जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.संगीताच्या इतिहासाच्या सुरूवातीपासूनच 'राग’ हा कल्पनेसारखा गुंतागुंतीचा आणि संस्कारित आविष्कार होता. खरे तर भारतीय संगीताच्या उत्कांतीचा तो एक संकलित परिणाम आहे असे म्हणायला हरकत नाही.अनेकदा असे म्हटले गेले आहे, की भारतीय रंगभूमी-परंपरेचा आद्य तत्त्व ग्रंथ मानल्या गेलेल्या भरताच्या नाटयशास्त्रात राग हा शब्द येतो. कारण त्या काळच्या रंगभूमीत नृत्य, नाटय व संगीत एकत्र आविष्कृत होत होते.असे असले तरी, आजच्या प्रमाणे एक सांगीतिक शक्ती म्हणून राग प्रचारात येण्याची घटना खूप नंतरची आहे.'राग' या कल्पनेस दीर्घ इतिहास असून त्याच्या विकासास अनेक परिमाणे आहेत. तेव्हा तेराव्या शतकात त्याची असंदिग्ध व्याख्या करण्यात आली व त्याच्या शक्यता धुंडाळण्यात येऊ लागल्या, असे मानण्यास हरकत नाही.नंतर घराणे उदयास यायला लागले.घराणे ही संकल्पना एकोणिसाव्या शतकातच प्रसृत झाली, कारण राजाश्रय गेल्यामुळे कलाकारांना शहरी केंद्रांकडे वळावे लागले. आपली खास ओळख कायम ठेवण्यासाठी आपापल्या मूळ गावांची खूण कायम राखणे त्यांना आवश्यक वाटले.त्यावरून घराण्यांची नावे आली.
राग संगीतामध्ये धृपद-धमार,लंगडा धृपद, ख्याल, ख्यालनामा, त्रिवट, रास, चतुरंग, तराणा, अष्टपदी, सरगमगीत, टप्पा हे संगीत प्रकार येतात.
सुगम कंठ संगीतामध्ये ठुमरी, दादरा, कजरी, चैती, सावन, कव्वाली, गझल, भजन, हे प्रकार येतात.
हिंदुस्थानी संगीतात पद्धतीमध्ये अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत वा तयार केले आहेत. अश्या रागांना 'जोड राग' असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रवणास आनंददायी असते.एखादा कलाकार जेव्हा जोड रागाचा विस्तार करतो तेव्हा तो श्रोत्यांना सातत्याने दोन्ही रागांचे रंग आलटून पालटून दाखवत असतो. जोड राग उतम प्रकारे मांडणे, गाणे हे एक अवघड तसेच आव्हानात्मक काम असते.
जोड रागांची भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,
जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,
गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग,बसंती केदार, ललिता गौरी, राग अडाणा बहार, भैरव भटियार,सावनी नट वगैरे वगैरे मिश्र रंगांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. मिश्र प्रकारातील असाच एक गोड राग आहे 'मालगुंजी'.हा राग गोड असला तरी जटिल आहे. यात खरे तर तीन राग दिसून येतात ते म्हणजे रागेश्री,बागेश्री आणि थोडा जैजवंती. ठोकळमानाने आरोहात रागेश्री,अवरोहात बागेश्री दिसतात असे म्हणता येईल. बागेश्री विरह दाखवितो तर रागेश्री पुनर्मीलन दाखवितो असे म्हणतात.तसेच खमाज थाटातीलच असल्यामुळे काही ठिकाणी खमाज रागाचा पण अंश दिसतो.(काही लोक याला काफी थाटोतपन्न मानतात.) याचा वादी स्वर मध्यम असून संवादी स्वर षड्ज आहे.गान समय रात्रीचा तिसरा प्रहर आहे.
या रागाचा विस्तार तीनही सप्तकात केल्या जातो.
अनेक गायक मालगुंजीला 'मालगुंजरी' या प्राचीन नावाने संबोधतात.याची प्राचीन विलंबित लयीची पारंपरिक बंदिश 'ये बन में चरावत गइयां, द्रुत लयीतील 'रैन काहे डरावन लागी री, 'मुरली की धुन सुनी सखी री आज' आणि 'तुम मतवारो रे पियरवा प्रसिद्ध आहे. चित्रपट संगीतामध्ये ज्या प्रमाणे भैरवी, खमाज, पीलू, बहार, पहाड़ी, झिंझोटी, मालकौंस आणि शिवरंजनी या रागांचा प्रयोग केल्या गेला त्या प्रमाणे मालगुंजी या रागाचा झाला नाही. मराठीत तर नाहीच नाही.
● चित्रपट गीते...
झनक झनक पायल बाजे मधील अतिशय सुरेल गीत मालगुंजी रागावर आधारित आहे. 'नैन सो नैन नहीं मिलाओ' लता,हेमंत कुमार. चित्रपट-झनक झनक पायल बाजे, संगीत-वसंत देसाई (१९५५).
मालगुंजी रागावर आधारित आणखी एक सुंदर रचना संगीतकार मदन मोहन यांनी अदालत चित्रपटा करीता तयार केली होती.'उनको ए शिकायत है कि हम कुछ नहीं कहते' लता. (१९५८).
'घर आ जा घिर आये बदरा सांवरिया' लता.चित्रपट-छोटे नवाब, संगीत-आर.डी. बर्मन (१९६१) . हे -आर.डी.चे पहिले गाणे होते.असे म्हणतात की, त्या वेळी आर.डी.चे वडील एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात काही कारणामुळे दुरावा आला होता.त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नव्हते.व आर.डी.चे हे चित्रपटातील पहिलेच गाणे असल्यामुळे ते लताजींकडून गाऊन घ्यायचे होते.लता मंगेशकर गायला तयार पण होत्या.त्या काळी ध्वनिमुद्रणापूर्वी भरपूर प्रॅक्टिस होत होती.त्यासाठी लता मंगेशकर आर.डी.च्या घरी आल्या होत्या.त्यांना एस.डी. ना भेटायची खूप इच्छा होती.म्हणून तसे आर.डी.ना विचारले.त्यांनी एस.डी. पण भेटायला उत्सुक असल्याचे सांगितले.आणि या गाण्याच्या निमित्ताने एस.डी. व लता मंगेशकर एकत्र येऊन पुन्हा काम करायला लागले.
'बेदर्दी दगाबाज जा, तू नाहीं बलमा मोरा' लता. चित्रपट-ब्लफ मास्टर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९६३).
'बलमा बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत- एस.मोहिंदर (१९६६).
संगीतकार सलिल चौधरींची अनेक गाणी बंगालची सांस्कृतिक ओळख बनली आहे.त्यांच्या संगतामध्ये पाश्चात्य संगीतकार बाख, बीथोवेन, मोजार्ट आणि थोड़ासी चोपिन यांची छाप दिसते. लोक गीतांमध्ये काही प्रमाणात भारतीय शास्त्रीय संगीताचे मिश्रण पण दिसून येते. राग मालगुंजीवर आधारित एक अप्रतिम रचना आनंद या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली.
'ना जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं' लता.(१९७०).
'जीवन से भारी तेरी आंखे मजबूर करे जीने के लीए' किशोर कुमार. चित्रपट-सफर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९७०).
----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि.३/१२/२०२३