सुरेश भटांच्या हयातीत मी त्यांची जवळ जवळ चाळीस गीते व गझला स्वरबद्ध केल्या होत्या."मी जसा जगलोच नाही" शब्दानुरूप बंदिश झाल्यामुळे त्यांची अत्यंत आवडती व हृदयस्पर्शी शब्दांमुळे माझी आवडती होती/आहे. या गझलची बंदिश मारवा रागात आहे."जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही" या पहिल्या ओळीत षड्जाचा नगण्य वापर केल्यामुळे मारवा रागाची उदासीनता, वरील ओळीचा अधिक अर्थ एकदम रसिकांच्या हृदयापर्यत पोहोचवते.दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दाकरिता आलेला मारव्यात नसलेला 'कोमल मध्यम' आणि त्यासोबत आलेल्या तत्सम सुरावटी तुटलेपणाचा आभास निर्माण करते.त्याचप्रमाणे 'जुळलोच नाही' या शब्दांकरिता तीव्र मध्यमा सोबत आलेला कोमल धैवत 'ती' हतबलता म्हणा,दुःख म्हणा अतिशय प्रखरपणे आपल्यापर्यंत पोहोचवते."वाटले मज गुण गुणावे" या ओळीकरिता यमन रागाचा चपखल वापर करून पुन्हा मूळ रागावर म्हणजे मारव्यावर येणे ही प्रक्रियासुद्धा त्यांना खूप भावली होती.म्हणूनच ही त्यांची अत्यंत आवडती स्वररचना होती.
आज दि.१५ एप्रिल, सुरेश भटांची जयंती... त्या निमित्त ही माझी सांगीतिक श्रद्धांजली!
🌹🙏🌹
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाईत
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही
कवी - सुरेश भट #sureshbhat
गायकब - सुरेश वाडकर #sureshwadkar
संगीत - सुधाकर कदम #sudhakarkadam
संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milindgune
ध्वनिमुद्रण - आजीवासन, मुंबई आणि पंचम स्टुडिओ,पुणे.
मिक्सिंग, मास्टरिंग - अजय अत्रे,#ajayatre पंचम स्टुडिओ, पुणे.
No comments:
Post a Comment