गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, March 16, 2024

तू दिलेले दुःख....

राग_रंग (लेखांक ४३) राग धानी.

पूजाकोटिगुणं स्तोत्रं स्तोत्राकोटिगुणो जप:| जपात्कोटिगुणं गानं गानात् परतरं न हि || अर्थात, पुजेपेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ स्तोत्र,स्तोत्रापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ जप, आणि जपापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ 'गान'.गाना पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. धानी राग हा काफी थाटातून उत्पन्न झालेला अतिशय गोड राग आहे.भारतीय संगीतांर्गत येणाऱ्या रागांचे वर्गीकरण करण्यासाठी थाट अथवा मेल व्यवस्था करण्यात आली आहे.भारतीय संगीतांमध्ये सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र अशा प्रकारे एकूण बारा स्वरांचा प्रयोग केल्या जातो एका रागाच्या रचनेसाठी या बारा स्वरातील कमीत कमी पाच स्वरांचे असणे आवश्यक असते.संगीतांमध्ये थाट रागांच्या वर्गीकरणाची पद्धत आहे.सप्तकातील बारा स्वरामधील कर्मानुसार मुख्य सात स्वरांच्या समुदायाला थाट असे म्हणतात. यातूनच रागोत्पत्ती होते.थाटालाच मेल असेही म्हणतात. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये ७२ मेल प्रचलित आहे.उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र १०थाटांचाच प्रयोग केल्या जातो. याची सुरवात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी करून प्रचलित केले.(दहा ऐवजी आणखी एक-दोन थाट वाढविले असते तर प्रचलित दहा थाटात न बसणारे राग पण थाट पद्धतीत चपखल बसले असते.) सध्या राग वर्गीकरणाची हीच पद्धत प्रचलित आहे. कल्याण, बिलावल, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, तोड़ी आणि भैरवी... भातखंडेंजी द्वारा प्रचलित असलेले हेच ते दहा थाट होय.सर्व प्रचलित,अप्रचलीत रागांना या दहा थाटात सामील करून घेतले आहे. भारतीय संगीतांमध्ये त्या स्वरसमूहाला थाट म्हणतात ज्यात रागांचे वर्गीकरण केल्या जाऊ शकते,किंवा करतात.१५व्या शताब्दीच्या उत्तरार्धात 'राग तरंगिणी’ या ग्रंथाचे लेखक लोचन कवी यांनी राग वर्गीकरणाची पारंपरिक 'ग्राम आणि मूर्छना' पद्धतीमध्ये परिवर्तन करून मेल अथवा थाट पद्धतीची स्थापना केली.लोचन कविंच्या म्हणण्यानुसार त्या काळी सोळा हजार राग प्रचलित होते. यातील मुख्य असे राग ३६ होते.सतराव्या शताब्दीमध्ये थाटांर्गत रागांचे वर्गीकरण प्रचलित झाले होते. थाट पद्धतीचा उल्लेख सतराव्या शताब्दीतील ‘संगीत पारिजात’ आणि ‘राग विबोध’ नामक ग्रंथांमध्ये सुद्धा केल्या गेला आहे. लोचन द्वारा प्रतिपादित थाट पद्धतीचा प्रयोग जवळ-जवळ तीनशे वर्षांपर्यंत होत होता. एकोणविसाव्या शताब्दीच्या शेवटी व विसाव्या शताब्दीच्या सुरवतीच्या दशकात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी भारतीय संगीताच्या विखुरलेल्या सुत्रांना एकत्र करून अनेक सिद्धांतांमध्ये सुधारणा केली. भातखंडेंद्वारे निर्धारित दहा थातातील सातवा थाट काफी आहे. त्यातूनच उत्पन्न झालेला धानी राग एक चंचल प्रकृतिचा राग आहे.('चंचल प्रकृतीचा' म्हणजे काय ते कळले नाही.) यात ख्यालआणि विलंबित रचना गायिल्या जात नाही,असे म्हणतात. चंचल प्रवृत्तीमुळे मध्य व द्रुत लयीयील शृंगारिक व भक्तीरसपूर्ण रचना यात गायिल्या जातात. नेहमीप्रमाणे गोड लोकधून असलेल्या या रागाला शूद्र राग म्हटल्या जातो. (रागांचे मूळ असलेल्या लोकधूनांना शूद्र श्रेणीत ठेऊन कमी का लेखल्या जातात ते मला आजतागायत कळले नाही.)असो! या रागात कोमल गंधार एक अत्यंत प्रभावशाली असून न्यास स्वर आहे.हा स्वर या रागाचा केंद्रबिंदू आहे.तसेच कोमल निषाद सुद्धा न्यासाचा स्वर आहे.काही काळापूर्वी रिषभाला अवरोहात वर्ज न करता या रागाला औडव-षाडव जातीचा मानल्या जात होते.पण सद्य काळात रिषभ वर्ज्य करुन औडव-औडव जातिचा मानतात. तरी पण काही गुणिजन शुद्ध रिषभाचा प्रयोग करून धानी राग गाताना दिसतात.म्हणजेच हा राग आज दोन्ही प्रकारे गायिल्या जातो हेच सिद्ध होते.काफी थाटातील असल्यामुळे धानी गाताना खूप काळजी घ्यावी लागते.रिषभ,धैवत लागल्यास भीमपलासी व्हायला वेळ लागत नाही. अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळातर्फे दर वर्षी संगीत शिक्षक संमेलन घ्यायचे. अंदाजे १९७७/७८ वर्षी हे संमेलन अहमदाबाद येथे आयोजित केले होते.या संमेलनात एक बडा ख्याल गायिल्यानंतर पंडित गंगाधर तेलंग यांनी गायिलेल्या 'आंगनवा आये जोगी' या धानीतील बंदीशीने मी धानीच्या प्रेमातच पडलो.तो पर्यंत धानी हे नाव फक्त ऐकूनच होतो. ● चित्रपट गीते... 'चांद मध्यम है आसमा चुप है' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५). 'मेघा रे बोले घनन घनन' आशा,रफी. संगीत-उषा खन्ना.चित्रपट-दिल दे के देखो (१९५९). 'रात सुहानी झुमे जवानी' लता. चित्रपट-रानी रुपमती.संगीत-एस.एन. त्रिपाठी (१९५९). 'निगाहें न फेरो' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ब्लॅक प्रिन्स.संगीत-दुलाल सेन (१९५९) 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.संगीत-जयदेव (१९६१). 'कभी तनहाइयों में भी हमारी याद आयेगी' मुबारक बेगम.चित्रपट-हमारी याद आयेगी. संगीत-स्नेहल भाटकर (१९६१). 'ना ना ना रे ना ना हाथ ना लगाना, सुमन कल्याणपूर.चित्रपट-ताजमहाल. तिलक कामोद धानीचे मिश्रण (१९६३). 'रात भी है कुछ भिगी भिगी' लता.चित्रपट-मुझे जीने दो.संगीत-जयदेव (१९६३). तेरे हम ओ सनम तू जहां मैं वहां' रफी,सुमन कल्याणपूर.संगीत-सरदार मलिक.चित्रपट-बचपन. (१९६३).'ये खामोशियां ये तनहाईयां' आशा,रफी. चित्रपट-ये रास्ते है प्यार के. संगीत-रवी 'मुकद्दर आजमाना चाहता हूँ' रफी.चित्रपट-दूर की आवाज. संगीत-रवी (१९६४). 'मन मोरा नाचे तन मोरा नाचे' लता.चित्रपट-दो दिल.संगीत-हेमंत कुमार (१९६५). 'कुछ दिल ने कहां कुछ भी नहीं' लता.चित्रपट- अनुपमा. संगीत-हेमंत कुमार (१९६६) 'तडप ये दिन रात की' लता. चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन. (१९६६) 'भगवान ने अपने जैसा' लता. चित्रपट-छोटा भाई.(१९६६). 'खिलते हैं गुल यहां' किशोर-लता. संगीत-एस.डी. बर्मन.चित्रपट-शर्मिली (१९७१). 'बदन पे सितारे लपेटे हुए' रफी. चित्रपट-प्रिन्स.संगीत-शंकर जयकिशन (१९६९) 'तुम जो मिल गये हो तो ऐसा लगता है' रफी.चित्रपट-हंसते जख्म.संगीत-मदन मोहन (१९७३). 'पांव में डोरी' चित्रपट-चोर मचाये शोर. संगीत-रवींद्र जैन (१९७४). 'दिल में तुझे बिठाकर, कर लुंगी मैं बंद आंखे' चित्रपट-फकिरा.संगीत-रवींद्र जैन (१९७६). 'गोरी तेरा गांव बडा प्यारा मैं तो गया वारा आके यहां रे' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'आज से पहले आज से ज्यादा' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.संगीत-रवींद्र जैन (१९७७). 'आयी ना कुछ खबर मेरे यार की' (धानी आणि मधुकौंस रागाचे मिश्रण) किशोर,आशा,संगीत-बप्पी लहरी. चित्रपट-शराबी.(१९८४) ● नॉन फिल्मी... 'तुम कोलाहल कलह में' आशा.संगीत-जयदेव.(अनफरगेटेबल ट्रीट १९७१). 'साडे नाल वे'(छोटा ख्याल) गायिका-दृष्टी आणि स्निग्धा जहागीरदार.संगीत संयोजन-ओंकारनाथ हवालदार.(ताज फेस्टिव्हल). 'मुसफिर चलते चलते थक गया है' गझल.-गुलाम अली. ● मराठी... 'निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' संत गोरा कुंभारांचा हा अभंग अनेकांनी गायीला आहे.. 'अवघाची संसार सुखाचा करीन' (धानी व भीमपलासीचे मिश्रण) संगीत-मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.(संत ज्ञानेश्वरांचे हे पद १९३१ मध्ये कान्होपात्रा या संगीत नाटकात गोहरबाई कर्नाटकी आणि राजहंस यांनी सर्वप्रथम गायिले आहे.तसेच बाल गंधर्वांनी हे अधिक लोकप्रिय केले.) -----------------------------------------------------------------------

Saturday, March 9, 2024

राग-रंग (लेखांक४२) नंद

दो मध्यम अरु शुद्ध स्वर, गावत राग आनंद । थाट कल्याण षाडव संपूर्ण, प्रथम रात्री सुखचंद ।। एखाद्या चित्रपटातील गाण्यामुळे एखाद्या रागाची माहिती व्हावी म्हणून लेख लिहावासा वाटणे हे त्या चित्रपटगीताचे,त्या संगीतकाराने केलेल्या कामाचे श्रेय आहे असे मला वाटते.'मेरा साया' या चित्रपटातील 'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' हे ते गाणे होय. त्यावरून नंद रागावर लिहायची तीव्र इच्छा झाली. संगीतकार होते मदन मोहन.मदन मोहन यांची बहुतेक गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारित असायचीच.प्रत्येक रागातील स्वरांच्या आरोहावरोहाचा एक नियम असतो.आणि या नियमांना धरूनच संगीत रचना केल्या जातात.निदान पहिली ओळ तरी त्या रागाचे रूप दाखवीत असते.पुढे संगीतकाराचा कलाविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आयाम देत रचना खुलवित जातो.पाश्चात्य संगीतात याला "improvisation" असे म्हणतात. नंद हा राग कल्याणजन्य राग आहे,यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.जाती षाडव संपूर्ण असून गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.यालाच कुणी आनंदी, आनंदी कल्याण, नंद कल्याण असेही म्हणतात.हा राग बिहाग, गौड-सारंग ,हमीर, कामोद या रागांना अतिशय जवळचा आहे.सा ग म प नी सा,सां नी ध प...हे बिहाग अंग,अवरोहात सां ध नि प ध तीव्र म प ग...गौड सारंग अंग, ग म ध प...हमीर अंग, तीव्र म प ध तीव्र म प ग...कामोद अंग स्पष्टपणे दिसून येते.ह्या सुरावटी घेतल्यानंतर प्रत्येक वेळी 'ग म ध प रे सा' हे स्वर घ्यावेच लागतात.तेव्हा नंद राग स्पष्ट होतो. या रागाचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये अधिक प्रमाणात केल्या जातो. कल्याण परिवारातील शृंखलेतील आवडता राग म्हणून याचा उल्लेख करता येईल. हा राग ऐकणारे बरेच असतील पण गाणारे मात्र कमीच दिसून येतात. या रागाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रवाद आहेत.ते शोधणे कठीण आहे. तरी पण असे म्हणतात की,या रागाची कल्पना १९०० च्या दशकात सुचून प्रत्यक्षात आली असावी.कारण बऱ्याच कालावधीपासून मेहबूब खान (दरसपिया) द्वारा रचलेला विलंबित ख्याल 'ए बारे सैंय्या तोहे सकल बन ढूंढू' लोकप्रिय झालेला दिसून येतो. दरसपिया हे तानरसखान यांचे शिष्य व 'आफताब-ए-मोसिकी' फैयाज खान यांचे सासरे होते. त्या कालावधीमध्ये अत्रौली (जयपूर) घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक/वादकांमध्ये संगीत शास्त्रावर चर्चा होऊन विचारांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होती.या प्रक्रियेतूनच दरसपिया यांची रचना दोन्हीकडील उस्तादांनी आपापल्या घराण्याच्या यादीमध्ये सामील करून घेतल्यामुळे सर्वत्र पसरली.आज सर्वच घराण्यात या रागाला मान्यता आहे.आग्रेवाले उस्ताद विलायत हुसेन खान (प्राणपिया) द्वारा रचित सुरवातीची बंदिश 'अजहूँ न आए श्याम,बहुत दिन बीते' आजही लोकप्रिय आहे. 'जाने दो मुझे जाने दो' आशा भोसले. संगीत-आर.डी. बर्मन.गझल. 'धन्य तूचि कांता' नाट्यगीत,नाटक-अमृत सिद्धी.गायक-गंगाधर लोंढे. संगीत-मास्टर कृष्णराव. 'एन्ना पलिसु' enna palisu पं. भीमसेन जोशी. पुरंदरदासांच्या या रचनेची सुरवात नंद रागाने होते.पुढे विविध सुरावटी दिसतात. 'आनंद सुधा बरसे' नाट्यगीत.गायक- रामदास कामत, संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी.नाटक-मीरा मधुरा. 'पाखरा जा त्यजुनीय' नाटक-संगीत वाहिनी,मूळ गायक-पु.ल. आणि अर्चना कान्हेरे. संगीत-श्रीधर पार्सेकर. ----------------------------------------------------------------------------- 'दैनिक उद्याचा मराठवाडा', रविवार दि.१० मार्च २०२४

Saturday, March 2, 2024

राग-रंग (लेखांक ४१) राग हमीर.

कल्याणहिं के थाट में, दोनों मध्यम जान, ध-ग वादी-संवादि सों, राग हमीर बखान। हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.केदार, गौड़ सारंग, नंद हे राग अमूर्त श्रेणीत येतात.दिवसाच्या पाचव्या प्रहरी किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या दोन्ही मध्यम स्वर असलेल्या राग शृंखलेतील हा एक राग आहे.कल्याण थाटोत्पन्न या रागात तीव्र मध्यम स्वराचा अल्प प्रयोग केल्या जातो.तरी पण याचा थाट मात्र कल्याण! संस्कृत विद्वान यात तीव्र मध्यम घेण्याच्या विरोधात आहेत.(पण आज तीव्र मध्यम या रागाचे एक अंग बनला आहे.) ते याला बिलावल थाटोत्पन्न मानतात.कारण हा बिलावल रागाशी मिळता -जुळता आहे.आणि मला तरी हे तर्कसंगत वाटते.याचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.येथे सुद्धा राग गायन समय सिद्धांतानुसार विरोधाभास दिसून येतो.ज्या रागाचा वादी स्वर पूर्वांगात असतो तो राग समय सिद्धांतानुसार दुपारच्या बारा वाजल्यापासून मध्यरात्रीच्या बारा वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जायला हवा.याच प्रकारे उत्तरांगवादी राग उत्तरांगात म्हणजे मध्यरात्रीच्या बारा वाजल्यापासून दिवसा दुपारच्या बारा वाजेपर्यंत सादर व्हायला हवा.परंतू हमीर रागाचा वादी स्वर धैवत असूनही गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानल्या जातो.अशा प्रकारे सिद्धांत आणि व्यवहार परस्पर विरोधी दिसून येतो.याला अपवाद म्हणता येईल काय? 'हमीर कल्याणी' नावाचा दक्षिण भारतीय राग उत्तर भारतीय 'केदार' रागाशी मिळता जुळता आहे.त्याचा उत्तर भारतीय हमीर रागाशी काहीच संबंध नाही.दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये 'केदारम्' नावाचा वेगळा राग आहे.उत्तर हिंदुस्थानी पद्धतीमधील केदार,कामोद नी हमीर रागात बरेच साम्य आहे.केदारमध्ये मध्यम,कामोदमध्ये पंचम आणि हमीरमध्ये धैवत स्वर सगळ्यात प्रबळ आहेत.धैवत या रागाचा प्राण स्वर आहे.ज्यावर न्यास होतो. हा राग उत्तरांगप्रधान असल्यामुळे याचा विस्तार मध्य व तार सप्तकामध्ये खुलून दिसतो.याची विशेषता म्हणजे यातील धैवत निषदाला स्पर्श करून घेतल्या जातो.त्यामुळे गोडवा अधिक वाढतो.या रागातील सगळ्यात लोकप्रिय चित्रपटगीत 'मधूबन में राधिका नाचे रे' हे आहे.संगीताचे लक्ष रस-परिपाक हे असल्यामुळे गीत-वाद्य-गायन यांच्यातील पारस्पारिक सांमजस्य साधले की, 'मधूबन में राधिका' सारखे गाणे तयार होते.संगीतकार -गायक-वादक एकरूप झाले की रसमय वातावरणाची वृष्टी होते.त्यात मुख्यतः व्यष्टीला नसून समष्टीला प्राधान्य असते. सगळ्यांच्या सफलतेत प्रत्येकाची सफलता असते.कोणा एकाची त्यात महत्वपूर्ण नसते.सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न म्हणजे यश,सफलता होय. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आचार्य बृहस्पती यांच्या 'संगीत चिंतामणि' या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील एका समीक्षका बद्दलचा एक उतारा आहे,तो असा:- 'संगीत के उभरने के साथ शब्दार्थ पीछे छोड़ दिया जाता है, छोड़ दिया जाना चाहिए । संगीत को चाहिए कि उसे (शब्दार्थ को) खा जाए और शब्दार्थ को भी चाहिए कि वह खाया जाए ।('अनुपरागविलास', भूमिका, पृष्ठ १३) "जब आलोचकों का दृष्टिकोण यह हो जाए, तब संगीत की नैया का भगवान ही मालिक है। अमीर खुसरो या सदारंग यदि इस युग में होते, तो अवश्य ही पागल हो जाते। बंदिशों के साहित्य को भ्रष्ट करने का उत्तरदायित्व भी शब्दार्थ की ओर ध्यान न देनेवाले उस्तादों पर है। 'क्रमिक पुस्तक-मालिका' में संगृहीत, परंतु अर्थ की दृष्टि से अपूर्ण एवं भ्रष्ट बंदिशों के प्रचार का उत्तरदायित्व उस परंपरा के नेताओं पर है। इस युग में तो ऐसे व्यक्ति भी उस्ताद कहलाने लगे, जिन्होंने केवल मुखड़ा गाकर जीवन बिता दिया और नई पीढ़ी के मन में यह बात डाल गए कि न तो बंदिश की आवश्यकता है और न अर्थ की। तबले पर ठेका आरंभ कराकर 'आ, ई, ऊ, ओ' का आधार लो, बहलावे करो, तानें मारो, टीप पर खड़े न हो, गला बरावर हिलाते रहो, बस गवैए बन जाओगे। यही कारण है कि जो 'गाना' कभी बजाने और नाचने की अपेक्षा 'उत्तम' कहलाता था, उसकी 'रीढ़' ही गायब हो गई है। उसका अस्थिपंजर लुप्त हो गया है । सितार और सरोद के लोकप्रिय होने का कारण यह है कि इन्हें बजानेवाले आलाप में लय का ढोंग नहीं करते, जबकि गायक प्रायः आरंभ से ही तबले पर ठेका आरंभ करा देते हैं, उस ठेके की लय का गायक के तथाकथित विलंबित गान से कोई संबंध नहीं होता। 'तिरकिट' देखकर 'सम' आ जाना पर्याप्त समझा जाता है। 'लय' की डोर इस गाने में नहीं रहती । सितार या सरोद के 'जोड़' में ताल भले ही न हो, 'लय' रहती है, एक क्रम रहता है। ये लोग जव 'मसीतखानी' गत बजाते हैं, तब श्रोताओं के सम्मुख ठेका स्पष्ट रहता है, सितार वादक एवं सरोद-वादक तरह-तरह से बनकर आते हैं है। तबलेवाले तंत्री-वादकों के साथ बजाकर इस युग में यशस्वी और मुखड़ा पकड़ते हैं। हुए है। अच्छे तबला वादक अतिविलंबित प्रेमी गायकों को दूर से ही नमस्कार करना चाहते हैं। इस स्थिति की जिम्मेदारी भी 'उस्तादों' पर है । शब्द और अर्थ केवल गायक की संपत्ति थे। राग, ताल और लय तो बीन, सितार, सरोद और बाँसुरी में भी हैं। शब्द, अर्थ और लय की ओर जब गायकों ने ध्यान देना छोड़ दिया।प्रत्येक युग में मानव नवीनता की खोज में पागल रहा है, आज भी संगीत- जगत् में ऐसे व्यक्ति हैं, जो नए मार्ग की खोज में हैं, परंतु इनमें से अधिकांश ऐसे हैं, जिनमें पर्याप्त अध्ययन की कमी है, ये प्रचलित रागों में मनमाना उत्पात करके लोगों का ध्यान अपनी ओर आकृष्ट करते हैं। इनकी 'बंदिशों' की भाषा प्रायः अशुद्ध होती है, इनके द्वारा आविष्कृत राग सचमुच बीहड़ होते हैं। आज भारतीय संगीत को पुनः गंभीर चिंतन की आवश्यकता है । " 'मधूबन में राधिका नाचे रे' अशी गाणी लोकप्रिय होण्याची कारणे वरील उताऱ्यात नक्कीच मिळते.असो! हमीर रागातील काही लोकप्रिय चिजा... 'चमेली फूली चंपा' चीज-यशवंत जोशी,कुमार गंधर्व, शुभा मुद्‌गल,उल्हास कशाळकर वगैरे वगैरे,...'जा जा रे जा रे रंगरेज्या'-कुमार गंधर्व, 'ढीठ रंगरवा कैसे घर जाऊ'-पद्मा तळवलकर, 'मैं तो लागी रे तोरे चरनवा' -उस्ताद मुबारक अली खान, ● मराठी-हिंदी चित्रपट असो वा मराठी-हिंदी सुगम संगीत असो,यातील काही रचना सोडल्या तर बहुतेक स्वररचना संपूर्णतः एका विशिष्ट रागात बांधलेल्या नसतात.त्या पक्त 'त्या' रागावर आधारित असू शकतात.एखाद्या गीतात एकापेक्षा अनेक रागांच्या छटा पण दिसू शकतात. 'छेड दिए मेरे दिल के तार' उस्ताद अमीर खान,उस्ताद अमानत अली खान, चित्रपट-रागिनी, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५८). 'मधूबन में राधिका नाचे रे' रफी. चित्रपट-कोहिनुर, संगीत-नौशाद (१९६०). 'मैं तो तेरे हसीन खयालों में खो गया' रफी. चित्रपट-संग्राम, संगीत-चित्रगुप्त (१९६५). 'ए हौसला कैसे झुके' शफाकत अली.चित्रपट-डोर, संगीत-सलीम सुलेमान (२०२१). 'सूर की गती मैं क्या जानूं' मुकेश.(नॉन फिल्मी) संगीत-नरेश भट्टाचार्य. 'कोकिळा गा' आशा भोसले. चित्रपट-बायकोचा भाऊ, संगीत-वसंत प्रभू (या गीतात हमीर+केदार आहे.) (१९६१). 'हे जगदीश सदाशिव शंकर' नाट्यगीत. नाटक-कट्यार काळजात घुसली. 'नमन नटवरा विस्मयकारा' नांदी, नाटक-संगीत मानापमान. 'विमल अधर निकटी मोह हा पापी' नाटक विद्याहरण. (हे नाट्यगीत सुरेश हळदनकर यांनी लोकप्रिय केले.) 'हेतु तुझा फसला' मराठी नाटक संशयकल्लोळमधील गीत. ----------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.३/3/२०२४

मज गायचेच आहे (गझल)





संगीत आणि साहित्य :