गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 26, 2024

बोलती डोळे...

रसिकहो,
 (दि १७ सप्टेंबर २०२४) अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ज्योती राव बालिगा यांच्या खालील गझलचे युट्युब प्रकाशन, मित्रवर्य #तालयोगी #पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी पद्माताई तळवलकर,या गझलची गायिका प्राजक्ता सावरकर शिंदे,
तबलानवाज किशोर कोरडे आणि अबीर कदम उपस्थित होते.संपूर्ण गझल ऐकल्यानंतर पंडितजी व पद्माताईंनी पूर्ण टीमचे मुक्त कंठाने कौतूक केले.त्यांच्या आदरातिथ्याने आम्ही भारावून गेलो.
                                  ●
     या गझलच्या बंदिशचा बेस तसा #मधुवंती राग आहे.#दादरा तालातील ही बंदिश शेवटच्या म्हणजे सहाव्या मात्रेपासून सुरू होते.सुरवातीच्याच 'काही' या शब्दातील 'का' या अक्षरावरील खटका ऐकणाऱ्यास आकर्षित करून घेतो.दुसरा मिसऱ्यातील 'माझेच गीत आले' यातील 'आले' या शब्दाला घेऊन तार रिषभावरून कोमल गांधारपर्यंत उतरतानाच्या सुरावटीत मधुवंतीमध्ये नसलेला कोमल (शुद्ध) 'मध्यम' आल्यामुळे शब्दासोबतच सुरावटही चमत्कृतीपूर्ण झाली आहे,तसेच 'पाळीत रीत आहे' या ओळीतील 'रीत' या शब्दावर कुठे कुठे कोमल मध्यम घेतल्यामुळे 'पटदीप' रागाचा पण भास होतो.पहिल्या आणि तिसऱ्या शेरात कोमल धैवतही अचानक हजेरी लावून गेल्यामुळे शेरांची रंगत वाढली आहे.दुसऱ्या शेरातील #मैफिलीचा शब्दावरील  वेगवेळ्या सुरावटी मूळ मधुवंती बाजूलाच ठेवतो.तरी पण पूर्ण बंदिश मधुवंतीच्या आसपास रुंजी घालताना दिसून येते.
【धून तयार झाल्यानंतरच हे विश्लेषण आहे.धून तयार होताना कोणत्या 'धुनकीत' असतो ते मलाही कळत नाही 😊.】

ध्वनिमुद्रण करताना तीन शेर घेण्याचे ठरले होते.पण ऐन वेळी चौथा शेर 

'ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला
आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले'

घ्यावा अशी प्रबळ इच्छा ज्योतिजींनी केली.आणि त्यातील 'नशेचा' शब्द खरोखरीच 'नशेबाज' झाला.यात शब्दांसोबतच प्राजक्ताचीही गाण्यातील नजाकत दिसून येते.संगीत संयोजक मिलिंद गुणेंबद्दल काय बोलावे?कसबी कारागिराने सोन्याच्या तुकड्याचा आकर्षक अलंकार बनवावा तसं काम केलं आहे.हा अलंकार अधिक आकर्षक करण्यात ध्वनिमुद्रण करणाऱ्या श्रेयस दांडेकरचे योगदान आहेच.
पण त्या अलंकाराला 'पॉलिश' करून चमकवण्याचे महत्वाचे काम  अजय अत्रे यांनी मास्टरिंग करून केले आहे.एक गाणं 
करायचं म्हणजे कवी,संगीतकार,संगीत संयोजक,गायक,वादक,ध्वनिमुद्रक, मिक्सिंग, मास्टरिंग करणाऱ्या सगळ्यांची मेहनत असते.कवीपासून सुरू झालेली 'प्रोसेस' मास्टरिंग नंतर थांबते.यातील सतारचे सुंदर तंतकाम प्रसाद गोंदकर यांचे आहे.एकूणच हे  'टीमवर्क' आहे.टीममधील सगळ्या सहकऱ्यांचा मी आभारी आहे.

                           -गझल-

काहीं न बोलण्याची राखून रीत आले
माझ्या समोर आता माझेच गीत आले. 

एकेक घाव माझा आता भरून येई
हे कोण चांदण्याचे टाके भरीत आले

केलास का असा तू बेरंग मैफिलीचा
आता कुठे जराशी मीही लयीत आले

सांगू कशी तुला मी आले कुठून येथे
आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले

ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला
आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले

संपूर्ण गझल ऐकण्यासाठी युट्युब लिंक...
https://youtu.be/hw17e1QJ294?si=gfJcylPSPfgYE_dT


 

जीव जडला प्रिये ...

   बबन आणि प्रसन्नकुमार या धुमाळ पिता-पुत्राच्या दोन मराठी गझला नुकत्याच  ध्वनिमुद्रित केल्या.पैकी बबन धुमाळची गझल दोन दिवसांपूर्वी फेसबुक व युट्युबला टाकली.आज प्रसन्नकुमारची गझल रसिकांकरिता सादर करीत आहे.दोन्ही गझला सोप्या शब्दात आशय मांडणाऱ्या थोड्या 'रोमँटिक' आहेत.त्यामुळे त्याला पूरक अशा सुरावटी येत गेल्या.प्राजक्ता सावरकर शिंदे आणि मयूर महाजन यांनी शब्दांना न्याय देत अतिशय सुंदर रीतीने त्या गायिल्या आहेत. संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनी दोन्ही गझला जरा वेगळ्या पद्धतीने हाताळल्या.त्यामुळे शब्द,धून,गायन आणि संगीत याचा अनोखा संगम यात झालेला आपणास दिसून येईल.
      तीव्र,कोमल स्वर सोबत सोबत घेतल्यामुळे नेहमीप्रमाणे ऐकायला सोपी पण गायला जरा कठीण अशी धून बनली आहे."जसा हात हातात धरला प्रिये" या पहिल्या मिसऱ्यातच याची चुणूक दिसते.'सां सांधधसांग' मींड घेऊन येणारे स्वर "जसा हात"ला अर्थ देतात तसाच "हातात"ला 'मध्यम' व "धरला" शब्दाला 'गांधार' हे स्वर स्थिरावून हात धरल्याचे सांगतो.पुढे "प्रिये" शब्दासाठी दोन्ही गांधाराचा वापर अर्थ स्पष्ट करून जातो.अश्याच प्रकारे पुढे एका स्वराची दोन्ही रूपे लागून लागून आपणास ऐकायला मिळतील. मग ऐका तर....

जसा हात हातात धरला प्रिये
तुझ्यावर तसा जीव जडला प्रिये

किती रोज चर्चा तुझी गावभर
उखाणा असा तू निवडला प्रिये

तुझी साथ जर लाभली नेहमी
कमी काय पडणार मजला प्रिये

अनोखी अशी एक झाली युती
इथे जिंकलेलाच हरला प्रिये

ध्वनिमुद्रण - राघवेन्द्र जेरे
मिक्सिंग, मास्टरिंग - अजय अत्रे,पंचम स्टुडिओ, पुणे.

●visit my yoytube channel & subscribe...
https://youtube.com/@geet-gazalrang?si=qsrDs9yWRxTSUkbe
.                   
#sudhakarkadamscomposition #composition #music #संगीतकार #ghazal #संगीत #गीतकार #मराठी


 

सुखही दुरून गेले...


तेव्हा तुझ्यासवे मी मस्तीत गात होतो
तू सोडले मला अन् स्वरही विरून गेले
ठेवून या व्यथेला सुखही दुरून गेले
जे जे घडावयाचे ते ते घडून गेले

लवकरच रसिकांच्या सेवेत....


 

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०२४...तीन गझला.

१. #तुझे_तुला_जगायचे...

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 
असेच दुःख झेलुनी सुखासवे हसायचे

कधी कुठे असायचे, कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फुलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच मग उगीच का रडायचे

अस्वस्थ सप्तकातली श्रुतीमधूर स्पंदने
हळूच घेउनी सवे मजेत गुणगुणायचे

मुक्या-भुक्या जगात या जिवंत पोळला तरी
अखेरला पुन्हा 'तिथे' चितेवरी जळायचे

२. #सोसण्याचा_सूर...

सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले
समजुनी घ्या,त्यास जगणेही उमगले

काय महिमा तुकोबाच्या अभंगांचा
बुडविली गाथा तरीही शब्द तरले

सैल करता गाठ जन्माची जराशी
वासनांचे बंध आपोआप गळले

चूक माझी की तुझी हे कळत नाही
पण मनाचे पेच मजला आज कळले

दुश्मनांशी लढत आलो जन्मभर...पण
त्यात अपुले पाहुनी अवसान गळले

गैरसमजातून घडते खूप काही
म्हणुन का दाखल करावे उगिच खटले

चाललो अंधारवाटेने जरी मी
पोचलो जेथे... तिथे मग नभ उजळले

३. #कळत_नाही...

काय होते रोज मजला कळत नाही
दुःखही आता जिवाला छळत नाही

काळजाचे सर्व कप्पे रिक्त असता
बावरे मन अजुनही का चळत नाही

नाक घासुन, पाय धरिले, पण तरीही
कोणताही नवस अपुला फळत नाही

जिंकलेली तू ...तरी मी हारलो ना
कळुन सारे आपणा का वळत नाही

का?कशाला?पुजत जावे देव-देवी
माणसांचे मरण जर का टळत नाही

बालपण,तारुण्यही संपून गेले
दंभरूपी सुंभ पण हा जळत नाही

https://gazalakar24.blogspot.com/2024/08/blog-post_24.html?m=0


 

आसवांना टाळणे आता नको...


आसवांना टाळणे आता नको
दुःख हे सांभाळणे आता नको

पोळुनी वैशाख गेला ते बरे
श्रावणाचे जाळणे आता नको

कोरडी वचने फुकाचे हुंदके
आणि माझे भाळणे आता नको

बोललो त्याला किती झाली युगे
हा अबोला पाळणे आता नको

गायिका - वैशाली माडे
गझल - दिलीप पांढरपट्टे
संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम
ध्वनिमुद्रण - स्टुडिओ 'बझ इन', मुंबई 
Buss In Recording Studio
मास्टरिंग - निरंजन जामखेडकर,मुंबई


 

Tuesday, September 10, 2024

साहित्य वऱ्हाड' पुरस्कार...

#यवतमाळ_जिल्हा_साहित्य_संघ आयोजित साहित्य सम्मेलनातील अत्यंत मानाचा असा #साहित्य_वऱ्हाड पुरस्कार...
                            ●-●
    माननीय श्री सुधाकर कदम #गझलगंधर्व आपण मराठी गझल गायन आणि साहित्य विश्वात अमूल्य योगदान देऊन सामाजिक सभ्यतेला व संस्कृतीला एक नवे वळण दिले आहे.आपल्या अमोल कार्याची दखल घेऊन आपल्या संगीत व साहित्य कलेचा गौरव करण्यासाठी स्व.सुहासभाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'साहित्य वऱ्हाड'  पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अभिमान वाटतो आहे आणि तो आपल्याला मिळतो आहे त्यामुळे तो या पुरस्काराचाही सन्मान आहे.आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपण।आपल्या मातीतील जनतेला आपल्या गझलेनी मंत्रमुग्ध करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आयोजक - यवतमाळ जिल्हा साहित्य संघ.


 

Wednesday, August 21, 2024

वर्तमानपत्रीय...यवतमाळ साहित्य सम्मेलन...







 

यवतमाळ जिल्हा साहित्य सम्मेलन, अध्यक्षीय भाषण...

 रविवार दि.१८ ऑगष्ट २०२४...

     सर्वप्रथम वऱ्हाडी कवी सुहास राऊत आणि अशोक मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या संमेलनास माझ्या हार्दिक शुभेच्छा जाहीर करतो.


     यवतमाळ जिल्ह्यात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.कारण यवतमाळ जिल्हा इतिहास संशोधक,साहित्यिक,

संगीतकार,लेखक,कवी यांची खाण आहे.इतकेच नव्हे तर राजकारण व समाजकारणातही यवतमाळ जिल्हा मागे नाही.आपल्या जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे.मुळात विदर्भ भूमीच फार प्राचीन आहे.महाभारतात उल्लेख असलेले रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर विदर्भात आहे.आणि अशा या विदर्भात आपले यवतमाळ आहे.

     प्रत्येक शहराचा आणि जिल्ह्याचा अभ्यास करतांना किंवा त्याबाबत माहिती घेतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या त्या जिल्ह्याला शहराला एक इतिहास असतो. यवतमाळ शहराला देखील इतिहासाची अशीच किनार लाभलेली आहे. या भागाने अनेक राजे महाराजांचा उदयास्त पहिला आहे. मौर्य , सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव वगैरे वगैरे, अकबराच्या दरबारातील इतिहासकार अबुल फजल याने लिहिलेल्या 'आईना-ए-अकबरी' मध्ये 'यवत' चा उल्लेख आढळतो तो 'योत' असा अपभ्रंश होऊन.

    पुढे १८५३ ला यवतमाळ जिल्हा ब्रिटीशांच्या सत्तेखाली आला.

१९०३ ला यवतमाळला हैदराबादच्या निजामाने करारावर घेतले होते. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.

     यवतमाळचे पहिले पत्रकार पृथ्विगीर हरिगीर गोसावी हे होते.त्यांनी 'हरिकिशोर' हे साप्ताहिक सुरू केले.पुढे चालून गोसावी आणि त्यांचा संप्रदाय' या शीर्षकाचा ग्रंथ लिहिला त्यामुळे यवतमाळच्या सुरुवातीच्या साहित्यिकांमध्ये यांचं नाव घेतलं जातं.

     लोकनायक बापूजी अणे यांचं संस्कृत भाषेतील १२ हजार श्लोकांचं 'तिलकयशोर्णव' नावाचं तीन खंडात  लिहिलेलं महाकाव्य आणि 'अक्षर माधव' त्यांच्या साहित्यसेवेची साक्ष देतं.

     प्रसिद्ध संशोधक य. खु. देशपांडे यांनी इतिहास संशोधनासोबतच, सांकेतिक लिपीचा केलेला अभ्यास आणि 'महानुभावी मराठी वाङ्मय', 'राजे उदारामांचा इतिहास' हे ग्रंथ लिहिले आहे.

     प्र. रा. देशमुख यांच्या 'ऋग्वेद आणि सिंधू संस्कृती' या मराठी व इंग्रजी भाषेतील आवृत्तीला देश-परदेशात लोकमान्यता मिळाली आहे.

     प्रसिद्ध कवी,कादंबरीकार पांडुरंग श्रावण गोरे यांचे 'वाणीचा हुरडा' व 'बोबडे बोल' हे काव्य संग्रह आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिलेली 'कात टाकलेली नागीण' ही कादंबरी प्रसिद्ध आहे.वऱ्हाडी बोलीमध्ये विशेषत: वऱ्हाडी ठसक्यात जेव्हा वऱ्हाडी संस्कार, रूढी-परंपरा, भलावण तसेच वऱ्हाडी वातावरण सांगितले जाते,; तेव्हा वऱ्हाडी गीत तयार होते -' असं ते म्हणायचे.माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे घरी यायचे.त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे.

     भाऊसाहेब पाटणकर हे यवतमाळातील गाजलेलं एक नाव आहे.त्यांचे 'दोस्तहो' आणि 'जिंदादिली' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.भाऊसाहेबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते.गणेशोत्सव,दुर्गोत्सवात आमचे कार्यक्रम व्हायचे.

     यवतमाळात नाट्यचळवळ पण जोरात होती.मला आठवते त्या प्रमाणे आशाताई बर्वे या चळवळीच्या प्रमुख होत्या.त्यांनी बसविलेल्या 'दिवा जळू दे सारी रात' या नाटकाला मी संगीत  दिले होते.दुसरे नाटक होते 'चांदणे शिंपीत जा' शिवाजी रंग मंदिर या संस्थेने बसविलेल्या या नाटकात 'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली' हे गाणे होते....ते गाणे पियानोच्या पार्श्वसंगीताससह रेकॉर्ड करायचे होते.यवतमाळात पियानो फक्त बिब्लिकल सेमीनरीमध्येच.म्हणून येथील चर्च मध्ये जाऊन माझ्या सहगायिका प्रमोदींनी मॅथ्यू यांच्या आवाजात रेकॉर्ड केले.

     दिघेकर, हरीश मानधना,जयंत भट,राजा सराफ ,श्रीकृष्ण मिश्रा,प्रवीण जानी,शशी देशपांडे,अशोक एकबोटे,राजन टोंगो, रोहिणी टोंगो,शंकरराव सांगळे,स्नेहलता 

बोबडे, बक्षी,अशोक आष्टीकर,महेश पटेल,गोपाळ पाटील,जयंत वर्मा,सुहास वराडपांडे, प्रशांत गोडे ,मुन्ना गहरवाल सतीश पवार ,अमित राऊत ,रवी ढगे ,अमर गुल्हाने, राजाभाऊ भगत, सदानंद देशपांडे ,

प्रशांत बनगिनवार ,काशिनाथ लाहोरे ,अजय शेटे हे चळवळीचे जुने नवे मानकरी.

     शरच्चंद्र टोंगो हे ही यवतमाळचेच.आमचे ते 'सर' होते.त्यांची स्वीकार' कादंबरी व 'नव्या डहाळ्या, नवे खोपे' हे नाटक गाजले होते.

     कासलीकर गुरुजी ,पनके गुरुजी,दादा पांडे यांनी यवतमाळातील संगीत क्षेत्र जिवंत ठेवून विद्यादानाचं फार मोठं कार्य केलं आहे.संगीत क्षेत्रातील माझी जडण-घडण वरील मंडळीमुळे व साहित्यिक जडण-घडण आदरणीय पांडुरंग गोरे काका,टोंगो सर, कळणावत सर यांच्यामुळे झाली आहे.आणि लेखक , कवी म्हणून घडविण्यात तरुण भारतचे संपादक मित्रवर्य स्व. वामन तेलंग यांचा फार मोठा वाटा आहे.

    प्राचार्य राम शेवाळकर यांनी विपुल साहित्य निर्मिती केली ओजस्वी, प्रवाही, प्रबोधनपर आणि रसपूर्ण व्याख्यानांसाठी ते प्रसिद्ध होते.

     'भाग्योदय कला मंडळ' संचालित यवतमाळातील पहिला आर्केस्ट्रा आम्ही १९६५ मध्ये स्थापन केला होता.या ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम विदर्भच नव्हे तर मराठवाड्यात सुद्धा गाजले होते.

     प्रसिद्ध वऱ्हाडी कवी माझा जिवलग मित्र शंकर बडे याचं वऱ्हाडी कवितेच्या क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचा 'बॅलिस्टर गुलब्या' हा प्रहसनात्मक एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर गाजला.विशेष म्हणजे हे नाव आर्णीच्या एका कार्यक्रमा नंतर मीच ठरवून यावर एक लेख लोकसत्तामधून प्रसिद्ध केला होता.शीर्षक होते ' 'ब्यालिस्टर' शंकर बडे.

     आर्णीला असताना माझ्या कवितांची सुरुवात विडंबन गीतांनी झाली.पुढे पुण्याला गेल्यावर नवीन काही सुचले की वृत्तबद्ध करून फेसबुकवर टाकायचो.तेथील प्रतिसाद माझ्यासाठी उर्जादायी ठरला, व तेथून माझ्या काव्यप्रवासाला सुरवात झाली.माझी पहिली रचना होती...


"सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी..."

नंतर षडाक्षरी,अष्टाक्षरी,कविता,गझल असे बरेच काही प्रकार उतरत गेले.


चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात

राबतो शेतात। सालोसाल...

जीवापलीकडे। मेहनत करी

तरीही भाकरी। मिळेचि ना...

ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी

लिही कादंबरी। मुंबईत...


      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा, कादंबरी, कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा मोठा विरोधाभास आहे! 


"घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल

कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल"


      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधणे हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम मी केले असावी असे मला वाटते.  सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती तशी 'कष्टवती' !    

मी शेतकरी कुटुंबातील असून माझ्या आयुष्यातील बराचसा काळ ग्रामीण भागात गेला आहे.


अवघं लाघव हिरवं तुडुंब

द्यावी वाटे येथे मनालाही डूब

भरल्या  शेताच दर्शन घडता

सृष्टीपुढे झुके आपसुक माथा


     बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे. 


"ना मी कृष्णा ना तू राधा

का व्हावी गे सावळ बाधा ?"


      ही राधा-कृष्णाची प्रीत आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर मी कवितेत करतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार यावरील दोन ओळी बघा... 


"ना महाभारत, न रामायण तरीही

जानकी अन् द्रोपदी लागे पणाला"


    मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असे तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू बनल्याचे कुठे कुठे दिसून येते.म्हणून जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे मला आवर्जून वाटते. शब्दाचे ऋण मानावे, 


आकळेल अर्थ

घालता आवर्त

एका एका आर्त

शब्दाचा तो...


शब्दाचा तो भाव

समजून घेता

संपेल आर्तता

मनातील... 


    कविता,कथा, कादंबरी फक्त ग्रांथिक भाषेतच असावी असे काही नाही.ग्रांथिक म्हटल्या जाणारी भाषा बोलीतूनच जन्माला आली आहे.तिची श्रीमंती बोलीभाषेमुळेच वाढली व वाढत आहे. विदर्भाचाच विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात गमतीशीर असा थोडा फार फरक पडलेला दिसतो.आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते.

    सर्वश्री द.बा. महाजन,बाबाजी दाते,आबासाहेब पारवेकर,बाबासाहेब घारफळकर,बळीरामपंत एकबोटे,,हरितक्रांतीची बीजे पेरणारे वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक,जवाहरलालजी दर्डा,भूगर्भ शास्त्रज्ञ वामनराव मेत्रे,सदाशिवराव ठाकरे,डॉ.भास्कर टेंबे, वा.ना.देशपांडे, दामले वकील,अरुण हळबे, डॉ.रमाकांत कोलते,शामा कोलाम,दीपक शिंदे,आजीबाई बनारसे,विदर्भवीर जांबुवंतराव धोटे,डॉ.बाबासाहेब नंदुरकर,दादासाहेब वगारे,मायदेवी भालचंद्र,डॉक्टर काणे,डॉ.शैलजा रानडे, गोविंद देशपांडे, गौतम सूत्रावे,माधव सरपटवार,शरद पिदडी, भाऊ मांडवकर, शिवा राऊत, दिनकर दाभाडे, मूळचे अकोल्याचे पण गेल्या चार वर्षांपासून पुसदवासी झालेले ज्येष्ठ गझलकार मित्र श्रीकृष्ण राऊत, दिलीप अलोणे, नीलकृष्ण देशपांडे, कलीम खान, मिर्झा रफी बेग, गजेश तोंडरे,रवी चापके, पुनीत मातकर, जयंत चावरे, विद्या खडसे, आनंद  गायकवाड ,प्रा. सागर जाधव, सिध्दार्थ  भगत,मसूद पटेल, गजानन वाघमारे सुरेश गांजरे, रमेश घोडे, विनय मिरासे,स्मिता गोरंटीवार, मीनाक्षी गोरंटीवार,आरती पद्मावार,कविता शिरभाते, निशा डांगे,अल्पना देशमुख - नायक, सोनल गादेवर,अशोक राणा,  विवेक कवठेकर, नितीन पखाले, मोरेश्वर चरेगावकर, अजय देशपांडे, स्वानंद पुंड,अ.भा. ठाकूर,देवेंद्र पुनसे यांनी आपापल्या क्षेत्रात लक्षणीय काम करून यवतमाळ जिल्हा सर्व दृष्टीने संपन्न केला आहे.

     संमेलन म्हणजे फक्त वाद नसतात, साहित्यातलं राजकारणही नसतं. मला वाटतं नवीन विचार पेरणारी प्रेरणास्थळं म्हणून आपण या संमेलनाकडे पाहावं. हा चष्मा सकारात्मकतेचा असला तरच पुढच्या काळात या मंथनातून साहित्यातील नव्या सृजनाचं 'अमृत' येणाऱ्या पिढीला मिळत राहते.एखाद्या लेखकाच्या लेखनउर्मीला ऊर्जा आणि लेखनविषयांना विविधता मिळण्यासाठी कर्तृत्ववान आणि सर्वमान्य असणाऱ्या असामान्य व्यक्तीने केलेले आवाहन महत्त्वाचा प्रेरणास्रोत ठरते.

आणि शेवटी....

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे


कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे

खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे


सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे

पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे


मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या

म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे


हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही

कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे ?


-गझलगंधर्व सुधाकर कदम



Saturday, August 3, 2024

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 

संध्येच्या शामल डोही



गायिका राधिका ताम्हणकर हिच्या आवाजात आज दोन गाणी ध्वनिमुद्रित केली. "काय होते या मनाला सांजवेळी" हे मी लिहिलेले आणि नागपूरच्या कवयित्री स्व.श्रद्धा पराते यांनी लिहिलेले "संध्येच्या शामल डोही".
पैकी "संध्येच्या शामल डोही"चा मुखडा,
 मिक्सिंग, मास्टरिंग होण्या अगोदर सादर..
     विशेष म्हणजे हे गीत मी आकाशवाणी नागपूरचा ग्रेडेड आर्टिस्ट असताना १९८० मध्ये स्वरबद्ध केले होते.आज ४४ वर्षांनंतर त्या सुरावटीचे चीज झले.

प्रतिक्रिया अपेक्षित!

●headphone please...
#sudhakarkadamscomposition #


 

Thursday, July 25, 2024

कविता जगणारी माणसं ! भाग ३.


महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन.
#गझलगंधर्व  - सुधाकर कदम.
यांच्या दीर्घ मुलाखती मधील
#तृतीय आणि शेवटचे पुष्प...

विशेष आभार - 
गायक - मयूर महाजन.
तबला वादक - किशोर कोरडे.

●आवडल्यास चॅनेलला like, share आणि subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद!
   🙏
●headphone please...


 

कविता जगणारी माणसं ! भाग २.


महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन.
#गझलगंधर्व  - सुधाकर कदम.

यांच्या दीर्घ मुलाखती मधील...#द्वितीय_पुष्प 

विशेष आभार - 
गायक - मयूर महाजन.
तबला वादक - किशोर कोरडे.

●आवडल्यास चॅनेलला like, share आणि subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद!
   🙏
●headphone please...


 

कविता जगणारी माणसं ! भाग १.


महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन
#गझलगंधर्व  - सुधाकर कदम.
यांच्या दीर्घ मुलाखती मधील... #प्रथम_पुष्प 

विशेष आभार - 
गायक - मयूर महाजन.
तबला वादक - किशोर कोरडे.

●आवडल्यास चॅनेलला like, share आणि subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद!
    🙏🏻
●headphone please


 

Wednesday, May 15, 2024

कं-दर्प


     सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे.त्यामुळेच काल नाशिकला झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'कांद्यावर बोला'  असे म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

     कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार समजल्या

 जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.

      १९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला होत्व. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.

     कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.

     स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी,  वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा 

कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.

       दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे  विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प  कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.

     कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?

-सुधाकर कदम

१६ मे २०२४

Sunday, May 12, 2024

मध्यस्थ...

 

      चाटूगिरी या एका शब्दामुळे चाटू, चमचे, पळी, सराटा बगैरे सर्व चमचा-कुळातील वस्तूंच्या बाबतीत एक वेगळाच समज मानव प्राण्यांमध्ये तयार झालो आहे. ढवळाढवळ करणाऱ्या या वस्तूंना हीन लेखण्याचा माणसाचा प्रयत्न मुळातच निषेधार्ह आहे. खरे म्हणजे हात व ज्यात ढवळाढवळ करायची त्या वस्तूमधील मध्यस्थ म्हणजे चमचा-कुळ होय. पण माणसाच्या नको तिथे ढवळाढवळ करण्याच्या सवयीमुळे व नको तिथे 'चाटूगिरी' करण्याच्या पद्धतीमुळे या मध्यस्थांवर फालतूचे आरोप लागून बदनामी होत आहे. 'चाटणे' या शब्दावरून 'चाटूगिरी' हा शब्द आला असला, तरी गरम द्रावणात फिरवल्या जाणाऱ्या पळीलाच आजकाल चाटू म्हणायला लागल्यामुळे समस्त चमचावंशज अत्यंत नाराज झाले आहेत.वास्तविक चमचा-कुलोत्पन्न समस्त वस्तूंचे मानव जातीवर असंख्य उपकार आहेत. कारण खाद्यपदार्थ तयार करताना गरम गरम पदार्थांमध्ये फक्त हीच मंडळी ढवळाढवळ करू शकते. इतरांची बिशाद नाही. ही मंडळी नसती तर माणसांचे किती हाल झाले असते ! अन्न शिजतानाच या मंडळींचा उपयोग होतो असे नाही; आजकाल तर, जेवतानाही काटे-चमचे वापरण्याचा प्रकार रूढ होत चालला आहे. केळीच्या पानावरील गरमसूत जेवण जाऊन चिनीमातीच्या 'डीश' मधील अन्न काठ्या-चमच्याने खाण्यांचे दिवस आले आहेत.

      तर अशा या हाता-तोंडाच्या मध्यस्थांवरून  माणसातील मध्यस्थांना यांची नावे देणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का? आणि माणसातील मध्यस्थांनाही दोन्ही बाजूकडून चटके बसत नाही का? उलट हातातोंडातील मध्यस्थांना फक्त एकीकडचाच चटका बसतो. तोंड फुंकर मारायला तयार असतं. पण माणसातील मध्यस्थांना तर कोठून कसे चटके बसतील, हे सांगताच येत नाही. त्यातल्या त्यात लग्नातल्या मध्यस्थांबद्दल तर न बोललेलेच बरे !

     कचेऱ्यांमध्ये सुद्धा अशा मध्यस्थांची फार गरज असते. 'बॉस' गरम असला की मध्यस्थच त्याला थंड करू शकतात. थंड करताना त्याला बॉसची स्तुती करावी लागते. नसलेल्या गुणांची तारीफ करावी लागते. पण म्हणून काय त्याला 'चमचा' म्हणायचे ? वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे, त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान हलविणे, भाजीपाला नेऊन देणे, सिगारेट पेटवून देणे, वाढदिवसाला घरची सर्व कामे करून भेटवस्तूही देणे, या माणूसकी, बंधुभाव, प्रेम, त्याग शिकविणाऱ्या गोष्टी अंगिकारल्याबरोबर त्याला चमचा, चाटू वगैरे उपमा देणे बरोबर आहे का ? उलट अशी माणसे आपल्याजवळ नसल्यामुळे आपले किती नुकसान होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा ! कारण बस, रेल्वेचे आरक्षण; शाळा-कॉलेजमधील प्रवेश,  पुढाऱ्यांच्या भेटी, साहेबाकडील जिल्हा व तहसील कचेऱ्यातील काम, कोर्टातील व पोलिस ठाण्यातली कामे आणि काळ्या बाजारातील वस्तू वगैरे मिळवायला मध्यस्थाशिवाय पर्याय नसतो. 'अडत्या' नामक एक मध्यस्थ तर धान्यबाजारातील देवाप्रमाणे असतो. शेतकरी व खरेदीदार यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे हा मध्यस्थ ! पण ह्याला अडत्या किंवा दलाल असे म्हणतात. तर मंडळी! या मध्यस्थांशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. दिल्लीत तर ह्यांनाच पॉवर-ब्रोकरही म्हणतात. अशी एकूण वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात तर राजकारणी मंडळीत प्रत्येकागणिक एक दलाल म्हणजे मध्यस्थ आढळतो. एकूण झालेल्या खरेदीमध्ये मोठ मोठे मध्यस्थ दलाली खाताना दिसून आले आहेत. पण ही दलाली मात्र देशाच्या दृष्टीने घातक ठरून सरकारी तिजोरीला मोठे खिंडार पाडणारी ठरते.  तसेच बँकांचे कर्ज न फेडता ते बुडवून पळून जाणारी मंडळी सुद्धा देशाची गुन्हेगार  आहे.या लोकांना जेरबंद करून तो पैसा का वसूल केल्या जात नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.पण त्यासाठी  लागणारा बुद्धिमान मध्यस्थ त्यांच्या जवळ नसल्यामुळे नुसताच प्रश्न उभा राहतो. आणि प्रश्न फक्त उभा राहून सुटत नसतो. तो सोडवावा लागतो. पण सोडवल्याही तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा सोडवणारी मंडळी 'चोर चोर मौसेरे भाई' नसतील तेव्हा ! राजकीय दूधभाऊ तर एका स्तनातले दूध तू पी. दुसऱ्या स्तनातले मी पितो, असे म्हणून देशाला शुष्क करीत असतात.

     सध्या निवडणूक सुरू आहे.निकाला अगोदर मतदारांना पैसे देऊन फितविण्याऱ्या व निकाल लागल्यावर निवडून आलेल्यांची खरेदी-विक्री करण्याऱ्या राजकीय मध्यस्थांचा धंदा तेजीत येऊन त्यांची चांदीच चांदी होते! 

     खरे म्हणजे प्रगल्म लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून आपणच आपला डिंडीम पिटून, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी राजकीय दलालांच्या... माफ करा हं! राजकीय मध्यस्थांच्या हस्ते 'मतपरिवर्तन' (साम, दाम, दंड, भेदाने का होईना) करून आपणच आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा गळा घोटत असतो. षण राजकारण करायचे म्हटले की हे सर्व करावेच लागणार ! शेषन् सारखा मध्यस्थही जिथे हात टेकतो तिथे इतरांचे काय ?

     राजकारणाचा धंदा बद करणारा, चाटूगिरीपासून पुढाऱ्यांना दूर ठेवणारा, कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणारा, भारताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्याला रोखणारा, सर्वसामान्य नागरिकांबद्दल आत्मीयता बाळगणारा मध्यस्थ या भारतवर्षी केव्हा जन्म घेईल कुणास ठाऊक!

Wednesday, May 8, 2024

सामना



     लोकसभेचा सामना जाहीर झाल्याबरोबर  भारतातील समस्त राजकीय संघ धूळ झटकून कंबर कसून मैदानात उतरले आहे. हा सामना जरा लवकर व्हावा अशी काही संघांची इच्छा होती. तर जुन्या विजेत्या संघाला तयारी व 'साफसफाईकरिता' वेळ मिळावा म्हणून हा सामना उशीरा व्हावा असे वाटत होते. आपाल्या कप्तानपदाला शह देणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर पाठवून नवीन खेळाडूंना वाव देवून आपले कप्तानपद कायम ठेवण्याकरिता हा वेळ मिळणे आवश्यक होते. यात ते काही अंशी सफलही झाले.
     या सामन्यात अखिल भारतीय स्तरावरील सर्व संघ खेळणार असले तरी त्यातील दोनच संघ अत्यंत बलाढ्य  असल्यामुळे विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार यावर प्रेक्षकांमध्ये करोडो रूपयांचा सट्टा लावणे सुरू झाले आहे. (खेळावर लावलेला सट्टा, जुगार या संज्ञेत मोडत नसल्यामुळे यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करायला हाकत नाही. "जमी तो जमी, नहीं तो मोहंमद शमी !") या सामन्याचे वैशिष्ठ्य म्हणजे संघाचा विजय हा खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांवर अवलंबून असतो. ज्या संघावर प्रेक्षक खूष तो संघ जिंकणार. पण प्रेक्षक मात्र कोणावर खूप आहे या बाबतीत ताकास सूर लागू देत नाही.
     या सामन्यातील प्रत्येक संघ आपला संघ कसा चांगला आहे याचे तुणतुणे सतत वाजवून आम्ही जिंकलो तर काय काय करणार याचे (फुटके) ढोल बडवत असतात. पण आजकाल प्रेक्षकही या दोन्ही आवाजाला सरसावल्यामुळे मुळीच दाद देत नसल्याचे दिसून येते. था देशब्यापी सामन्याला अमाप खर्च येतो. खेळ जरी राजकीय संघ खेळणार असले व विजयी संघ जरी पाच वर्षे मलिदा खाणार असला, तरी हा खर्च मात्र प्रेक्षकांच्या पैशातून होणार असतो. ही परंपरा फार प्राचीन असल्यामुळे यात बदल घडून येण्याची शक्यता फार कमी आहे. तरीपण कोणे एके काळी शेषन नामक मुख्य पंचाने सामन्याच्या सुरवातीला होणाऱ्या धुळवडीच्या मैदानी आतिषबाजीवर बंदी घातत्यामुळे कोट्यावधी रूपये वाचले होते असे म्हणतात. पण त्यामुळे सर्व संघांना झीम्मा, फुगडी या बायंकी खेळावर समाधान मानून दुधाची तहान ताकावर भागशवी लागली होती अशी वदंता आहे. यावेळी मात्र एका स्त्री खेळाडूला तिच्याच संघातल्या लोकांनी फुगडी घालायला मनाई केल्यामुळे तिने खो-खो खेळायला सुरवात केली आहे.
     स्त्री व पुरुष खेळाडूंनी एकत्र खेळण्याचा हा एकमेव खेळ असल्यामुळे समानतेचे युग आल्याची सर्वांना खात्री पटते. प्रेक्षक वर्गही सामन्याच्या दिवशीपर्यंत चेअरींग' देवून खेळाडूंना प्रोत्साहीत करीत असतात. या खेळात प्रत्यक्ष सामन्यापेक्षा अगोदरच्या खेळात अधिक मजा येत असल्यामुळे प्रेक्षक व खेळाडू आपले एकमेकावर किती प्रेम् आहे हे दाखविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतांना दिसून येतात. खेळ सांघिक जरी असला तरी प्रत्येक खेळाडूला एक एक मैदान वाटून देवून त्याला एकटे सोडण्यात येते. या मैदानात प्रत्येक संघाचा एक एक खेळाडू उत्तरलेला असतो. प्रत्येक  संघातील खेळाडूंना विरुद्ध संघाच्या खेळाडूंवर होळीच्या बोंबांप्रमाणे बो बो बोंबा मारायचे प्रशिक्षण खास ढंगात दिल्या जात असल्यामुळे 'रसिक' प्रेक्षकांना  'शिमग्याची' मजा लुटायला मिळते,
     ते काहीही असले तरी यावेळी  प्रेक्षकांना मात्र ते आपल्या खऱ्या-खुऱ्या मायबापापेक्षाही जास्ती मान देवून, सामना जिंकून देण्याची विनंती करीत असतात. या सामन्यातील खेळाडू आपआपल्या संघाच्या रंगसंगतीचे कपडे वापरत असल्यामुळे लात, निळा, भगवा, तिरंगी, लात-हिरवा,पिवळा अशा विविध रंगाचे मिश्रण पाहण्याचा अभूतपूर्व योग समस्त भारतवासीयांना दर निवडणुकीत बघायला मिळतो.यातील काही खेळाडू सरावासाठी आलेला निधी हडपून बसतात. त्यामुळे संघांतर्गत दुफळी सुरू होते.पण वरची फळी जर मजबूत असली तर या दुफळीचा फारसा परिणाम होत नाही.
      सध्या एकमेकांच्या संघातील खेळाडू चोरून सामना रंगविण्याचा नवीनच प्रकार सुरू झाला आहे.परंतू या प्रकारामुळे देशातील समस्त संघ मेटाकुटीला आले असून मूळ खेळाडू नाराज होऊन लाल-हिरवे होऊन 'आवजी-जावजी हाय हाय'चे नारे लावताना दिसत आहे.या 'आवजी-जावजी' प्रकारामुळे शीतयुद्ध सुरू झाले आहे.तसेच संस्थांतर्गत रंगयुद्धही सुरू झाले असून 'आवजी-जावजी'वाल्या खेळाडूंना परत पाठविण्याची तयारी समस्त भारतवासी प्रेक्षक करीत असल्याचे दिसत आहे.पण हे काही बरोबर नाही.याला 'स्पोर्ट्समन स्पिरिट' म्हणत नाही.खेळाडू तो खेळाडू, मग तो कोणत्या का संघाचा असेना त्याला 'चेअरींग' दिलेच पाहिजे.

*** *** आगे बढो हम तुम्हारे साथ हय....
भारत माता की जय!!!


 

Saturday, April 20, 2024

लोपला चंद्रमा...मराठी गझल.


     डॉ.श्रीकृष्ण राऊतांची 'लोपला चंद्रमा' ही वेगळ्या ढंगात स्वरबद्ध झालेली बहुप्रतिक्षित गझल पद्म श्री सुरेश वाडकरांच्या मधाळ आवाजात नुकतीच ध्वनिमुद्रित केली.ही गझल माझ्या प्रत्येक कार्यक्रमात 'वन्समोअर' घ्यायची. खरे तर ही सुरावट जवळ-जवळ ४२/४४ वर्षांअगोदरची आहे.पण सुरेशजींनी एकदम नवी करून तिला वेगळीच झळाळी दिली.बऱ्याच वर्षात अशा प्रकारची रचना रसिकांना ऐकायला मिळाली नसावी असे मला वाटते.
       संगीत संयोजन जयपूरचे ऋषिकेश सोनी यांचे असून, यातील ठसकेदार तबला व ढोलक संगत किशन कथक (जयपूर) आणि बहारदार बॅंजो वादन फल्ला भाई (अलवर) यांचे आहे. 'व्हाईस रेकॉर्डिंग' मुंबईच्या आजीवासन स्टुडिओमध्ये केले असून,बाकी ध्वनिमुद्रण,मिक्सिंग, मास्टरिंग 'रॅप' स्टुडिओ जयपूर,राजस्थान येथे केले आहे.
 #sudhakarkadamscomposition

●headphone or earphone please


 

Tuesday, April 16, 2024

आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज... डॉ.श्रीकृष्ण राऊत.


         १९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही.मंगेश पाडगावकरांचा 'गझल'(१९८१) सुरेश भटांचा ’एल्गार’ (१९८३) खावर यांचा 'गझलात रंग माझा '(१९८५)आणि 'माझिया गझला मराठी'(१९८६)आणि श्रीकृष्ण राऊत यांचा 'गुलाल'(१९८९) हे गझलसंग्रह याच दशकात प्रकाशित झालेत.ह्याच दशकात सुरेश भटांच्या ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ ह्या कार्यक्रमांना अगदी तिकिट विकत घेऊन रसिक श्रोत्यांनी गर्दी केली.मराठी गझलचा प्रचार-प्रसार करणारं एक गझलव्रत ह्या काळात सुरेशभटांनी घेतलं होतं. गावोगावच्या नव्याने लिहू लागलेल्या गझलकारांना पत्रातून-प्रत्यक्ष भेटीत सुरेश भट त्यांना इस्लाह देत. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात नवोदितांच्या गझलांना प्रसिद्धी देणारी सदरे ह्याच दशकात प्रसिद्ध होत होती.गझलने भारावलेल्या सांस्कृतिक वातावरणाची दखल घेण्यासाठी ठाण्याच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद ठेवल्या गेला.
         १९८० - १९९०ह्या दशकाच्या आरंभीच टेप रेकॉर्डर आणि कॅसेट संस्कृती आम होऊ लागली होती.'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' ही गुलाम अलींची गझल एवढी लोकप्रिय झाली की तिला 'निकाह' चित्रपटात बॅकग्राऊंडला का होइना पण स्थान मिळाले. मराठी गझलगायनाच्या जन्मासाठी आवश्यक असे सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले होते. संगीताची उत्तम जाण असलेले सुरेश भट मराठी गझलेच्या प्रसारासाठी गुणी गझलगायकाच्या शोधात होते.त्याच दरम्यान त्यांची सुधाकर कदमांची भेट झाली आणि मराठी गझल गायनकलेला पहिला गायक-संगीतकार मिळाला.
प्रस्तुत ग्रंथातील तीन लेख ह्या संदर्भात अतिशय महत्वाचे आहेत.
           1.'सुरेश भटांसोबतचे दिवस ' ह्या सुधाकर कदम ह्यांच्या लेखात १९७७- ७८ ला झालेल्या सुरेश भटांच्या पहिल्या भेटीपासूनच्या बारीक-सारीक घटनांचा सविस्तर तपशील आपल्याला वाचायला मिळतो.भट आता हयात नाहीत आपल्या करिअरसाठी त्यांच्या नावावर 'काहीही ' खपवण्याचे प्रयत्न काही व्यावसायिक कलावंतांनी केलेत.त्यामुळे हा तसाच प्रकार असावा अशी शंका येणे रास्त आहे.पण दुस-या बाजुने त्या काळातली सुरेश भटांनी सुधाकर कदमांना लिहिलेली पत्रे वाचली की ह्या शंकाचे निरसन होते.त्यातल्या काही महत्वाच्या पत्राच्या फोटो इमेजेस ह्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.त्या काळात पु.ल.देशपांडे,व.पु.क¬ाळे यांच्या कथाकथनाच्या आणि सुरेश भटांच्या काव्यगायनाची कॅसेट पुण्याच्या अलुरकर कॅसेट कंपनीने काढली होती.त्या कॅसेट कंपनीकडून सुरेश भटांच्या गझला सुधाकर कदमांच्या चालीत काढण्याचे चालले होते.अरेंजर म्हणून आनंद मोडक सहाय्य करतील असा उल्लेख १९.१२.८१ ला सुरेश भट यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
कुठल्या तरी कारणाने ही कॅसेट निघाली नाही.पण तो पर्यंत सुरेश भट यांच्या दहा-बारा गझलांच्या चाली सुरेश भटांना आवडतील अशा गझलगायन शैलीत सुधाकर कदमांनी तयार केल्या होत्या.

            2.'माझी मराठी गझलगायकी' ह्या आपल्या दुस-या लेखात सुधाकर कदमांनी आपल्या वडिलांकडून १९५८ ला हार्मोनियम शिकले. नंतर तबला,गिटार,सरोद अशी वाद्ये शिकल्याचा उल्लेख आहे.मी तेव्हापासूनच गझल गायला सुरुवात केली होती.असेही ते म्हणू शकले असते.पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही.स्वतःच्या परिपक्व चाली घेऊन आपला जाहीर कार्यक्रम ज्या दिवशी पहिल्यांदा सादर करता ते तुमचे रसिकमान्य असलेले पहिले गझलगायन ह्याची नम्र जाणीव त्यांना आहे.
           3.'मराठी गझलगायनाविषयी थोडेसे'ही सुरेश भटांची प्रतिक्रिया 'केसरी'त प्रकाशित झालेली आहे.सुधाकर कदमांचे गझलगायन हे भावगीत गायनापेक्षा कसे वेगळे आहे.हे सुरेश भट यांनी अधोरेखित केले आहे. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प मध्ये झालेल्या सुधाकर कदमांच्या 'अशी गावी मराठी गझल' ह्या कार्यक्रमाचे निवेदन दस्तुरखुद्द सुरेश भट ह्यांनी केले होते.त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो ह्या ग्रंथात दिलेला आहे.तसेच ह्या कार्यक्रमातील सुरेश भट यांच्या निवेदनासह सुधाकर कदमांनी गायिलेल्या इतर अनेक गझला-गीतेही अभ्यासक - संशोधकांसाठी यु ट्युबला उपलब्ध आहेत. सुधाकर कदम हे 'महाराष्ट्राचे मेहदी हसन'आहेत असा अभिप्राय सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात ह्या ग्रंथात आपल्याला सापडतो.
सुधाकर कदम तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांच्या प्रेमाखातर सुरेश भट अनेकदाआर्णीला मुक्कामी रहायचे. 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची '(दि. ९/९/¬८१-आर्णी)'हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी' (दि. १२/९/८१-आर्णी) 'येणारा दिवस मला हेटाळत हसणारच'( ३०/१२/¬ ८१-काठोडा) ह्या प्रसिध्द गझला आणि 'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद '( १२/९/८१ -आर्णी) ही प्रसिद्ध नात सुरेश भटांनी आर्णी-काठोडा मुक्कामातच लिहिल्या आहेत. भटांच्या हस्ताक्षरातील ह्या रचनांचे फोटो ह्या ग्रंथात आहेत.
त्यातील गझलसंहिते सोबतच स्वरांच्या काही नोटेशनच्या नोंदी सुधाकर कदमांच्या हस्ताक्षरात आढळतात. गझल लेखनासोबतच त्या गझलची चाल बांधण्याच्या प्रक्रियेत भट आणि कदम हे दिग्गज एकाचवेळी सहभागी असण्याचा तो सुवर्णक्षण होता.

ह्या कालखंडात असे भाग्य सुधाकर कदमांशिवाय अन्य गायकाला लाभले नाही.
म्हणूनच हा ग्रंथ आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज ठरतो.
           अगदी बालपणी तबला,संवादिनी अशी वाद्ये शिकणारे सुधाकर कदम पुढे गायनाकडे वळले.गायनासोबत पुढे मेंडोलिन,अॅकाॅर्डियन¬,संतुर,सरोद अशी वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा झाला.गायन की वादन ह्या द्वैतातून त्यांना पं.जितेन्द्र अभिषेकी बुवांनी सोडवले.आणि त्यांची गायनाची वाट नक्की झाली. वरील सर्व वाद्यांच्या वादनप्रभुत्वाने त्यांना संगीतकार म्हणून परिपक्व केले. 
            सुधाकर कदम हे भाग्यवान आहेत, ते ह्या अर्थानं की त्यांचे गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर ह्यांचा लेख जसा ह्या ग्रंथात आहे तसाच त्यांची शिष्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. सीमा काशेट्टीवार ह्यांचाही लेख आहे.कोणत्याही कलेत कलावंताचे योगदान हे त्या कलावंताच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी सांधलेले असते. ह्या दुव्यालाच आपण परंपरा म्हणतो.अशा परंपरेच्या संदर्भातच त्या कलावंताच्या योगदानाचे मूल्यांकन होऊन त्या कलावंताचे ऐतिहासिक स्थान प्रस्थापित होत असते.ह्या दृष्टीने मला हे दोन्ही लेख त्यातील प्रामाणिक भावनाभिव्यक्तीच्या अंगाने अघिक मोलाचे वाटतात.
          यशवंत देव, अशोक पत्की,सुरेश वाडकर,वैशाली माडे,अनुराधा मराठे ह्या संगीत आणि गायन क्षेत्रातील नामवंतानी सुधाकर कदमांच्या चालींचा मुक्तकंठाने केलेला गौरव हा प्रस्तुत ग्रंथाचा आत्मा आहे.
           राम जोशी,सौ.रजनी करकरे-देशपांडे,सीमा गादेवार,मधुरिका गडकरी ह्या संगीतातल्या जाणकारांनी,सुधाकर कदमांनी बांधलेल्या गझलांच्या बंदिशीतले संगीतसौंदर्य आस्वादकतेने त्यांच्या लेखात अनावरित केले आहे. हे सर्व लेख अभ्यासकांनी,रसिकांनी¬ मुळातूनच वाचावेत असे आहेत.
          १९८० ते १९९० ह्या दशकातील सुधाकर कदमांच्या मराठी गझलगायनाच्या कारकिर्दीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या दोन मान्यवरांनी लिहिलेले लेख ह्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्ता विशद करणारे शीलालेख ठरावेत इतके मौल्यवान आहेत.ते दोन मान्यवर आहेत ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर.ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षितांनी वेगवेगळ्या निमित्ताने दोन लेख लिहिलेत.
त्यातला पहिला लेख दै.सकाळ मध्ये लिहिला,त्याला निमित्त होते सुधाकर कदमांच्या कोल्हापूरात संपन्न झालेल्या गझलमैफिलीचे .दुसरा अग्रलेख दै.लोकमत मध्ये त्यांनी लिहिला त्याला निमित्त होते सुधाकर कदमांना पुण्यात 'गझलगंधर्व' उपाधी प्रदान करण्यात आली,त्या सोहळ्याचे.
          ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मराठी गझलच्या उगमाचा,विकासाचा आणि संवर्धनाचा चालता-बोलता इतिहास आहेत.सुरेश भट-सुधाकर कदमांच्या अनेक मैफिलींचे नेटके निवेदन त्यांनी केले आहे.अगदी सुरेश भटांच्या मांडीला मांडी लावून प्रथमतः मराठी गझलगायनाची मुहूर्तमेढ रोवणा-या सुधाकर कदमांचे योगदान वैराळकरांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहे.
         कदमांच्या वाढदिवशी १३ नोव्हेंबर २००९ ला नेटवरील 'गझलकार' ब्लाॅगवर त्यांचा एक विशेषांक मी संपादित करून प्रकाशित केला होता.त्यातील सर्व लेख ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.तसेच प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,डॉ.राम पंडित,डॉ.किशोर सानप,शाहिर सुरेशकुमार वैराळकर,दिलीप पांढरपट्टे,म.भा.चव्हाण,दत्ता जाधव ह्यांनी लिहिलेल्या लेखांनी हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

        इंटरनेटचे तंत्रज्ञान सुधाकर कदमांसारख्या कितीतरी कलावंतांसाठी वरदान ठरले आहे. 'गझलगंधर्व' 
(www.gazalgazal.blogspot.com) हा  कदमांचा ब्लॉग नेटवर आहे. त्यात बेगम अख्तर -मेहदी हसन - 
गुलाम अली -मधुराणी -जगजित सिंग यांच्या गझलांविषयी गायन कलेच्या अंगाने कदमांनी लिहिलेले लेख आहेत.१९८६ ते १९९६ या काळात हाथरसच्या  
'संगीत ' मासिकातील  'नग्म- ए - ग़ज़ल ' आणि  'अपने अपने गीत ' ह्या दोन सदरात  उर्दू -हिन्दी गझल - गीतांना कदमांनी लावलेल्या चालींची   नोटेशन्स प्रसिद्ध झाली होती . ती अभ्यासकांना  त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळतात. तसेच  कदमांनी गायिलेल्या गझला - गीते यू ट्युबवर रसिकांसाठी पहायला-ऐकायला  उपलब्ध आहेत.
इंटरनेट नसते तर  कदमांच्या योगदानाचा हा  अमूल्य खजिना काळाच्या पोटात कधीच गडप झाला असता.
        वादन-गायन-लेखन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या सुधाकर कदमांच्या कारकिर्दीचा आलेख वाचकांसमोर मांडताना मला संपादक म्हणून समाधान आहे.
आणि 
मित्र म्हणून अभिमानही.

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत
जठारपेठ,
अकोला
------------------------------------------------------------------
.                   
                        प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची ही पोस्ट वाचल्यानंतर सुधाकर कदम यांच्याविषयी, त्यांच्या आठवणीविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाहीये. मला वाटतं, मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हिच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही.

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची पहिली नज़्म होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 
- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकांर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं. 
- [ ] आज कवी प्रा.श्रीकृष्ण राऊत यांची सुधाकर कदम यांच्यावरील ही सुरेख पोस्ट वाचल्यावर आपसूकच ३८ वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं....

- Ashish Jadhao
-------------------------------------०------------------------
● अक्षर मानव प्रकाशन,
पुणे
किंमत-पोस्टेजसह ३००रु.
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 
8888858850 गुगल पे.
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.


 

Friday, April 5, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक ३०)

       १९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे, म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेध भट आणि मी,

आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यावर माझे पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून राज्य स्तरावरील प्रशिक्षण वर्गात संगीत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.
      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला #गझलकट्टा  आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंदीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाल गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अल्बम करण्याची कल्पना आली.आणि मग '#खूप_मजा_करू' हा बालगीतांचा अल्बम आकाराला येऊन फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.
      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायचची.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची आशा पांडेंशी ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.
     मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अल्बम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला .वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे. हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

●'अर्चना' मधील गीतांची युट्युब लिंक खाली देत आहे.आनंद घ्यावा....
https://youtu.be/DKkZmnDd-WU?si=aY-YTRfHogl_zodw

-----------------------------------------------------------------------
#अर्चना तयार होतानापासून लोकार्पणापर्यंतची काही क्षणचित्रे...

पुण्यातील वारजे येथील माझ्या घरी शौनक अभिधेकींची प्रॅक्टीस.....



प्रकाशन सोहळा - डावीकडून गायिका अनुराधा मराठे,कवी/संगीतकार सुधीर मोघे,कवी गंगाधर महांबरे,अस्मादिक,गायक शौनक अभिषेकी.

'अर्चना' मधील भक्तीगीतांचे सादरीकरण...



रसिकांनी तुडुंब भरलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,पुणे.


 

Wednesday, March 27, 2024

आठवणीगील शब्द स्वर (लेखांक २९)

.                          #प्र_मुख_पा_हुणा

     माझ्या आयुष्यातील ३१ वर्षे आर्णी या गावी संगीत शिक्षक म्हणून गेली.या ३१ वर्षांत परिसरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना व अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळाचे परिक्षा केंद्र', नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय' कला मंडळ, संगीत प्रेमींसाठी 'सरगम', आमची शाळा माहुरच्या दत्त शिखराचे महंत दत्ताराम भारती यांच्यामुळे सुरू झाली म्हणून 'दत्त जयंती उत्सव समिती', 'तालुका पत्रकार संघ' 'शिवजयंती उत्सव समिती' 'शिवसेना शाखा' इत्यादींची स्थापना.समाजकारण,

पत्रकारिता,वर्तमानपत्रासाठी स्फुट लेखन,मराठी गझल गायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम, हिंदी/मराठी कवी संमेलने,गझल गायन स्पर्धा,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,विविध सांगीतिक कार्यक्रम  अशी अनेक आयोजने वगैरे वगैरे उपद्व्याप केलेत.

     कलाकारांच्या आयुष्यात कोणत्या वेळी कोणता अनुभव वाट्याला येईल हे सांगता येत नाही.वरील सर्व प्रकारांमुळे नावारूपास आल्यावर  घडलेला एक किस्सा ऐकण्यासारखा आहे.एकदा एका महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावणे झाले. संगीतकारांनाही चांगले दिवस येत असल्याचे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! कार्यक्रमाच्या दिवशी मी छानसे कपडे घालून, अत्तर वगैरे फवारून समारंभस्थळी पोहचलो! तर अध्यक्षच बेपत्ता। एका तासाने अध्यक्ष आल्यावर उद‌घाटन सोहळा आटोपला. भाषणबाजी झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आयोजकांनी मला थांबवून भावगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून माझी पदावनती करून टाकली. थोडा राग आला पण म्हटले 'चलता है।' थोड्याच वेळात स्पर्धा सुरू झाली. पण हार्मोनियम वादक नदारद ! फक्त तबल्यावर गाणे कसे म्हणावे हा प्रश्न स्पर्धकाला पडला. तेवढ्यात आयोजक पुन्हा माझ्याकडे आले व हार्मोनियम वाजवायची विनंती करायला लागले. पण मला 'पेटकर' बनविण्याचा त्यांचा धूर्त बेत हाणून पाडून मी तेथून निघून आलो. तेव्हापासून प्रमुख अतिथी पदाचा जो धसका मी घेतला. तो आजतागायत ! (काही दिवसांनी कळले की, 'पेटकर कम परीक्षक म्हणून हाताशी ठेवण्याकरिताच मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले होते म्हणून!)

Saturday, March 16, 2024

तू दिलेले दुःख....

राग_रंग (लेखांक ४३) राग धानी.

पूजाकोटिगुणं स्तोत्रं स्तोत्राकोटिगुणो जप:| जपात्कोटिगुणं गानं गानात् परतरं न हि || अर्थात, पुजेपेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ स्तोत्र,स्तोत्रापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ जप, आणि जपापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ 'गान'.गाना पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. धानी राग हा काफी थाटातून उत्पन्न झालेला अतिशय गोड राग आहे.भारतीय संगीतांर्गत येणाऱ्या रागांचे वर्गीकरण करण्यासाठी थाट अथवा मेल व्यवस्था करण्यात आली आहे.भारतीय संगीतांमध्ये सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र अशा प्रकारे एकूण बारा स्वरांचा प्रयोग केल्या जातो एका रागाच्या रचनेसाठी या बारा स्वरातील कमीत कमी पाच स्वरांचे असणे आवश्यक असते.संगीतांमध्ये थाट रागांच्या वर्गीकरणाची पद्धत आहे.सप्तकातील बारा स्वरामधील कर्मानुसार मुख्य सात स्वरांच्या समुदायाला थाट असे म्हणतात. यातूनच रागोत्पत्ती होते.थाटालाच मेल असेही म्हणतात. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये ७२ मेल प्रचलित आहे.उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र १०थाटांचाच प्रयोग केल्या जातो. याची सुरवात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी करून प्रचलित केले.(दहा ऐवजी आणखी एक-दोन थाट वाढविले असते तर प्रचलित दहा थाटात न बसणारे राग पण थाट पद्धतीत चपखल बसले असते.) सध्या राग वर्गीकरणाची हीच पद्धत प्रचलित आहे. कल्याण, बिलावल, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, तोड़ी आणि भैरवी... भातखंडेंजी द्वारा प्रचलित असलेले हेच ते दहा थाट होय.सर्व प्रचलित,अप्रचलीत रागांना या दहा थाटात सामील करून घेतले आहे. भारतीय संगीतांमध्ये त्या स्वरसमूहाला थाट म्हणतात ज्यात रागांचे वर्गीकरण केल्या जाऊ शकते,किंवा करतात.१५व्या शताब्दीच्या उत्तरार्धात 'राग तरंगिणी’ या ग्रंथाचे लेखक लोचन कवी यांनी राग वर्गीकरणाची पारंपरिक 'ग्राम आणि मूर्छना' पद्धतीमध्ये परिवर्तन करून मेल अथवा थाट पद्धतीची स्थापना केली.लोचन कविंच्या म्हणण्यानुसार त्या काळी सोळा हजार राग प्रचलित होते. यातील मुख्य असे राग ३६ होते.सतराव्या शताब्दीमध्ये थाटांर्गत रागांचे वर्गीकरण प्रचलित झाले होते. थाट पद्धतीचा उल्लेख सतराव्या शताब्दीतील ‘संगीत पारिजात’ आणि ‘राग विबोध’ नामक ग्रंथांमध्ये सुद्धा केल्या गेला आहे. लोचन द्वारा प्रतिपादित थाट पद्धतीचा प्रयोग जवळ-जवळ तीनशे वर्षांपर्यंत होत होता. एकोणविसाव्या शताब्दीच्या शेवटी व विसाव्या शताब्दीच्या सुरवतीच्या दशकात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी भारतीय संगीताच्या विखुरलेल्या सुत्रांना एकत्र करून अनेक सिद्धांतांमध्ये सुधारणा केली. भातखंडेंद्वारे निर्धारित दहा थातातील सातवा थाट काफी आहे. त्यातूनच उत्पन्न झालेला धानी राग एक चंचल प्रकृतिचा राग आहे.('चंचल प्रकृतीचा' म्हणजे काय ते कळले नाही.) यात ख्यालआणि विलंबित रचना गायिल्या जात नाही,असे म्हणतात. चंचल प्रवृत्तीमुळे मध्य व द्रुत लयीयील शृंगारिक व भक्तीरसपूर्ण रचना यात गायिल्या जातात. नेहमीप्रमाणे गोड लोकधून असलेल्या या रागाला शूद्र राग म्हटल्या जातो. (रागांचे मूळ असलेल्या लोकधूनांना शूद्र श्रेणीत ठेऊन कमी का लेखल्या जातात ते मला आजतागायत कळले नाही.)असो! या रागात कोमल गंधार एक अत्यंत प्रभावशाली असून न्यास स्वर आहे.हा स्वर या रागाचा केंद्रबिंदू आहे.तसेच कोमल निषाद सुद्धा न्यासाचा स्वर आहे.काही काळापूर्वी रिषभाला अवरोहात वर्ज न करता या रागाला औडव-षाडव जातीचा मानल्या जात होते.पण सद्य काळात रिषभ वर्ज्य करुन औडव-औडव जातिचा मानतात. तरी पण काही गुणिजन शुद्ध रिषभाचा प्रयोग करून धानी राग गाताना दिसतात.म्हणजेच हा राग आज दोन्ही प्रकारे गायिल्या जातो हेच सिद्ध होते.काफी थाटातील असल्यामुळे धानी गाताना खूप काळजी घ्यावी लागते.रिषभ,धैवत लागल्यास भीमपलासी व्हायला वेळ लागत नाही. अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळातर्फे दर वर्षी संगीत शिक्षक संमेलन घ्यायचे. अंदाजे १९७७/७८ वर्षी हे संमेलन अहमदाबाद येथे आयोजित केले होते.या संमेलनात एक बडा ख्याल गायिल्यानंतर पंडित गंगाधर तेलंग यांनी गायिलेल्या 'आंगनवा आये जोगी' या धानीतील बंदीशीने मी धानीच्या प्रेमातच पडलो.तो पर्यंत धानी हे नाव फक्त ऐकूनच होतो. ● चित्रपट गीते... 'चांद मध्यम है आसमा चुप है' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५). 'मेघा रे बोले घनन घनन' आशा,रफी. संगीत-उषा खन्ना.चित्रपट-दिल दे के देखो (१९५९). 'रात सुहानी झुमे जवानी' लता. चित्रपट-रानी रुपमती.संगीत-एस.एन. त्रिपाठी (१९५९). 'निगाहें न फेरो' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ब्लॅक प्रिन्स.संगीत-दुलाल सेन (१९५९) 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.संगीत-जयदेव (१९६१). 'कभी तनहाइयों में भी हमारी याद आयेगी' मुबारक बेगम.चित्रपट-हमारी याद आयेगी. संगीत-स्नेहल भाटकर (१९६१). 'ना ना ना रे ना ना हाथ ना लगाना, सुमन कल्याणपूर.चित्रपट-ताजमहाल. तिलक कामोद धानीचे मिश्रण (१९६३). 'रात भी है कुछ भिगी भिगी' लता.चित्रपट-मुझे जीने दो.संगीत-जयदेव (१९६३). तेरे हम ओ सनम तू जहां मैं वहां' रफी,सुमन कल्याणपूर.संगीत-सरदार मलिक.चित्रपट-बचपन. (१९६३).'ये खामोशियां ये तनहाईयां' आशा,रफी. चित्रपट-ये रास्ते है प्यार के. संगीत-रवी 'मुकद्दर आजमाना चाहता हूँ' रफी.चित्रपट-दूर की आवाज. संगीत-रवी (१९६४). 'मन मोरा नाचे तन मोरा नाचे' लता.चित्रपट-दो दिल.संगीत-हेमंत कुमार (१९६५). 'कुछ दिल ने कहां कुछ भी नहीं' लता.चित्रपट- अनुपमा. संगीत-हेमंत कुमार (१९६६) 'तडप ये दिन रात की' लता. चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन. (१९६६) 'भगवान ने अपने जैसा' लता. चित्रपट-छोटा भाई.(१९६६). 'खिलते हैं गुल यहां' किशोर-लता. संगीत-एस.डी. बर्मन.चित्रपट-शर्मिली (१९७१). 'बदन पे सितारे लपेटे हुए' रफी. चित्रपट-प्रिन्स.संगीत-शंकर जयकिशन (१९६९) 'तुम जो मिल गये हो तो ऐसा लगता है' रफी.चित्रपट-हंसते जख्म.संगीत-मदन मोहन (१९७३). 'पांव में डोरी' चित्रपट-चोर मचाये शोर. संगीत-रवींद्र जैन (१९७४). 'दिल में तुझे बिठाकर, कर लुंगी मैं बंद आंखे' चित्रपट-फकिरा.संगीत-रवींद्र जैन (१९७६). 'गोरी तेरा गांव बडा प्यारा मैं तो गया वारा आके यहां रे' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'आज से पहले आज से ज्यादा' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.संगीत-रवींद्र जैन (१९७७). 'आयी ना कुछ खबर मेरे यार की' (धानी आणि मधुकौंस रागाचे मिश्रण) किशोर,आशा,संगीत-बप्पी लहरी. चित्रपट-शराबी.(१९८४) ● नॉन फिल्मी... 'तुम कोलाहल कलह में' आशा.संगीत-जयदेव.(अनफरगेटेबल ट्रीट १९७१). 'साडे नाल वे'(छोटा ख्याल) गायिका-दृष्टी आणि स्निग्धा जहागीरदार.संगीत संयोजन-ओंकारनाथ हवालदार.(ताज फेस्टिव्हल). 'मुसफिर चलते चलते थक गया है' गझल.-गुलाम अली. ● मराठी... 'निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' संत गोरा कुंभारांचा हा अभंग अनेकांनी गायीला आहे.. 'अवघाची संसार सुखाचा करीन' (धानी व भीमपलासीचे मिश्रण) संगीत-मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.(संत ज्ञानेश्वरांचे हे पद १९३१ मध्ये कान्होपात्रा या संगीत नाटकात गोहरबाई कर्नाटकी आणि राजहंस यांनी सर्वप्रथम गायिले आहे.तसेच बाल गंधर्वांनी हे अधिक लोकप्रिय केले.) -----------------------------------------------------------------------

Saturday, March 9, 2024

राग-रंग (लेखांक४२) नंद

दो मध्यम अरु शुद्ध स्वर, गावत राग आनंद । थाट कल्याण षाडव संपूर्ण, प्रथम रात्री सुखचंद ।। एखाद्या चित्रपटातील गाण्यामुळे एखाद्या रागाची माहिती व्हावी म्हणून लेख लिहावासा वाटणे हे त्या चित्रपटगीताचे,त्या संगीतकाराने केलेल्या कामाचे श्रेय आहे असे मला वाटते.'मेरा साया' या चित्रपटातील 'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' हे ते गाणे होय. त्यावरून नंद रागावर लिहायची तीव्र इच्छा झाली. संगीतकार होते मदन मोहन.मदन मोहन यांची बहुतेक गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारित असायचीच.प्रत्येक रागातील स्वरांच्या आरोहावरोहाचा एक नियम असतो.आणि या नियमांना धरूनच संगीत रचना केल्या जातात.निदान पहिली ओळ तरी त्या रागाचे रूप दाखवीत असते.पुढे संगीतकाराचा कलाविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आयाम देत रचना खुलवित जातो.पाश्चात्य संगीतात याला "improvisation" असे म्हणतात. नंद हा राग कल्याणजन्य राग आहे,यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.जाती षाडव संपूर्ण असून गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.यालाच कुणी आनंदी, आनंदी कल्याण, नंद कल्याण असेही म्हणतात.हा राग बिहाग, गौड-सारंग ,हमीर, कामोद या रागांना अतिशय जवळचा आहे.सा ग म प नी सा,सां नी ध प...हे बिहाग अंग,अवरोहात सां ध नि प ध तीव्र म प ग...गौड सारंग अंग, ग म ध प...हमीर अंग, तीव्र म प ध तीव्र म प ग...कामोद अंग स्पष्टपणे दिसून येते.ह्या सुरावटी घेतल्यानंतर प्रत्येक वेळी 'ग म ध प रे सा' हे स्वर घ्यावेच लागतात.तेव्हा नंद राग स्पष्ट होतो. या रागाचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये अधिक प्रमाणात केल्या जातो. कल्याण परिवारातील शृंखलेतील आवडता राग म्हणून याचा उल्लेख करता येईल. हा राग ऐकणारे बरेच असतील पण गाणारे मात्र कमीच दिसून येतात. या रागाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रवाद आहेत.ते शोधणे कठीण आहे. तरी पण असे म्हणतात की,या रागाची कल्पना १९०० च्या दशकात सुचून प्रत्यक्षात आली असावी.कारण बऱ्याच कालावधीपासून मेहबूब खान (दरसपिया) द्वारा रचलेला विलंबित ख्याल 'ए बारे सैंय्या तोहे सकल बन ढूंढू' लोकप्रिय झालेला दिसून येतो. दरसपिया हे तानरसखान यांचे शिष्य व 'आफताब-ए-मोसिकी' फैयाज खान यांचे सासरे होते. त्या कालावधीमध्ये अत्रौली (जयपूर) घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक/वादकांमध्ये संगीत शास्त्रावर चर्चा होऊन विचारांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होती.या प्रक्रियेतूनच दरसपिया यांची रचना दोन्हीकडील उस्तादांनी आपापल्या घराण्याच्या यादीमध्ये सामील करून घेतल्यामुळे सर्वत्र पसरली.आज सर्वच घराण्यात या रागाला मान्यता आहे.आग्रेवाले उस्ताद विलायत हुसेन खान (प्राणपिया) द्वारा रचित सुरवातीची बंदिश 'अजहूँ न आए श्याम,बहुत दिन बीते' आजही लोकप्रिय आहे. 'जाने दो मुझे जाने दो' आशा भोसले. संगीत-आर.डी. बर्मन.गझल. 'धन्य तूचि कांता' नाट्यगीत,नाटक-अमृत सिद्धी.गायक-गंगाधर लोंढे. संगीत-मास्टर कृष्णराव. 'एन्ना पलिसु' enna palisu पं. भीमसेन जोशी. पुरंदरदासांच्या या रचनेची सुरवात नंद रागाने होते.पुढे विविध सुरावटी दिसतात. 'आनंद सुधा बरसे' नाट्यगीत.गायक- रामदास कामत, संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी.नाटक-मीरा मधुरा. 'पाखरा जा त्यजुनीय' नाटक-संगीत वाहिनी,मूळ गायक-पु.ल. आणि अर्चना कान्हेरे. संगीत-श्रीधर पार्सेकर. ----------------------------------------------------------------------------- 'दैनिक उद्याचा मराठवाडा', रविवार दि.१० मार्च २०२४

Saturday, March 2, 2024

राग-रंग (लेखांक ४१) राग हमीर.

कल्याणहिं के थाट में, दोनों मध्यम जान, ध-ग वादी-संवादि सों, राग हमीर बखान। हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.केदार, गौड़ सारंग, नंद हे राग अमूर्त श्रेणीत येतात.दिवसाच्या पाचव्या प्रहरी किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या दोन्ही मध्यम स्वर असलेल्या राग शृंखलेतील हा एक राग आहे.कल्याण थाटोत्पन्न या रागात तीव्र मध्यम स्वराचा अल्प प्रयोग केल्या जातो.तरी पण याचा थाट मात्र कल्याण! संस्कृत विद्वान यात तीव्र मध्यम घेण्याच्या विरोधात आहेत.(पण आज तीव्र मध्यम या रागाचे एक अंग बनला आहे.) ते याला बिलावल थाटोत्पन्न मानतात.कारण हा बिलावल रागाशी मिळता -जुळता आहे.आणि मला तरी हे तर्कसंगत वाटते.याचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.येथे सुद्धा राग गायन समय सिद्धांतानुसार विरोधाभास दिसून येतो.ज्या रागाचा वादी स्वर पूर्वांगात असतो तो राग समय सिद्धांतानुसार दुपारच्या बारा वाजल्यापासून मध्यरात्रीच्या बारा वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जायला हवा.याच प्रकारे उत्तरांगवादी राग उत्तरांगात म्हणजे मध्यरात्रीच्या बारा वाजल्यापासून दिवसा दुपारच्या बारा वाजेपर्यंत सादर व्हायला हवा.परंतू हमीर रागाचा वादी स्वर धैवत असूनही गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानल्या जातो.अशा प्रकारे सिद्धांत आणि व्यवहार परस्पर विरोधी दिसून येतो.याला अपवाद म्हणता येईल काय? 'हमीर कल्याणी' नावाचा दक्षिण भारतीय राग उत्तर भारतीय 'केदार' रागाशी मिळता जुळता आहे.त्याचा उत्तर भारतीय हमीर रागाशी काहीच संबंध नाही.दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये 'केदारम्' नावाचा वेगळा राग आहे.उत्तर हिंदुस्थानी पद्धतीमधील केदार,कामोद नी हमीर रागात बरेच साम्य आहे.केदारमध्ये मध्यम,कामोदमध्ये पंचम आणि हमीरमध्ये धैवत स्वर सगळ्यात प्रबळ आहेत.धैवत या रागाचा प्राण स्वर आहे.ज्यावर न्यास होतो. हा राग उत्तरांगप्रधान असल्यामुळे याचा विस्तार मध्य व तार सप्तकामध्ये खुलून दिसतो.याची विशेषता म्हणजे यातील धैवत निषदाला स्पर्श करून घेतल्या जातो.त्यामुळे गोडवा अधिक वाढतो.या रागातील सगळ्यात लोकप्रिय चित्रपटगीत 'मधूबन में राधिका नाचे रे' हे आहे.संगीताचे लक्ष रस-परिपाक हे असल्यामुळे गीत-वाद्य-गायन यांच्यातील पारस्पारिक सांमजस्य साधले की, 'मधूबन में राधिका' सारखे गाणे तयार होते.संगीतकार -गायक-वादक एकरूप झाले की रसमय वातावरणाची वृष्टी होते.त्यात मुख्यतः व्यष्टीला नसून समष्टीला प्राधान्य असते. सगळ्यांच्या सफलतेत प्रत्येकाची सफलता असते.कोणा एकाची त्यात महत्वपूर्ण नसते.सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न म्हणजे यश,सफलता होय. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आचार्य बृहस्पती यांच्या 'संगीत चिंतामणि' या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील एका समीक्षका बद्दलचा एक उतारा आहे,तो असा:- 'संगीत के उभरने के साथ शब्दार्थ पीछे छोड़ दिया जाता है, छोड़ दिया जाना चाहिए । संगीत को चाहिए कि उसे (शब्दार्थ को) खा जाए और शब्दार्थ को भी चाहिए कि वह खाया जाए ।('अनुपरागविलास', भूमिका, पृष्ठ १३) "जब आलोचकों का दृष्टिकोण यह हो जाए, तब संगीत की नैया का भगवान ही मालिक है। अमीर खुसरो या सदारंग यदि इस युग में होते, तो अवश्य ही पागल हो जाते। बंदिशों के साहित्य को भ्रष्ट करने का उत्तरदायित्व भी शब्दार्थ की ओर ध्यान न देनेवाले उस्तादों पर है। 'क्रमिक पुस्तक-मालिका' में संगृहीत, परंतु अर्थ की दृष्टि से अपूर्ण एवं भ्रष्ट बंदिशों के प्रचार का उत्तरदायित्व उस परंपरा के नेताओं पर है। इस युग में तो ऐसे व्यक्ति भी उस्ताद कहलाने लगे, जिन्होंने केवल मुखड़ा गाकर जीवन बिता दिया और नई पीढ़ी के मन में यह बात डाल गए कि न तो बंदिश की आवश्यकता है और न अर्थ की। तबले पर ठेका आरंभ कराकर 'आ, ई, ऊ, ओ' का आधार लो, बहलावे करो, तानें मारो, टीप पर खड़े न हो, गला बरावर हिलाते रहो, बस गवैए बन जाओगे। यही कारण है कि जो 'गाना' कभी बजाने और नाचने की अपेक्षा 'उत्तम' कहलाता था, उसकी 'रीढ़' ही गायब हो गई है। उसका अस्थिपंजर लुप्त हो गया है । सितार और सरोद के लोकप्रिय होने का कारण यह है कि इन्हें बजानेवाले आलाप में लय का ढोंग नहीं करते, जबकि गायक प्रायः आरंभ से ही तबले पर ठेका आरंभ करा देते हैं, उस ठेके की लय का गायक के तथाकथित विलंबित गान से कोई संबंध नहीं होता। 'तिरकिट' देखकर 'सम' आ जाना पर्याप्त समझा जाता है। 'लय' की डोर इस गाने में नहीं रहती । सितार या सरोद के 'जोड़' में ताल भले ही न हो, 'लय' रहती है, एक क्रम रहता है। ये लोग जव 'मसीतखानी' गत बजाते हैं, तब श्रोताओं के सम्मुख ठेका स्पष्ट रहता है, सितार वादक एवं सरोद-वादक तरह-तरह से बनकर आते हैं है। तबलेवाले तंत्री-वादकों के साथ बजाकर इस युग में यशस्वी और मुखड़ा पकड़ते हैं। हुए है। अच्छे तबला वादक अतिविलंबित प्रेमी गायकों को दूर से ही नमस्कार करना चाहते हैं। इस स्थिति की जिम्मेदारी भी 'उस्तादों' पर है । शब्द और अर्थ केवल गायक की संपत्ति थे। राग, ताल और लय तो बीन, सितार, सरोद और बाँसुरी में भी हैं। शब्द, अर्थ और लय की ओर जब गायकों ने ध्यान देना छोड़ दिया।प्रत्येक युग में मानव नवीनता की खोज में पागल रहा है, आज भी संगीत- जगत् में ऐसे व्यक्ति हैं, जो नए मार्ग की खोज में हैं, परंतु इनमें से अधिकांश ऐसे हैं, जिनमें पर्याप्त अध्ययन की कमी है, ये प्रचलित रागों में मनमाना उत्पात करके लोगों का ध्यान अपनी ओर आकृष्ट करते हैं। इनकी 'बंदिशों' की भाषा प्रायः अशुद्ध होती है, इनके द्वारा आविष्कृत राग सचमुच बीहड़ होते हैं। आज भारतीय संगीत को पुनः गंभीर चिंतन की आवश्यकता है । " 'मधूबन में राधिका नाचे रे' अशी गाणी लोकप्रिय होण्याची कारणे वरील उताऱ्यात नक्कीच मिळते.असो! हमीर रागातील काही लोकप्रिय चिजा... 'चमेली फूली चंपा' चीज-यशवंत जोशी,कुमार गंधर्व, शुभा मुद्‌गल,उल्हास कशाळकर वगैरे वगैरे,...'जा जा रे जा रे रंगरेज्या'-कुमार गंधर्व, 'ढीठ रंगरवा कैसे घर जाऊ'-पद्मा तळवलकर, 'मैं तो लागी रे तोरे चरनवा' -उस्ताद मुबारक अली खान, ● मराठी-हिंदी चित्रपट असो वा मराठी-हिंदी सुगम संगीत असो,यातील काही रचना सोडल्या तर बहुतेक स्वररचना संपूर्णतः एका विशिष्ट रागात बांधलेल्या नसतात.त्या पक्त 'त्या' रागावर आधारित असू शकतात.एखाद्या गीतात एकापेक्षा अनेक रागांच्या छटा पण दिसू शकतात. 'छेड दिए मेरे दिल के तार' उस्ताद अमीर खान,उस्ताद अमानत अली खान, चित्रपट-रागिनी, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५८). 'मधूबन में राधिका नाचे रे' रफी. चित्रपट-कोहिनुर, संगीत-नौशाद (१९६०). 'मैं तो तेरे हसीन खयालों में खो गया' रफी. चित्रपट-संग्राम, संगीत-चित्रगुप्त (१९६५). 'ए हौसला कैसे झुके' शफाकत अली.चित्रपट-डोर, संगीत-सलीम सुलेमान (२०२१). 'सूर की गती मैं क्या जानूं' मुकेश.(नॉन फिल्मी) संगीत-नरेश भट्टाचार्य. 'कोकिळा गा' आशा भोसले. चित्रपट-बायकोचा भाऊ, संगीत-वसंत प्रभू (या गीतात हमीर+केदार आहे.) (१९६१). 'हे जगदीश सदाशिव शंकर' नाट्यगीत. नाटक-कट्यार काळजात घुसली. 'नमन नटवरा विस्मयकारा' नांदी, नाटक-संगीत मानापमान. 'विमल अधर निकटी मोह हा पापी' नाटक विद्याहरण. (हे नाट्यगीत सुरेश हळदनकर यांनी लोकप्रिय केले.) 'हेतु तुझा फसला' मराठी नाटक संशयकल्लोळमधील गीत. ----------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.३/3/२०२४




संगीत आणि साहित्य :