Sunday, December 29, 2024
Saturday, October 26, 2024
बोलती डोळे...
जीव जडला प्रिये ...
सुखही दुरून गेले...
तेव्हा तुझ्यासवे मी मस्तीत गात होतो
तू सोडले मला अन् स्वरही विरून गेले
ठेवून या व्यथेला सुखही दुरून गेले
जे जे घडावयाचे ते ते घडून गेले
लवकरच रसिकांच्या सेवेत....
गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०२४...तीन गझला.
आसवांना टाळणे आता नको...
Tuesday, September 10, 2024
साहित्य वऱ्हाड' पुरस्कार...
Wednesday, August 21, 2024
यवतमाळ जिल्हा साहित्य सम्मेलन, अध्यक्षीय भाषण...
रविवार दि.१८ ऑगष्ट २०२४...
सर्वप्रथम वऱ्हाडी कवी सुहास राऊत आणि अशोक मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या संमेलनास माझ्या हार्दिक शुभेच्छा जाहीर करतो.
यवतमाळ जिल्ह्यात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.कारण यवतमाळ जिल्हा इतिहास संशोधक,साहित्यिक,
संगीतकार,लेखक,कवी यांची खाण आहे.इतकेच नव्हे तर राजकारण व समाजकारणातही यवतमाळ जिल्हा मागे नाही.आपल्या जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे.मुळात विदर्भ भूमीच फार प्राचीन आहे.महाभारतात उल्लेख असलेले रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर विदर्भात आहे.आणि अशा या विदर्भात आपले यवतमाळ आहे.
प्रत्येक शहराचा आणि जिल्ह्याचा अभ्यास करतांना किंवा त्याबाबत माहिती घेतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या त्या जिल्ह्याला शहराला एक इतिहास असतो. यवतमाळ शहराला देखील इतिहासाची अशीच किनार लाभलेली आहे. या भागाने अनेक राजे महाराजांचा उदयास्त पहिला आहे. मौर्य , सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव वगैरे वगैरे, अकबराच्या दरबारातील इतिहासकार अबुल फजल याने लिहिलेल्या 'आईना-ए-अकबरी' मध्ये 'यवत' चा उल्लेख आढळतो तो 'योत' असा अपभ्रंश होऊन.
पुढे १८५३ ला यवतमाळ जिल्हा ब्रिटीशांच्या सत्तेखाली आला.
१९०३ ला यवतमाळला हैदराबादच्या निजामाने करारावर घेतले होते. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
यवतमाळचे पहिले पत्रकार पृथ्विगीर हरिगीर गोसावी हे होते.त्यांनी 'हरिकिशोर' हे साप्ताहिक सुरू केले.पुढे चालून गोसावी आणि त्यांचा संप्रदाय' या शीर्षकाचा ग्रंथ लिहिला त्यामुळे यवतमाळच्या सुरुवातीच्या साहित्यिकांमध्ये यांचं नाव घेतलं जातं.
लोकनायक बापूजी अणे यांचं संस्कृत भाषेतील १२ हजार श्लोकांचं 'तिलकयशोर्णव' नावाचं तीन खंडात लिहिलेलं महाकाव्य आणि 'अक्षर माधव' त्यांच्या साहित्यसेवेची साक्ष देतं.
प्रसिद्ध संशोधक य. खु. देशपांडे यांनी इतिहास संशोधनासोबतच, सांकेतिक लिपीचा केलेला अभ्यास आणि 'महानुभावी मराठी वाङ्मय', 'राजे उदारामांचा इतिहास' हे ग्रंथ लिहिले आहे.
प्र. रा. देशमुख यांच्या 'ऋग्वेद आणि सिंधू संस्कृती' या मराठी व इंग्रजी भाषेतील आवृत्तीला देश-परदेशात लोकमान्यता मिळाली आहे.
प्रसिद्ध कवी,कादंबरीकार पांडुरंग श्रावण गोरे यांचे 'वाणीचा हुरडा' व 'बोबडे बोल' हे काव्य संग्रह आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिलेली 'कात टाकलेली नागीण' ही कादंबरी प्रसिद्ध आहे.वऱ्हाडी बोलीमध्ये विशेषत: वऱ्हाडी ठसक्यात जेव्हा वऱ्हाडी संस्कार, रूढी-परंपरा, भलावण तसेच वऱ्हाडी वातावरण सांगितले जाते,; तेव्हा वऱ्हाडी गीत तयार होते -' असं ते म्हणायचे.माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे घरी यायचे.त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे.
भाऊसाहेब पाटणकर हे यवतमाळातील गाजलेलं एक नाव आहे.त्यांचे 'दोस्तहो' आणि 'जिंदादिली' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.भाऊसाहेबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते.गणेशोत्सव,दुर्गोत्सवात आमचे कार्यक्रम व्हायचे.
यवतमाळात नाट्यचळवळ पण जोरात होती.मला आठवते त्या प्रमाणे आशाताई बर्वे या चळवळीच्या प्रमुख होत्या.त्यांनी बसविलेल्या 'दिवा जळू दे सारी रात' या नाटकाला मी संगीत दिले होते.दुसरे नाटक होते 'चांदणे शिंपीत जा' शिवाजी रंग मंदिर या संस्थेने बसविलेल्या या नाटकात 'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली' हे गाणे होते....ते गाणे पियानोच्या पार्श्वसंगीताससह रेकॉर्ड करायचे होते.यवतमाळात पियानो फक्त बिब्लिकल सेमीनरीमध्येच.म्हणून येथील चर्च मध्ये जाऊन माझ्या सहगायिका प्रमोदींनी मॅथ्यू यांच्या आवाजात रेकॉर्ड केले.
दिघेकर, हरीश मानधना,जयंत भट,राजा सराफ ,श्रीकृष्ण मिश्रा,प्रवीण जानी,शशी देशपांडे,अशोक एकबोटे,राजन टोंगो, रोहिणी टोंगो,शंकरराव सांगळे,स्नेहलता
बोबडे, बक्षी,अशोक आष्टीकर,महेश पटेल,गोपाळ पाटील,जयंत वर्मा,सुहास वराडपांडे, प्रशांत गोडे ,मुन्ना गहरवाल सतीश पवार ,अमित राऊत ,रवी ढगे ,अमर गुल्हाने, राजाभाऊ भगत, सदानंद देशपांडे ,
प्रशांत बनगिनवार ,काशिनाथ लाहोरे ,अजय शेटे हे चळवळीचे जुने नवे मानकरी.
शरच्चंद्र टोंगो हे ही यवतमाळचेच.आमचे ते 'सर' होते.त्यांची स्वीकार' कादंबरी व 'नव्या डहाळ्या, नवे खोपे' हे नाटक गाजले होते.
कासलीकर गुरुजी ,पनके गुरुजी,दादा पांडे यांनी यवतमाळातील संगीत क्षेत्र जिवंत ठेवून विद्यादानाचं फार मोठं कार्य केलं आहे.संगीत क्षेत्रातील माझी जडण-घडण वरील मंडळीमुळे व साहित्यिक जडण-घडण आदरणीय पांडुरंग गोरे काका,टोंगो सर, कळणावत सर यांच्यामुळे झाली आहे.आणि लेखक , कवी म्हणून घडविण्यात तरुण भारतचे संपादक मित्रवर्य स्व. वामन तेलंग यांचा फार मोठा वाटा आहे.
प्राचार्य राम शेवाळकर यांनी विपुल साहित्य निर्मिती केली ओजस्वी, प्रवाही, प्रबोधनपर आणि रसपूर्ण व्याख्यानांसाठी ते प्रसिद्ध होते.
'भाग्योदय कला मंडळ' संचालित यवतमाळातील पहिला आर्केस्ट्रा आम्ही १९६५ मध्ये स्थापन केला होता.या ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम विदर्भच नव्हे तर मराठवाड्यात सुद्धा गाजले होते.
प्रसिद्ध वऱ्हाडी कवी माझा जिवलग मित्र शंकर बडे याचं वऱ्हाडी कवितेच्या क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचा 'बॅलिस्टर गुलब्या' हा प्रहसनात्मक एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर गाजला.विशेष म्हणजे हे नाव आर्णीच्या एका कार्यक्रमा नंतर मीच ठरवून यावर एक लेख लोकसत्तामधून प्रसिद्ध केला होता.शीर्षक होते ' 'ब्यालिस्टर' शंकर बडे.
आर्णीला असताना माझ्या कवितांची सुरुवात विडंबन गीतांनी झाली.पुढे पुण्याला गेल्यावर नवीन काही सुचले की वृत्तबद्ध करून फेसबुकवर टाकायचो.तेथील प्रतिसाद माझ्यासाठी उर्जादायी ठरला, व तेथून माझ्या काव्यप्रवासाला सुरवात झाली.माझी पहिली रचना होती...
"सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी..."
नंतर षडाक्षरी,अष्टाक्षरी,कविता,गझल असे बरेच काही प्रकार उतरत गेले.
चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात
राबतो शेतात। सालोसाल...
जीवापलीकडे। मेहनत करी
तरीही भाकरी। मिळेचि ना...
ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी
लिही कादंबरी। मुंबईत...
वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा, कादंबरी, कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा मोठा विरोधाभास आहे!
"घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल
कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल"
शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती म्हणून संबोधणे हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम मी केले असावी असे मला वाटते. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती तशी 'कष्टवती' !
मी शेतकरी कुटुंबातील असून माझ्या आयुष्यातील बराचसा काळ ग्रामीण भागात गेला आहे.
अवघं लाघव हिरवं तुडुंब
द्यावी वाटे येथे मनालाही डूब
भरल्या शेताच दर्शन घडता
सृष्टीपुढे झुके आपसुक माथा
बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे.
"ना मी कृष्णा ना तू राधा
का व्हावी गे सावळ बाधा ?"
ही राधा-कृष्णाची प्रीत आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर मी कवितेत करतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार यावरील दोन ओळी बघा...
"ना महाभारत, न रामायण तरीही
जानकी अन् द्रोपदी लागे पणाला"
मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे असे तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू बनल्याचे कुठे कुठे दिसून येते.म्हणून जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे मला आवर्जून वाटते. शब्दाचे ऋण मानावे,
आकळेल अर्थ
घालता आवर्त
एका एका आर्त
शब्दाचा तो...
शब्दाचा तो भाव
समजून घेता
संपेल आर्तता
मनातील...
कविता,कथा, कादंबरी फक्त ग्रांथिक भाषेतच असावी असे काही नाही.ग्रांथिक म्हटल्या जाणारी भाषा बोलीतूनच जन्माला आली आहे.तिची श्रीमंती बोलीभाषेमुळेच वाढली व वाढत आहे. विदर्भाचाच विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात गमतीशीर असा थोडा फार फरक पडलेला दिसतो.आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते.
सर्वश्री द.बा. महाजन,बाबाजी दाते,आबासाहेब पारवेकर,बाबासाहेब घारफळकर,बळीरामपंत एकबोटे,,हरितक्रांतीची बीजे पेरणारे वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक,जवाहरलालजी दर्डा,भूगर्भ शास्त्रज्ञ वामनराव मेत्रे,सदाशिवराव ठाकरे,डॉ.भास्कर टेंबे, वा.ना.देशपांडे, दामले वकील,अरुण हळबे, डॉ.रमाकांत कोलते,शामा कोलाम,दीपक शिंदे,आजीबाई बनारसे,विदर्भवीर जांबुवंतराव धोटे,डॉ.बाबासाहेब नंदुरकर,दादासाहेब वगारे,मायदेवी भालचंद्र,डॉक्टर काणे,डॉ.शैलजा रानडे, गोविंद देशपांडे, गौतम सूत्रावे,माधव सरपटवार,शरद पिदडी, भाऊ मांडवकर, शिवा राऊत, दिनकर दाभाडे, मूळचे अकोल्याचे पण गेल्या चार वर्षांपासून पुसदवासी झालेले ज्येष्ठ गझलकार मित्र श्रीकृष्ण राऊत, दिलीप अलोणे, नीलकृष्ण देशपांडे, कलीम खान, मिर्झा रफी बेग, गजेश तोंडरे,रवी चापके, पुनीत मातकर, जयंत चावरे, विद्या खडसे, आनंद गायकवाड ,प्रा. सागर जाधव, सिध्दार्थ भगत,मसूद पटेल, गजानन वाघमारे सुरेश गांजरे, रमेश घोडे, विनय मिरासे,स्मिता गोरंटीवार, मीनाक्षी गोरंटीवार,आरती पद्मावार,कविता शिरभाते, निशा डांगे,अल्पना देशमुख - नायक, सोनल गादेवर,अशोक राणा, विवेक कवठेकर, नितीन पखाले, मोरेश्वर चरेगावकर, अजय देशपांडे, स्वानंद पुंड,अ.भा. ठाकूर,देवेंद्र पुनसे यांनी आपापल्या क्षेत्रात लक्षणीय काम करून यवतमाळ जिल्हा सर्व दृष्टीने संपन्न केला आहे.
संमेलन म्हणजे फक्त वाद नसतात, साहित्यातलं राजकारणही नसतं. मला वाटतं नवीन विचार पेरणारी प्रेरणास्थळं म्हणून आपण या संमेलनाकडे पाहावं. हा चष्मा सकारात्मकतेचा असला तरच पुढच्या काळात या मंथनातून साहित्यातील नव्या सृजनाचं 'अमृत' येणाऱ्या पिढीला मिळत राहते.एखाद्या लेखकाच्या लेखनउर्मीला ऊर्जा आणि लेखनविषयांना विविधता मिळण्यासाठी कर्तृत्ववान आणि सर्वमान्य असणाऱ्या असामान्य व्यक्तीने केलेले आवाहन महत्त्वाचा प्रेरणास्रोत ठरते.
आणि शेवटी....
हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे
कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे
सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे
मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे
हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे ?
-गझलगंधर्व सुधाकर कदम
Saturday, August 3, 2024
संध्येच्या शामल डोही
Thursday, July 25, 2024
कविता जगणारी माणसं ! भाग ३.
कविता जगणारी माणसं ! भाग २.
कविता जगणारी माणसं ! भाग १.
Wednesday, May 15, 2024
कं-दर्प
सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे.त्यामुळेच काल नाशिकला झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'कांद्यावर बोला' असे म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार समजल्या
जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.
१९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला होत्व. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.
कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी, वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा
कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.
दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.
कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?
-सुधाकर कदम
१६ मे २०२४
Sunday, May 12, 2024
मध्यस्थ...
चाटूगिरी या एका शब्दामुळे चाटू, चमचे, पळी, सराटा बगैरे सर्व चमचा-कुळातील वस्तूंच्या बाबतीत एक वेगळाच समज मानव प्राण्यांमध्ये तयार झालो आहे. ढवळाढवळ करणाऱ्या या वस्तूंना हीन लेखण्याचा माणसाचा प्रयत्न मुळातच निषेधार्ह आहे. खरे म्हणजे हात व ज्यात ढवळाढवळ करायची त्या वस्तूमधील मध्यस्थ म्हणजे चमचा-कुळ होय. पण माणसाच्या नको तिथे ढवळाढवळ करण्याच्या सवयीमुळे व नको तिथे 'चाटूगिरी' करण्याच्या पद्धतीमुळे या मध्यस्थांवर फालतूचे आरोप लागून बदनामी होत आहे. 'चाटणे' या शब्दावरून 'चाटूगिरी' हा शब्द आला असला, तरी गरम द्रावणात फिरवल्या जाणाऱ्या पळीलाच आजकाल चाटू म्हणायला लागल्यामुळे समस्त चमचावंशज अत्यंत नाराज झाले आहेत.वास्तविक चमचा-कुलोत्पन्न समस्त वस्तूंचे मानव जातीवर असंख्य उपकार आहेत. कारण खाद्यपदार्थ तयार करताना गरम गरम पदार्थांमध्ये फक्त हीच मंडळी ढवळाढवळ करू शकते. इतरांची बिशाद नाही. ही मंडळी नसती तर माणसांचे किती हाल झाले असते ! अन्न शिजतानाच या मंडळींचा उपयोग होतो असे नाही; आजकाल तर, जेवतानाही काटे-चमचे वापरण्याचा प्रकार रूढ होत चालला आहे. केळीच्या पानावरील गरमसूत जेवण जाऊन चिनीमातीच्या 'डीश' मधील अन्न काठ्या-चमच्याने खाण्यांचे दिवस आले आहेत.
तर अशा या हाता-तोंडाच्या मध्यस्थांवरून माणसातील मध्यस्थांना यांची नावे देणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का? आणि माणसातील मध्यस्थांनाही दोन्ही बाजूकडून चटके बसत नाही का? उलट हातातोंडातील मध्यस्थांना फक्त एकीकडचाच चटका बसतो. तोंड फुंकर मारायला तयार असतं. पण माणसातील मध्यस्थांना तर कोठून कसे चटके बसतील, हे सांगताच येत नाही. त्यातल्या त्यात लग्नातल्या मध्यस्थांबद्दल तर न बोललेलेच बरे !
कचेऱ्यांमध्ये सुद्धा अशा मध्यस्थांची फार गरज असते. 'बॉस' गरम असला की मध्यस्थच त्याला थंड करू शकतात. थंड करताना त्याला बॉसची स्तुती करावी लागते. नसलेल्या गुणांची तारीफ करावी लागते. पण म्हणून काय त्याला 'चमचा' म्हणायचे ? वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे, त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान हलविणे, भाजीपाला नेऊन देणे, सिगारेट पेटवून देणे, वाढदिवसाला घरची सर्व कामे करून भेटवस्तूही देणे, या माणूसकी, बंधुभाव, प्रेम, त्याग शिकविणाऱ्या गोष्टी अंगिकारल्याबरोबर त्याला चमचा, चाटू वगैरे उपमा देणे बरोबर आहे का ? उलट अशी माणसे आपल्याजवळ नसल्यामुळे आपले किती नुकसान होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा ! कारण बस, रेल्वेचे आरक्षण; शाळा-कॉलेजमधील प्रवेश, पुढाऱ्यांच्या भेटी, साहेबाकडील जिल्हा व तहसील कचेऱ्यातील काम, कोर्टातील व पोलिस ठाण्यातली कामे आणि काळ्या बाजारातील वस्तू वगैरे मिळवायला मध्यस्थाशिवाय पर्याय नसतो. 'अडत्या' नामक एक मध्यस्थ तर धान्यबाजारातील देवाप्रमाणे असतो. शेतकरी व खरेदीदार यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे हा मध्यस्थ ! पण ह्याला अडत्या किंवा दलाल असे म्हणतात. तर मंडळी! या मध्यस्थांशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. दिल्लीत तर ह्यांनाच पॉवर-ब्रोकरही म्हणतात. अशी एकूण वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात तर राजकारणी मंडळीत प्रत्येकागणिक एक दलाल म्हणजे मध्यस्थ आढळतो. एकूण झालेल्या खरेदीमध्ये मोठ मोठे मध्यस्थ दलाली खाताना दिसून आले आहेत. पण ही दलाली मात्र देशाच्या दृष्टीने घातक ठरून सरकारी तिजोरीला मोठे खिंडार पाडणारी ठरते. तसेच बँकांचे कर्ज न फेडता ते बुडवून पळून जाणारी मंडळी सुद्धा देशाची गुन्हेगार आहे.या लोकांना जेरबंद करून तो पैसा का वसूल केल्या जात नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.पण त्यासाठी लागणारा बुद्धिमान मध्यस्थ त्यांच्या जवळ नसल्यामुळे नुसताच प्रश्न उभा राहतो. आणि प्रश्न फक्त उभा राहून सुटत नसतो. तो सोडवावा लागतो. पण सोडवल्याही तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा सोडवणारी मंडळी 'चोर चोर मौसेरे भाई' नसतील तेव्हा ! राजकीय दूधभाऊ तर एका स्तनातले दूध तू पी. दुसऱ्या स्तनातले मी पितो, असे म्हणून देशाला शुष्क करीत असतात.
सध्या निवडणूक सुरू आहे.निकाला अगोदर मतदारांना पैसे देऊन फितविण्याऱ्या व निकाल लागल्यावर निवडून आलेल्यांची खरेदी-विक्री करण्याऱ्या राजकीय मध्यस्थांचा धंदा तेजीत येऊन त्यांची चांदीच चांदी होते!
खरे म्हणजे प्रगल्म लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून आपणच आपला डिंडीम पिटून, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी राजकीय दलालांच्या... माफ करा हं! राजकीय मध्यस्थांच्या हस्ते 'मतपरिवर्तन' (साम, दाम, दंड, भेदाने का होईना) करून आपणच आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा गळा घोटत असतो. षण राजकारण करायचे म्हटले की हे सर्व करावेच लागणार ! शेषन् सारखा मध्यस्थही जिथे हात टेकतो तिथे इतरांचे काय ?
राजकारणाचा धंदा बद करणारा, चाटूगिरीपासून पुढाऱ्यांना दूर ठेवणारा, कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणारा, भारताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्याला रोखणारा, सर्वसामान्य नागरिकांबद्दल आत्मीयता बाळगणारा मध्यस्थ या भारतवर्षी केव्हा जन्म घेईल कुणास ठाऊक!
Wednesday, May 8, 2024
सामना
Saturday, April 20, 2024
लोपला चंद्रमा...मराठी गझल.
Tuesday, April 16, 2024
आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज... डॉ.श्रीकृष्ण राऊत.
Friday, April 5, 2024
आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक ३०)
![]() |
पुण्यातील वारजे येथील माझ्या घरी शौनक अभिधेकींची प्रॅक्टीस..... |
![]() |
प्रकाशन सोहळा - डावीकडून गायिका अनुराधा मराठे,कवी/संगीतकार सुधीर मोघे,कवी गंगाधर महांबरे,अस्मादिक,गायक शौनक अभिषेकी. |
![]() |
'अर्चना' मधील भक्तीगीतांचे सादरीकरण... |
![]() |
रसिकांनी तुडुंब भरलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,पुणे. |
Wednesday, March 27, 2024
आठवणीगील शब्द स्वर (लेखांक २९)
. #प्र_मुख_पा_हुणा
माझ्या आयुष्यातील ३१ वर्षे आर्णी या गावी संगीत शिक्षक म्हणून गेली.या ३१ वर्षांत परिसरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना व अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळाचे परिक्षा केंद्र', नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय' कला मंडळ, संगीत प्रेमींसाठी 'सरगम', आमची शाळा माहुरच्या दत्त शिखराचे महंत दत्ताराम भारती यांच्यामुळे सुरू झाली म्हणून 'दत्त जयंती उत्सव समिती', 'तालुका पत्रकार संघ' 'शिवजयंती उत्सव समिती' 'शिवसेना शाखा' इत्यादींची स्थापना.समाजकारण,
पत्रकारिता,वर्तमानपत्रासाठी स्फुट लेखन,मराठी गझल गायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम, हिंदी/मराठी कवी संमेलने,गझल गायन स्पर्धा,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,विविध सांगीतिक कार्यक्रम अशी अनेक आयोजने वगैरे वगैरे उपद्व्याप केलेत.
कलाकारांच्या आयुष्यात कोणत्या वेळी कोणता अनुभव वाट्याला येईल हे सांगता येत नाही.वरील सर्व प्रकारांमुळे नावारूपास आल्यावर घडलेला एक किस्सा ऐकण्यासारखा आहे.एकदा एका महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावणे झाले. संगीतकारांनाही चांगले दिवस येत असल्याचे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! कार्यक्रमाच्या दिवशी मी छानसे कपडे घालून, अत्तर वगैरे फवारून समारंभस्थळी पोहचलो! तर अध्यक्षच बेपत्ता। एका तासाने अध्यक्ष आल्यावर उदघाटन सोहळा आटोपला. भाषणबाजी झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आयोजकांनी मला थांबवून भावगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून माझी पदावनती करून टाकली. थोडा राग आला पण म्हटले 'चलता है।' थोड्याच वेळात स्पर्धा सुरू झाली. पण हार्मोनियम वादक नदारद ! फक्त तबल्यावर गाणे कसे म्हणावे हा प्रश्न स्पर्धकाला पडला. तेवढ्यात आयोजक पुन्हा माझ्याकडे आले व हार्मोनियम वाजवायची विनंती करायला लागले. पण मला 'पेटकर' बनविण्याचा त्यांचा धूर्त बेत हाणून पाडून मी तेथून निघून आलो. तेव्हापासून प्रमुख अतिथी पदाचा जो धसका मी घेतला. तो आजतागायत ! (काही दिवसांनी कळले की, 'पेटकर कम परीक्षक म्हणून हाताशी ठेवण्याकरिताच मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले होते म्हणून!)