराष्ट्रात राबविणे सुरू केले.असो!
तर प्रत्येक शेर शब्दानुरूप नव-नव्या सुरावटींनी रंग भरत कसा सजविल्या जातो ते ऐका. गायकी माझी,आवाज मयूर महाजनचा आणि बंदीशीची पसंती खुद्द सुरेश भटांची.
नंतरच्या काळात अनेक गझल गायकांनी आपापल्या परीने स्वरबद्ध करून ही गझल गायिली आहे.
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी...
चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती
राहिले कोण अता सांग झुरायासाठी
कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी
नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी
गायक - मयूर महाजन
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे
●मराठी गझल गायनाच्या सुरवातीच्या काळात हेटाळणी,कुत्सितपणे मारलेले टोमणे वगैरे ऐकत गेलो.मीच नाही तर सुरेश भटांना सुध्दा हेटाळणीला सामोरे जावे लागले.सर्व गान प्रकार शास्त्रीय संगीतामधूनच निर्माण होतात .पण ते 'फेअर' होऊन येतात.शास्त्रीय संगीतामधील सर्व चांगल्या बाबी घेऊन 'सुगम' म्हटल्या जाणारे 'दुर्गम' संगीत तयार होत असते.ते रसिकांना आवडते,कारण ते 'फाईन' होऊन येते.
खरे म्हणजे गझल गायकाला शास्त्रीय संगीत गणाऱ्यापेक्षा जास्ती अवधानं सांभाळावी लागतात.माझे हे वक्तव्य शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना पटणार नाही.पण ही वस्तुस्थिती आहे.गझल गायकाला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.त्याला साहित्याची जाण म्हणण्यापेक्षा अभ्यास असायला हवा.तो चांगला गायक असणे आवश्यकच आहे.आणि तो चांगला संगीत दिग्दर्शक पण असायला हवा.तरच तो गझल गायक बनू शकतो.माझे हे म्हणणे सुरेश भटांना तंतोतंत पटले होते.म्हणूनच आमची नाळ जुळली.व पुढील इतिहास घडला तो...
#अशी_गावी_मराठी_गझल... इति सुरेश भट.
------------------------------------------------------
●गझलकार मसूद पटेल यांची प्रतिक्रिया...
रसिकांच्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या या रचनेची निर्मिती आर्णी गावी म्हणजे माझ्या जिल्ह्यात व्हावी ही किती अभिमानाची गोष्ट आहे.कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांच्या या अजरामर रचनेला त्यांच्या समक्ष दिल्या गेलेली ही लाजवाब चाल आणि नव्या पिढीच्या नवोदित गायकाने चालीचे केलेले सोने या सर्वांचा जुळून आलेला हा योग एका कालातीत सांगीतिक अविष्कारच्या जन्माला कारणीभूत ठरणारा आहे .
मनःपूर्वक अभिनंदन सर!
🌸🙏🌸