मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)
मराठी गझल हा काव्यप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे महान कार्य करणाऱ्या ज्या दोन व्यक्तींची आदराने नावे घेतली जातात, त्यातील एक म्हणजे कविश्रेष्ठ #सुरेश_भट व दुसरे म्हणजे कवी, गझलकार, गीतकार, संगीतकार व स्फुट लेखक 72 वर्षांचे चिरतरुण श्री. #सुधाकर_कदम. दोघेही वैदर्भीय. भट अमरावतीचे तर कदम यवतमाळ जिल्ह्याचे.
दै. हिंदुस्थानच्या "#रंग_गझलेचे" या लोकप्रिय सदरात आज कदम सर प्रथम प्रवेश करीत आहे याचा मला आनंद आहे.
गझल सम्राट स्व.सुरेश भट ज्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन "म्हणून करतात त्या सुधाकर कदम यांनी मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रूजविण्यासाठी,व लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. "सुरेश भट स्मृती पुरस्कार तसेच" #गझलगंधर्व " हा किताब प्राप्त कदम सरांचा १९८३ साली "भरारी " हा,पहिला मराठी गझल गीतांचा अल्बम प्रसिद्ध झाला. "#खूप_मज्जा_करू "हा तेरा बालगीतांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे. गुलशन कुमार प्रस्तुत सीडी मध्ये " #अर्चना " या भक्तिगीतांची सीडीही प्रकाशित झाली आहे.गायक सुरेश वाडकर व गायीका वैशाली माडे यांनी स्वरसाज चढवलेल्या "#काट्यांची_मखमल" या मराठी गझल अल्बमला , "#तुझ्यासाठीच_मी "या गीतकार दिलीप पांढरपट्टे यांच्या अल्बमला तसेच बालभारती ,पहिली ते चौथीच्या कविता" #झुला " व कुमार भारती आठवी ते दहावीच्या "झुला"ला सुधाकर कदम यांनी संगीत दिले आहे.वृत्तपत्रातून त्यानी "#फडे_मधुर_खावया "या सदराखाली स्फूट लेखन ही केलेले आहे.
अनेक वाद्य वाजविण्यात पारंगत असलेल्या सुधाकर कदम यानी नागपूर आकाशवाणीचे #गायक व #वादक म्हणूनही काम केले आहे.
त्यांना ' आऊट स्टॅडिंग यंग पर्सन', 'कलादूत', 'समाजभूषण', 'कलावंत', 'शान-ए-ग़ज़ल', 'महाकवी संतश्री विष्णुदास','गझल गंगेच्या तटावर' या व अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अर्चना या त्यांच्या अल्बम मधील भक्तिगीते पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे यांनी गायिलेली आहेत.
आज त्यांची "घर आहे पण दारच नाही" ही गझल सादर करतो आहे. आस्वाद घ्यावा. प्रतिसाद द्यावा.
दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवा निमित्त झालेल्या मैफलीत गायिलेली
"#हा_असा_चंद्र_अशी_रात_फिरायासाठी" ही सुरेश भटांची गझल, ते १९८१ मध्ये आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना झाली आहे.(त्यांच्या हस्ताक्षरातील ही गझल तारखेसह माझ्याकडे आहे.) बंदिश सुद्धा त्याच काळातील आहे.किरवाणी राग ''बेस' आहे.पण सुरवातीलाच किरवाणीत नसलेला कोमल निषाद आला आहे.पहिल्या शेरातील 'फुलांची वस्ती', दुसऱ्या शेरातील 'रंग', तिसऱ्या शेरातील 'घाव' इत्यादी शब्दांवरील वेगवेगळ्या सुरावटी त्या त्या शब्दांचा अर्थ अधोरेखित करतात.आमच्या चर्चेतून अशा अनेक गझलांना योग्य बंदिशी झाल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" हा उपक्रम आम्ही दोघांनी महाराष्ट्रात राबविणे सुरू केले.असो!
तर प्रत्येक शेर शब्दानुरूप नव-नव्या सुरावटींनी रंग भरत कसा सजविल्या जातो ते ऐका. गायकी माझी,आवाज मयूर महाजनचा आणि बंदीशीची पसंती खुद्द सुरेश भटांची.
नंतरच्या काळात अनेक गझल गायकांनी आपापल्या परीने स्वरबद्ध करून ही गझल गायिली आहे.
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी...
चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती
राहिले कोण अता सांग झुरायासाठी
कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी
नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी
गायक - मयूर महाजन
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे
●मराठी गझल गायनाच्या सुरवातीच्या काळात हेटाळणी,कुत्सितपणे मारलेले टोमणे वगैरे ऐकत गेलो.मीच नाही तर सुरेश भटांना सुध्दा हेटाळणीला सामोरे जावे लागले.सर्व गान प्रकार शास्त्रीय संगीतामधूनच निर्माण होतात .पण ते 'फेअर' होऊन येतात.शास्त्रीय संगीतामधील सर्व चांगल्या बाबी घेऊन 'सुगम' म्हटल्या जाणारे 'दुर्गम' संगीत तयार होत असते.ते रसिकांना आवडते,कारण ते 'फाईन' होऊन येते.
खरे म्हणजे गझल गायकाला शास्त्रीय संगीत गणाऱ्यापेक्षा जास्ती अवधानं सांभाळावी लागतात.माझे हे वक्तव्य शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना पटणार नाही.पण ही वस्तुस्थिती आहे.गझल गायकाला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.त्याला साहित्याची जाण म्हणण्यापेक्षा अभ्यास असायला हवा.तो चांगला गायक असणे आवश्यकच आहे.आणि तो चांगला संगीत दिग्दर्शक पण असायला हवा.तरच तो गझल गायक बनू शकतो.माझे हे म्हणणे सुरेश भटांना तंतोतंत पटले होते.म्हणूनच आमची नाळ जुळली.व पुढील इतिहास घडला तो...
रसिकांच्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या या रचनेची निर्मिती आर्णी गावी म्हणजे माझ्या जिल्ह्यात व्हावी ही किती अभिमानाची गोष्ट आहे.कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांच्या या अजरामर रचनेला त्यांच्या समक्ष दिल्या गेलेली ही लाजवाब चाल आणि नव्या पिढीच्या नवोदित गायकाने चालीचे केलेले सोने या सर्वांचा जुळून आलेला हा योग एका कालातीत सांगीतिक अविष्कारच्या जन्माला कारणीभूत ठरणारा आहे .
दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी...' या मराठी गीत-गझलच्या मैफलीतील अत्यंत सुंदर अशी गझल...
संपली अजुनी कुठे ही रात सजणा
का असा जातोस तू इतक्यात सजणा
बोलते आहे नव्या स्वप्नासवे मी
हात घे हलकेच तू हातात सजणा
पाहण्यासाठी मला झंकारताना
चांदणे खोळंबले दारात सजणा
मोहराया लागले तारुण्य माझे
दरवळाया लागला एकांत सजणा
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे
● जोग रागाची सुरावट घेऊन आलेली अनिल कांबळे यांनी ही गझल जवळ-जवळ चाळीस वर्षांअगोदर स्वरबद्ध झाली होती.#सरगम_तुझ्याचसाठी या मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल कार्यक्रमात माझी ज्येष्ठ कन्या भैरवी गायची. या गझलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोग रागासोबतच दुसऱ्या शेरात सारंग राग आणि पुढे मुर्छनाद्वारे विविध रागांची उधळण केलेली दिसून येते. मूळ रचनेला स्वरांद्वारे विविध प्रकारे सजवणे म्हणजे गझल गायकी...याचा प्रत्यय ही गझल ऐकताना येते.यातील आर्जव गायकीतून दाखविणे ही प्राजक्ताची हातोटी म्हणावी लागेल.
●ही गझल माझ्या आयुष्याची 'टॅग लाईन' आहे,असे मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांचे म्हणणे आहे.आणि एकार्थाने ते सत्यही आहे.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रा,१९७२ पासून संगीत शिक्षक म्हणून नोकरी,१९८० ते १९८२ सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भ्रमंती.१९८२ नंतर सोलो कार्यक्रम.यात पगार सोडला तर आर्थिक लाभ नगण्य.पण शारीरिक त्रास मात्र भरपूर होत गेला.कदाचित हा त्रास सोसण्यातूनच ही कविता प्रसवली असावी.येताना सुरावट पण घेऊन आली.त्यातही प्रत्येक कडव्यात तीन-तीन यमक जुळवत आली.
मी तर ही कविता गायचोच.पण माझा कनिष्ठ सहोदर प्रशांत कदम अतिशय सुंदर रीतीने गायचा.यातील "प्रिये तुझ्याचसाठी" या ओळीवरून 'ही प्रिया कोण?' अशी विचारणा व्हायची.तर, मित्रहो ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी '#मराठी' आहे.
या गझलच्या सादरीकरणा अगोदर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपल्या मनोगतामधून काही महत्वाचे मुद्दे मांडले.तसेच नेटके सूत्र संचालन प्रशांत पेंडसे यांनी केले.
जन्म-१३/११/१९४९.
आद्य मराठी गझल गायक म्हणून सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी गौरविले.ज्या वेळी महाराष्ट्रात मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोणीच करीत नव्ह्ते तेव्हा गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करीत होतो.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो वैयक्तिक कार्यक्रम केलेत. १९८० ते १९८३ या चार वर्षात सुरेश भट आणि मी,मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून "अशी गावी मराठी गझल"हा कार्यक्रम करीत पदराला खार लावीत एस.टी.ने तर कधी रेल्वेने अक्षरशः महाराष्ट्रभर वणवणलो.या कार्यक्रमाचे निवेदन बहुतेक सुरेश भट करायचे तर कधी कधी सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.(आमच्या या मेहनतीचे फ़ळ सध्याचे गायक चाखत आहेत)
१९८३ मध्ये"भरारी"नामक मराठी गझल गायनाची पहिली वहिली ध्वनिफ़ित तयार केली. मराठी गझल गायकीतील भरीव कामगिरीबद्दल "Outstanding Young Person"(१९८३),"समाजगौरव"(१९९५),"संगीत भूषण"(१९९६),
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),"कलादूत"(२००२),"कलावंत"(२००३),
"शान-ए-गज़ल"(२००५),"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६)"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) वगैरे सन्मान मिळाले.अनेक
म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले.सध्या नवोदित गायकांना मराठी गझल गायकीचे शिक्षण देत आहे.तसेच गझलकार,गायक,वादक यांनी दर महिन्याला एकत्र येण्याकरीता "गझलकट्टा" आयोजित करीत आहे.