गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, January 14, 2026

मज कळले तू माझी...

 


मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर
तू माझ्या गगनातुन उल्केपरी  ढळल्यावर

कळत न ही आज कुठे वनवासी वाट वळे ?
स्वप्नाच्या सरितेवर ही कुठली लाट जळे ?
हरवुन संदर्भ उभे जळ कुठल्या वळणावर

डोळ्याचे डोह दोन भरून आज आलेले
अश्रूंच्या पावसात चांद्रबिंब न्हालेले
क्रुसावर सनईच्या चंद्रकौंस खिळल्यावर

अजून कापऱ्या जळात प्रतिबिंबित आठवणी
अजून विराणी तळात गात कुणी जलराणी
एक कहाणी विझली मूक नदी काठावर

● सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

● दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

#गीत#song#music#composition#sudhakarkadamscomposition#गीतकार#संगीतकार#कवी#कविता

सुरेश भटांच्या सहवासातील एक रात्र...


   मुक्काम पांढरकवडा, २६ डिसेंबर ८१ ची ती रात्र. दहा वाजले. स्थानिक पुरोगामी साहित्य कलासंघ द्वारा आयोजित '#रंग_माझा_वेगळा'... कृषी भवन श्रोत्यांनी गच्च भरलेले. सुरेश भटांचा रंग वेगळा आहे हे इथल्या रसिकांना केवळ वृत्तपत्रे वाचून ठाऊक होते. उत्कटता शिगेला पोचलेली. हारतुरे, परिचयादी उपचार घाईघाईने उरकण्यात आले.

मायभूमीला नतमस्तक होऊन #सुरेश_भटांनी रंग भरण्यास सुरूवात केली.

'जय जन्मभू जय पुण्यभू जय स्वर्गभू सुखदायिनी

जय धर्मभू जय कर्मभू जय वीर भू जय शालिनी।।


काश्मीरच्या छातीतुनी जखमा तुझ्या बघ वाहती

जय कोटी जय गणमानीनी जय सकल मानस मोहिनी।।


ऊंच स्वरः नीरव स्तब्धता, भारतमातेचे ते 'जयगान' भारतामाता तेजस्वी आहे: विजेसारखी प्रखर, ह्या काळोखी विश्वात ही मायभूमी 'सौदामिनी' आहे:


नाही बरे माझा तुझा जनती जिव्हाळा संपला

साध्या सुध्या शब्दात या, तू ओतिली मंदाकिनी।।


लगेच 'वय निघून गेल्या' ची खंत सुरेश भटांनी प्रदर्शित केली-


देखावे बघण्याचे वय निघून गेले

रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले


गेले ते उडुन रंग उरले हे फिकट संग

हात पुढे करण्याचे वय निघून गेले


रिमझिमतो रातंदिन स्मरणांचा अमृतघन

पावसात भिजण्याचे वय निघून गेले


हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण

झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले


आणि खरेच विसाण्याची गरज दिसू लागली. रंगावर भुलण्याची हात पुढे करण्याची, चेहऱ्यात जगण्याची, नावगाव पुसण्याची मजा काही 'और' असतेः परंतु नियती इथेही भींत बनते कालसीमेच्या रुपाने. म्हणूनच काही वेळासाठी सुप्रसिद्ध गायक #सुधाकर_कदम यांचेकडे व्यासपीठ सुपूर्दः-


'हा ठोकरून गेला, तो ठोकरून गेला

जो भेटला मला तो, वांधा करुन गेला


चाहूल ही तुझी की, ही हुल चांदण्याची? 

जो चंद्र पाहिला मी, तोही दुरुन गेला।


वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे

माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला


आपल्या मनाच्या वेशीवर आलेले आपलेच सवाल आपल्याच ओठात जेव्हा जिरतात, आपल्यालाच वगळून फुलांची दिंडी जेव्हा निघून जाते तेव्हा माणसे चलबिचल झाल्याशिवाय कसा राहणार? श्रोतृवृंदास चिंतनाच्या गर्तेत सुधाकर कदमाने आपल्या मधुर कंठाने अशाप्रकारे लोटले खरे आणि सुरेश भटांनी 'अजून काही' सांगण्यास सुरूवात केली-


'तुझ्था नभाला गडे किनारे अजून काही 

तिथेच जाऊन वेच तारे अजून काही


तसा न रस्त्यात, आज धोका मला परंतु

घरात येतात वाटमारे, अजून काही।


(वाटमाऱ्यांचा पद्यांश पुन्हा ऐकावासा वाटल्यावरुन श्रोत्यातून 'वन्स मोर'चा आवाज.)


करु नका एवढ्यात चर्चा पराभवाची 

रणात आहेत झुंजणारे, अजून काही

विझून माझी चिता युगे लोटले तरीही

विझायचे राहिले निखारे, अजून काही


सुखाव्या निवांत दारास आपण नको असलो तरीही व्यथांची काही दारे अजूनही सताड उघडी आहेत आणि दिशांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करुनही बंडखोर वारे वाहत असतातच. श्रोत्यांनी मनमुरादपणे दाद दिली.


परत एकदा सुधाकर कदम मुक्तीनाथाची भूमिका बजावतात पण 'भलत्याच वेळी लाजणं बरं नव्हें' चा इशारा देत


हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


एकमेकांचा जीव जाळणे, लाजणाऱ्याने जागणे बरं नव्हे असा सुरेश भटांचा हितोपदेश सुधाकर कदमाच्या सुरेल आवाजाने रसिकांची श्रृंगार मने चाळवून गेली.


हरवलेले सुगंधित क्षण पदरात बांधून व पूर्णिमेची चांदणी वेणीत माळून येण्याची प्रतीक्षा करता करताच आयुष्याच्या संध्याकाळची दुखद चाहूल रसिकांना स्पर्शन गेली.


जितके जगावयाचे, तितके जगून झाले 

फिरते उगीच जाते, जगणे दळून झाले 


तुमच्या खिशात ठेवा, तुमचे रुमाल कोरे

आत्ताच आसवांनी, डोळे पुसून झाले।


रसिकांच्या मनातील हुरहुर विरते न विरते तोच अध्यात्मिक तार्किक विद्रोहाची विषमतेची जाण उफाळून आली ती अशी-


शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला 

मशहूर ज्ञानया झाला, गोठ्यातच जगला हेला।

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना 

कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला?


जगण्याचे मद्य व जन्माची घूंद हवी असणाऱ्यांनी हृदयाचा फुटका पेला आपल्याच रवताने विसरले पाहिजेल असे सांगून परत सुधाकरांनी माईक घेतला...


चंद्र आता मावळाया लागला 

प्राण माझाही ढळाया लागला। 


ओठ ओठांना सतावू लागले 

श्वास गालाला छळाया लागला। 


तोच मी होतो गडे हा तोच मी

जो तुला आता कळाया लागला। 


लोकप्रिय व उत्साही माजी नगराध्यक्ष डॉ. धावडे यांच्या 'फरमाईश' वरुन उपरोक्त गझल गाण्यात आली:


चंद्र तसा तो मावळतीचा, आणि आता 'हा असा चंद्र'---


हा असा चंद्र, अशी रात फिरायासाठी 

तूच नाहीस इथे हात धरायासाठीं।


काय आगीत कधी आग जळाली होती?

लोक नेतील मला खोल पुरायासाठी।


नेहमीचेचे जुने घाव मोजायचे सोडून उभा जन्म चिरायासाठी सखीला 'ये गडे' म्हणताना टाळ्यांचा कडकडाट झाला. राग, रंग, रस, जीवनानूभती, इत्यादींवर आरुढ होतहोत 'रंग माझा वेगळा'चे प्रथम चरण संपले.


कार्यक्रमाच्या पूर्वाधातील कुणी काव्यांश गुणगुणत, कुणी त्यावर भाष्य करीत करीत या रसिकांनी सभागृहात पुनश्चप्रवेश केला आणि सुरेश भटांनी गझल रूपातील 'पूर्तना' ही कविता गाण्यास सुरूवात केली.


'पूर्तता माझ्या व्यथेची, माझी मृत्यूत व्हावी

जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी।

सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला

तारकांच्या मांडवाखाली, चिता माझी जळावी।


टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने कार्यक्रमाचा उत्तरार्ध प्रारंभ झाला आणि अत्यंत उंच आवाजात सिंहाच्या आरोळी समान सभागृह दणाणून गेले ते 'भीमवंदना 'ने-


भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना 

आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना। 

कोणते आकाश हे? तू अम्हा नेले कुठे?

तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?

या भरार्‍या आमुच्या, ही पाखरांची वंदना।

जाळले गेलो तरी सोडले नाही तुला

कापले गेलो तरी तोडले नाही तुला

मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना।


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनस्मृतीच्या वंदनेनंतर सुधाकर कदमांनी आपली गझल पेश केली अश्रूला जन्मभर नानाविध बहाणे सांगितले खरे परंतु फसव्या जिण्याचे दांभिकपण शिकता येऊ नये तर. आणि मग अशी 'रात्र'-


केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली 

मिटले चुकुनि डोळे, हरवून रात्र गेली।


अजून सुगंधी येई, खोलीत मोगऱ्याचा 

गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली। 


देहभान विसरून रसिक तल्लीन झालेले: साज, रसिकता शिखर गाठतागाठताच साऱ्यांची काळिजे चरचरुन जाणारी दुःखद बातमी श्रोत्यांपर्यंत येऊन थडकली. आणि साऱ्यांचच डोकं सुन्न झाले, अचानक कु. माया बोरेले निघून गेल्याची ती दुष्ट वाता ऐकून:


पायाशी लोळण घेणाऱ्या कांचनाला तिच्या सामाजिक व साहित्यिक मनोकामनेने केव्हाच ठोकरले होतेः माया कवयित्री होती. सुरेश भटांचेही मन हेलावून गेले. काही क्षण डोक्यावर हात ठेऊन स्तब्ध बसले आणि समारोप असा केला-


कुठलेच फूल आता मजला पसंत नाही 

कळते मला अरे हा माझा वसंत नाही। 

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला 

समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही।

मी रंग पाहिला या मुदांड मैफिलीचा

कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही।


-हरिश्चंद्र भेले याजकडून

दैनिक लोकमत, नागपूर



Monday, December 29, 2025

काळोखाच्या तपोवनातून

 


.                                -आस्वाद-

         #काळोखाच्या_तपोवनातही_प्रकाशाची_वाट...


           मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळण करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ #काळोखाच्या_तपोवनातून ” हा 

काव्य संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे  संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,

विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास  केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.माणसं माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाती सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत  असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.

त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते  लिहितात...


 'कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना

 अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना...'


      खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...


 'मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची

 काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा...'


      गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या  गंधीत आठवणी  असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून  कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना  कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..


मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे

फुलासारखी प्रसन्नताही तशीच आहे..


    माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात...


 'भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.

 पण गाळ अंतरीचा तो राहिला बिचारा...'


      माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात...


'आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.

नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते...'


      जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात...


 'हासुनी हसवायचा हा मंत्र घे

 दुःख का कुरवाळतो तू सांग ना!'


      आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात...


'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे...


      जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात


 'दीन दुःखितांना / मदत जे करी

 तेणे मुक्ती चारी / साधलिया...'


      माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून  एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..


 'कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना

 मिटवाया तृष्णा / निरागस...'


       जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.


 'सरणावरती चढतो जेव्हा

 कोणी नसते त्याच्या पाठी'


      आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात


'ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी

 लिही कांदबरी / मुंबईत...'


      माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे  ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..


 'ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी

 तयासी पाखंडी / म्हणावे गा...'


      व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी  निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.


◆ काव्य संग्रह : काळोखाच्या तपोवनातून

◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम #sudhakarkadam 

◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित #rampandit 

◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे #avinashwankhade 

◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659

◆पाने : ९६

◆मूल्य : १५० ₹


-संदीप वाकचौरे #sandipwakchaure 


संग्रह मिळवण्यासाठी तपशील -

किंमत रु. १५० + टपालखर्च ५० 

● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.

A/c no : 053312100004140

IFSE Code : BKID0000533



बँक ऑफ इंडिया,पुणे.

google pay - 8888858850

Friday, December 26, 2025

माझी शब्द स्वरसंपदा

                       


आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी/संगीतकार म्हणून 

#फडे_मधुर_खावया…  (नागपूरच्या दै.तरुण भारत वर्तमानपत्रामधील 'विषयांयर' या सदरातील खुसखुशीत स्फूट लेख).

#सरगम  (शालेय गीतांची स्वरलिपी).

#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा  व 

#काळोखाच्या_तपोवनातून  (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच 

#भरारी  (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट). 

#अर्चना  (भक्तिगीते), गायक-पं. शौनक अभिषेकी, अनुराधा मराठे.(टी सिरीज).

#खूप_मजा_करू  (बालगीते),(फाऊंटॆन म्युझिक कं), #काट्यांची_मखमल पहिला युगल गझलांचा अल्बम. गायक-पद्मश्री सुरेश वाडकर,वैशाली माडे.(युनिव्हर्सल म्युझिक कं). 

#तुझ्यासाठीच_मी...(मराठी गझल),गायिका-वैशाली माडे, ( युनिव्हर्सल म्युझिक कं).

#काट्यास_फूल_आले ....(मराठी गझल),गायक-मयूर महाजन, प्राजक्ता सावरकर शिंदे,गायत्री गायकवाड गुल्हाने.

#रे_मना...(मराठी गीत/गझल),गायक-मयूर महाजन,

प्राजक्ता सावरकर शिंदे.

 ह्या कॅसेट्स सीडीज (अल्बम) सोबतच #सुरेश_वाडकर, #मयूर_महाजन,#प्राजक्ता_सावरकर_शिंदे,#गायत्री_गायकवाड_गुल्हाने,#सावनी_सावरकर,#कल्पिता_उपासनी यांच्या आवाजात नव्याने स्वरबद्ध केलेली मराठी व उर्दू गीते/गझला युट्युब,स्पॉटिफाय या सारख्या विविध ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

वाडकरांच्या सौभाग्यवती #पद्मा_सुरेश_वाडकर व मुलगी #अनन्या_सुरेश_वाडकर यांच्या आवाजात हनीफ़ साग़रांच्या दोन उर्दू गझला नुकत्याच ध्वनिमुद्रित केल्या आहेत.येत्या महिनाभरात आपणास ऐकायला मिळतील.


        मी स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, प्राजक्ता सावरकर शिंदे,गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,

रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहे,गात आहेत.


       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,

वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही 

जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप 

पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.

रमण रणदिवे,सदानंद डबीर,ज्योती बालिगा राव,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,

मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,

बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,

प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल 

राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,

मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,राज यावलीकर,

किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी,डॉ.रामदास चवरे,

धुमाळ पिता-पुत्र,संदीप गावंडे व दस्तुरखुद्द अस्मादिकही आहेत.


        उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, हनीफ़ साग़र ,इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज़,मौलाना तारिक जमील,डॉ.दिलीप पांढरपट्टे, कलीम खान,प्रथम गिरीधारी,अनंत नांदूरकर या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत....

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना


#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४.रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७.गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.माझी गझल गुलबो-रविप्रकाश चापके

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-         "

५४.जळलो धुपापरी मी-                  "

५५.प्रतीक्षा पार्थना झाली-                "

५६.काट्यास फूलआले -                  "

५७.जो तो दिसावयाला दिसतो सुखात "

५७.असे पत्र आता तुला मी लिहावे-    "

५८.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

५९. राखून रीत आले-ज्योती बालिगा राव

६०. तुझे तुला जगायचे-सुधाकर कदम

६१. मज गायचेच आहे-          "

६२. संपली अजुनी कुठे ही रात सजणा-म.भा.चव्हाण

६४. ये न ये टिपूरसे चांदणे-ज्योती बालिगा राव

६५.वेदनेचा सूर-सुधाकर कदम

६६. एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-

६७.डोळे-बबन धुमाळ

६८. या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट

६९. रात गेली निघून पाऱ्याची-            "

७०.हा असा चंद्र अशी रात-                 "

७१. उमलून मी येऊ कशी-ज्योती बालिगा राव

७२. जे जे घडवयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम

७३. जीव जडला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ

७४. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

७५. उदंड ओसंडुनी कधी वावरता आले-शिवाजी जवरे

७६. एक भक्तिभाव आहे-मीनाक्षी गोरंटीवर

७७. शेवटी हे दुःख माझे -ज्योती बालिगा राव

७८. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

७९. चंद्र ताऱ्यात चर्चा अशी रातभर-घनश्याम धेंडे

८०. किती रुंजी तरी तिथल्या तिथे-समीर चव्हाण

८१. तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले-दिलीप पांढरपट्टे

८२. आसवांना टाळणे आता नको-                  "

८३.असेच जगलो झुगारले या जगास-              "

८४. प्रेम अपुले नवे नवे होते-                           "

८५. नुसत्याच तुझ्या हसण्याने-                         "

८६. आसवांना टाळणे आता नको-                    "

८७. कवटाळलेस तेव्हा अन् टाळतेस आता-        "

८८. कळे ना मला हा कसा नेमका तू-                 "

८९. दुपट्टा घसरणे-गंगाधर मुटे

९०.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

९१.शब्दांनाही सूर भेटता... चंदना सोमाणी


#मराठी_गीते


१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०.बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

४४.रे मना तुज काय झाले सांग ना-सुधाकर कदम

४५.काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर- "

४६.हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा-    "

४७.स्पर्शून एकदा तू केले मला ययाती-       "

४८.कशी वेदना विसरायाची सांग मला तू-   "

४९.जीवनाची एकतारी-                           "

५०.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी "

५१.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे-आशा पांडे

५३.काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम

५४. मज कळले तू माझी-उ.रा. गिरी

५५.तुझी सुवर्णाची आभा-डॉ.रामदास चवरे

५६. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा -राज यावलीकर

५७. ध्यास लागलासे मजला विठू माऊलीचा-       "

५८. जेव्हा मला कळेना तुझिया मनातले-संदीप गावंडे

५९- संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

६०. मन माझे-समीर चव्हाण

६१.  पाऊस असा घनघोर,नदीला पूर-अनिल कांबळे

६२. गुरू मायबाप,गुरू रूप संत-

६३. आभाळाचे गर्द निळेपण-गजेश तोंडरे


#उर्दू_ग़ज़ल


१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

१२.ना सही लब न खोलिए साहब-हनीफ़ साग़र 

१३.उनकी गलियों से उठाई है ग़ज़ल-अशोक अंजुम

१४.जब मेरी नजर आपके चेहरे पे पडी है-हनीफ़ साग़र 

१५.इतना मुझे चाहा करो ना-समीर चव्हाण

१७. मै के तनहाई की चादर तानकर-हनीफ़ साग़र 

१८. ये कैसी शाम है-दिलीप पांढरपट्टे

१९.दिन लगे है रात सा-        "

२०.देखते ही देखते ये क्या नजारा हो गया-    "

२१. जोगी,आवारा,मुसफिर बन गये-हनीफ़ साग़र 

२२. उस के मुह से झूट सच्चाई लगे-अनंत नांदूरकर

२३. फिर तेरी याद लौट आयी है-दिलीप पांढरपट्टे

२४. मेरी उम्रभर का रियाज़ था-मौलाना तारिक जमील

२५.कैसे कैसे लोग-बशर नवाज़

----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील '#नग़्म_ए_ग़ज़ल' आणि '#प्रसार_गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...


#उर्दू_ग़ज़ल


१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६

-------------------------------------------------------------------

●ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ मधील स्वररचना...(फेसबुक)


१.तुझे माझ्याजवळ असणे सुखद होते-विद्या देशपांडे

२.प्रेम होते कसे स्वप्न पडते कसे-संजय गोरडे

३.एखाद्या दुपारवेळी मी खिन्न एकटा असतो-प्रियंका गिरी

४.जे जे मला मिळाले साभार देत आहे-आशा पांडे

५.डोळ्यात आसवांना मी आणणार नाही-डॉ.मनोज सोनोने

६.भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला-अनिल जाधव

७.तुझ्या माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे-कविकुमार

८.केवढे झाले सहज जाणे तुझे-शरद काळे

९.नेहमी तुझ्याच आसपास मी-अश्विनी बोंडे

१०.ओठात नाव येता सांजावला शहारा-साईनाथ फुसे

११.अशा सांजवेळी दिवेलागणीला-सविता बन्सोड

१२.दिवस येतो दिवस जातो-डॉ.अविनाश सांगोलेकर

१३.वंचना जखमा जुन्या उसवून येते-अमिता गोसावी

१५.कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते-सचिन साताळकर

१६.आपण सारे इथे बुडबुडे-अशोक कुलकर्णी

१७.दुःखात का जीवाला झुरवत बसायचे-गौरी शिरसाट 

१८.एकरूप व्हायचे, प्रेमगीत गायचे-दीपाली वझे

१९.पुन्हा थांबेन जर ती यायची आहे-स्मिता गोरंटीवार

२०.झिजल्याशिवाय दरवळ नाही-मीनाक्षी गोरंटीवार

२१.दिशा शृंगारल्या होत्या हवा गंधाळली होती-प्रशांत वैद्य

२२.झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या-प्रतिभा सराफ

२३.दुःख माझे दूर करण्या धावते माझी गझल-प्रसन्नकुमार धुमाळ 

२४.सांग तुजला काय आता आठवाया लागले-सुधाकर इनामदार

२५.ऐक ना! बोलायचे राहून गेले-निर्मला सोनी

२६.कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला-अल्पना देशमुख नायक

२७.भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर-मसूद पटेल

२८.हळूच बोलणे तुझे तसे हळूच हासणे-हेमंत जाधव 

२९.तुला उगाच वाटते तुझ्याविना मरेन मी-दिवाकर जोशी

३०.मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती-वंदना पाटील वैराळकर

३१.मिठीत तुझिया येउन झाला निवांत वारा-डॉ.संगीता म्हसकर

३२.दुःख माझे तुला पण कळू लागले-भैय्या पेठकर

३३.अचानक जीभ ही अडते-अनिल पाटील 

३४.सांजकोवळी क्षितिजावरती-संजय इंगळे तिगावकर

३५.उदास झाले हसरे अंगण-व्यंकटेश कुलकर्णी

३६.केलेत केवढे तू उपकार काय सांगू-श्रीराम गिरी

३७.पुन्हा का तेच ते होते-कीर्ती वैराळकर

३८.तुझ्यावर भाळलेल्या वेदनांचे काय मग?-अंजली पंडित दीक्षित

३९.ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे-म्.भा.चव्हाण

४०.संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

४१.दूर तिथे घन बरसे हलकासा-सदानंद डबीर

४२.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

४३.रात गेली निघून पाऱ्याची-सुरेश भट

४४.मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर-उ.रा.गिरी

४५.आदिशक्ती तू,आई रेणुके-निलकृष्ण देशपांडे

४६.घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली-शिवा राऊत 

४७.भेटली तू मला वादळासारखी-श्रीकृष्ण राऊत 

४८.सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

४९.तुमने किया है प्यार-डॉ.प्यारेलाल श्रीमाल

५०.जो भी तेरी गली में आता है-हनीफ़ साग़र

५१.इल्म ऐसा वो सीखकर आया-अमित झा राही

५२.शाम होते ही सितारे भी चमक जाते है-सुधीर बल्लेवर 'मलंग'

५३.हो अगर दिल में उजाले तो ग़ज़ल होती है-एजाज़ शेख

५४.दिल तो टूटा है दिल लगाने से-उमाशंकर

Monday, December 15, 2025

माझेच गीत आले ...


     


या गझलच्या बंदिशचा बेस तसा #मधुवंती​ राग आहे.दादरा तालातील ही बंदिश शेवटच्या म्हणजे सहाव्या मात्रेपासून सुरू होते.सुरवातीच्याच 'काही' या शब्दातील 'का' या अक्षरावरील खटका ऐकणाऱ्यास आकर्षित करून घेतो.दुसरा मिसऱ्यातील 'माझेच गीत आले' यातील 'आले' या शब्दाला घेऊन तार रिषभावरून कोमल गांधारपर्यंत उतरतानाच्या सुरावटीत मधुवंतीमध्ये नसलेला कोमल (शुद्ध) 'मध्यम' आल्यामुळे शब्दासोबतच सुरावटही चमत्कृतीपूर्ण झाली आहे,तसेच 'पाळीत रीत आहे' या ओळीतील 'रीत' या शब्दावर कुठे कुठे कोमल मध्यम घेतल्यामुळे 'पटदीप' रागाचा पण भास होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या शेरात कोमल धैवतही अचानक हजेरी लावून गेल्यामुळे शेरांची रंगत वाढली आहे.दुसऱ्या शेरातील #मैफिलीचा​ शब्दावरील  वेगवेळ्या सुरावटी मूळ मधुवंती बाजूलाच ठेवतो.तरी पण पूर्ण बंदिश मधुवंतीच्या आसपास रुंजी घालताना दिसून येते.

【धून तयार झाल्यानंतरच हे विश्लेषण आहे.धून तयार होताना कोणत्या 'धुनकीत' असतो ते मलाही कळत नाही 😊.】

                   गझल

काहीं न बोलण्याची राखून रीत आले

माझ्या समोर आता माझेच गीत आले. 


एकेक घाव माझा आता भरून येई

हे कोण चांदण्याचे टाके भरीत आले


केलास का असा तू बेरंग मैफिलीचा

आता कुठे जराशी मीही लयीत आले


सांगू कशी तुला मी आले कुठून येथे

आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले


ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला

आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले

                         ■

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

कलंदर


 





संगीत आणि साहित्य :