गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, January 22, 2026

'कंपोझिशन्स'...२०२५/२६ की।


 रसिकहो,

मागील वर्षीची राहिलेली सर्व कामे या वर्षीच्या जानेवारीत पूर्ण होऊन नवीन कामाला फेब्रुवारीमध्ये सुरवात करीत आहे.

जानेवारीमध्ये पूर्ण झालेली कामे...

१.उर्दूचे प्रसिद्ध शायर हनीफ़ साग़र यांच्या चार गझला:-

गायक-सुरेश वाडकर,पद्मा वाडकर,अनन्या वाडकर आणि रेणू चव्हाण.

२.दोन मराठी गझला:-गझलकार मनोहर रणपिसे,समीर चव्हाण.गायक-सुरेश वाडकर,मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे.

३.दोन मराठी गीते:-कवी-डॉ रामदास चवरे,सुधाकर कदम.गायक-सुरेश वाडकर आणि मयूर महाजन.


●वरील सर्व रचना मास्टरिंग झाल्यानंतर युट्युबला आपण ऐकू शकाल.

-----------------------------------------------------------------------

२०२६ मध्ये करावयाची कामे...

१.दोन उर्दू गझला:-शायर-सहदेव रामटेके.

गायिका-प्राजक्ता सावरकर शिंदे आणि अनन्या वाडकर.

२. तीन मराठी गझला:-गझलकारा-विजयलक्षमी वानखेडे.गायक-सुरेश वाडकर.

३. तीन मराठी गीते:-कवी-राज यावलीकर, डॉ रामदास चवरे,सुधाकर कदम.गायिका-वैशाली सामंत, प्राजक्ता सावरकर शिंदे आणि अभेद शौनक अभिषेकी.

आग जो दिल में लगी है....


हनीफ़ साग़र साहब की एक ग़ज़ल #पद्मा_सुरेश_वाडकर की आवाज़ में जल्द ही आपकी ख़िदमत में...

                कल ज़माने को उजालों की ज़रुरत होंगी

                दिल में चिंगारी मुहब्बत की दबी रहने दो

पत्थरों आइना लगता है वो...


हनीफ़ साग़र साहब की यह ग़ज़ल जल्द ही आपकी ख़िदमत में.

                   कोई मोसम हो ख़िज़ाँ बरसात धूप

                   फूल के जैसा खिला लगता है तू...

Sunday, January 18, 2026

ज़िंदगी एक रंजिशें कितनी...हनीफ़ साग़र.


    पद्मश्री  सुरेश वाडकरजी की पुत्री अनन्या वाडकर की आवाज़ में,पुणे के मशहूर शायर मरहूम हनीफ़ साग़रजी की एक उर्दू ग़ज़ल अभी अभी रेकॉर्ड की है।.मिक्सिंग,मास्टरिंग के पहले एक शेर आपकी खिदमत में पेश है.... 

चंद सांसें गुज़ारने के लिए

कितने अरमान ख़्वाहिशें कितनी

मेरी दुनिया में गर्दिशें कितनी

ज़िंदगी एक रंजिशें कितनी

Thursday, January 15, 2026

आर्णीतील (यवतमाळ)उपद्व्याप..


      आर्णीला नोकरी (१९७२)  तर मिळाली.पण घर मिळणे कठीण होऊन बसले होते.संगीतवाले म्हणजे बँड, तमाशेवाले असा काहीतर समज आर्णीकरांचा होता.आणि तो संयुक्तिक असावा.कारण त्यावेळी वीस हजार लोकवस्तीच्या या गावात बाराही महिने तमाशाचा फड ठिय्या देऊन असायचा.

कशी-बशी एक खोली मिळाली.पण मालक इतका कटकट्या होता की, छोटे अडॅप्टर लावून ट्रान्झिस्टर रेडिओ लावला तर इलेक्ट्रीक बिल वाढते म्हणून ओरडायचा. मी यवतमाळात जरी मस्ताडलेला प्राणी होतो तरी आर्णीत मात्र मास्तर असल्यामुळे गोगलगाय झालो होतो.पहिली दोन वर्ष मला कठीण गेली. पण नंतर लक्षात आले की येथे शेर नाही तर सव्वाशेर झाल्याशिवाय काही आपला निभाव लागणार नाही.म्हणून मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.प्रथम संगीत विद्यालय सुरू केले.

नंतर संगीत विद्यालयातर्फे छोटे-मोठे सांगीतिक कार्यक्रम केले.संस्थाध्यक्ष चितघनानंदजी भारती नाटकाचे शौकीन होते.त्यांना मला घेऊन संत दामाजी हे नाटक बसवायचे होते.या नाटकात ते बिदरच्या बादशहाचे पात्र करून मला दामाजीपंत बनवणार होते. परिसरात भारतीजींचा रुबाब एखाद्या बादशहापेक्षा कमी नव्हता.पण त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नाटक काही रंगमंचावर आले नाही.

        छोट्या-मोठ्या सांगीतिक कार्यक्रमामुळे आर्णी व परिसरातील संगीत प्रेमी हळू हळू माझ्याशी जुळायला लागले.तसेही रोजच्या शालेय प्रार्थना,१५ ऑगष्ट,२६ जानेवारीच्या कार्यक्रमातील सहभागामुळे माझ्याबद्दल गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला लागला होता.शाळेत मी अत्यंत कडक होतो.पण शाळेच्या बाहेर 'मऊ मेणहूनी...'! गावातील काही संगीत प्रेमींच्या सहकार्याने साहित्य,संगीताच्या जोपासनेसाठी 'स्वर-गंगा' ही संस्था स्थापन करून शाळेच्या विज्ञान विभागाच्या हॉल मध्ये छोटे-मोठे कार्यक्रम घेणे सुरू केले.या उपक्रमा करीता शाळेतील संगीत प्रेमी शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक स्व.शंकरराव बुटले गुरुजींचे मोलाचे सहकार्य मिळत होते.वरील सगळ्यांच्या सहकार्यामुळे अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख स्व.पंडित बाळासाहेब कासलीकर,नागपूर आकाशवाणीचे तार शहनाई वादक स्व.बाबासाहेब देशपांडे, कविवर्य स्व.सुरेश भट,दैनिक तरुण भारतचे संपादक स्व.वामन तेलंग,विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार स्व.आप्पामार्जिने, कवी स्व.शंकर बडे, प्रा.श्रीकृष्ण राऊत,मिराताई ठाकरे,नारायण कुळकर्णी कवठेकर,हास्य सम्राट फेम मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी यांचे कार्यक्रम आयोजित करता आले.बरीच नावे आता आठवत नाही. तसेच सिंधुताई सपकाळ, विसुभाऊ बापट यांचे, आमच्या शाळेसह आर्णीच्या विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करून आर्थिक मदत मिळवून दिली आहे.या वेळी प्रत्येकाचा मुक्काम माझेकडेच असायचा.सिंधुताई सपकाळ तर अनेकदा आर्णीला येऊन गेल्या.(त्या वेळी त्या सेलिब्रेटी नव्हत्या.) आणि जितके दिवस कार्यक्रम असेल तितके दिवस त्यांचा मुक्काम माझ्याकडे असायच्या. सुलभा सगळ्यांची आवभगत अगदी जिव्हाळ्याने करायची.

        पण गावातील लोकप्रियता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन असो की, १५ ऑगस्ट,२६ जानेवारी असो माझा वावर आणि सहभाग लक्षणीय असायचा. त्यामुळे मुख्याध्यापक,संस्थाध्यक्ष यांची माझ्याशी विशेष जवळीक असायची.या सगळ्यामुळे काही शिक्षकांच्या पोटात दुखायला लागले.व त्यांच्या 'काड्या' सुरू झाल्या.त्यावेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये असल्यामुळे कार्यक्रम सुरूच असायचे.मी आर्णीला आणि ऑर्केस्ट्रा ग्रुपयवतमाळला.

ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती त्या काळात शाळा करून बाहेरगावचे कार्यक्रम करणे किती जिकरीचे असेल हे वाचक जाणू शकतील.मग कधी कधी सलग कार्यक्रम असले की,शाळा संपल्याबरोबर यवतमाळ गाठणे.तेथून भाड्याच्या बसने कार्यक्रमाचे गाव गाठणे,कार्यक्रम करून वापस यवतमाळ व सकाळची पहिली बस पकडून आर्णी...सरळ शाळेत.जागरणामुळे डोळे लाल असायचे.नेमके हेच पकडून पर्यवेक्षकाने 'कदम सर माझ्याकडे लाल डोळे करून बघतात',अशी तक्रार मुख्याध्यापकांकडे करणे,शाळेपेक्षा कार्यक्रमाकडे त्यांचे लक्ष असते, तासिकांवर उशिरा जातात,

शिक्षक कक्षात झोपतात वगैरे वगैरे बालिश तक्रारी सुरू झाल्या.परंतू मुख्याध्यापक (स्व.शंकरराव बुटले) व संस्थाचालक (स्व.राजकमलजी भारती) माझी ससेहोलपट बघत असल्यामुळे, तसेच शाळेचा नावलौकिक वाढत असल्यामुळे  त्यांच्याकडे तक्रार गेल्यावर दुर्लक्ष करायचे.       

      (१९८० नंतर "सुधाकर कदम,आर्णी" एवढ्या पत्यावर माझी पत्र यायची.ती आजही माझ्याकडे आहेत.यात माझा मोठेपणा दाखविण्याचा उद्देश नसून वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवणे एवढाच आहे.)

       १९७२ ते २००३ या ३१ वर्षांच्या कालखंडात मी आर्णीत बरेच उपदव्याप केलेत.गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना, इयत्ता १ ते १० वीच्या पाठयापुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून 'झुला' नामक कॅसेटची तीन भागात निर्मिती, शाळेत 'दत्त जयंती उत्सव समिती', गावात 'शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवजयंती उत्सव साजरा करणे',विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धा,मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, आकाशवाणी सांस्कृतिक संध्या, नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय कला मंडळ','शिवसेनेची स्थापना', 'पत्रकार संघाची स्थापना', 'मराठा सेवा संघ',' वृक्षारोपण कर्यक्रम',वऱ्हाडी कवी संमेलन, हास्य-व्यंग (हिंदी) कवी संमेलन वगैरे वगैरे...या सगळ्या उपदव्यापात आर्थिक गणित मात्र 'व्यस्त' असायचे.त्यामुळे बायको 'त्रस्त' असायची. पण या व्यस्त-त्रस्ततेची झळ तिने मला कधीच लागू दिली नाही.

-----------------------------------------------------------------------

● गांधर्व संगीत विद्यालयाच्या वार्षिकोत्सव प्रसंगी आयोजित हास्य-व्यंग कवी संमेलनातील कवींचे स्वागत करताना मी... डावीकडे खाली बसलेले, सुप्रसिद्ध मंच संचालक व कवी किरण जोशी,  ज्यांचे स्वागत करीत आहे ते डॉ.नीरज व्यास,कमल सागर आणि एकदम उजवीकडे, प्रसिद्ध हास्य-व्यंग कवी एहसान कुरेशी.

आणि बाकी उदव्याप....




















Wednesday, January 14, 2026

मज कळले तू माझी...

 


मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर
तू माझ्या गगनातुन उल्केपरी  ढळल्यावर

कळत न ही आज कुठे वनवासी वाट वळे ?
स्वप्नाच्या सरितेवर ही कुठली लाट जळे ?
हरवुन संदर्भ उभे जळ कुठल्या वळणावर

डोळ्याचे डोह दोन भरून आज आलेले
अश्रूंच्या पावसात चांद्रबिंब न्हालेले
क्रुसावर सनईच्या चंद्रकौंस खिळल्यावर

अजून कापऱ्या जळात प्रतिबिंबित आठवणी
अजून विराणी तळात गात कुणी जलराणी
एक कहाणी विझली मूक नदी काठावर

● सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

● दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

#गीत#song#music#composition#sudhakarkadamscomposition#गीतकार#संगीतकार#कवी#कविता

सुरेश भटांच्या सहवासातील एक रात्र...


   मुक्काम पांढरकवडा, २६ डिसेंबर ८१ ची ती रात्र. दहा वाजले. स्थानिक पुरोगामी साहित्य कलासंघ द्वारा आयोजित '#रंग_माझा_वेगळा'... कृषी भवन श्रोत्यांनी गच्च भरलेले. सुरेश भटांचा रंग वेगळा आहे हे इथल्या रसिकांना केवळ वृत्तपत्रे वाचून ठाऊक होते. उत्कटता शिगेला पोचलेली. हारतुरे, परिचयादी उपचार घाईघाईने उरकण्यात आले.

मायभूमीला नतमस्तक होऊन #सुरेश_भटांनी रंग भरण्यास सुरूवात केली.

'जय जन्मभू जय पुण्यभू जय स्वर्गभू सुखदायिनी

जय धर्मभू जय कर्मभू जय वीर भू जय शालिनी।।


काश्मीरच्या छातीतुनी जखमा तुझ्या बघ वाहती

जय कोटी जय गणमानीनी जय सकल मानस मोहिनी।।


ऊंच स्वरः नीरव स्तब्धता, भारतमातेचे ते 'जयगान' भारतामाता तेजस्वी आहे: विजेसारखी प्रखर, ह्या काळोखी विश्वात ही मायभूमी 'सौदामिनी' आहे:


नाही बरे माझा तुझा जनती जिव्हाळा संपला

साध्या सुध्या शब्दात या, तू ओतिली मंदाकिनी।।


लगेच 'वय निघून गेल्या' ची खंत सुरेश भटांनी प्रदर्शित केली-


देखावे बघण्याचे वय निघून गेले

रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले


गेले ते उडुन रंग उरले हे फिकट संग

हात पुढे करण्याचे वय निघून गेले


रिमझिमतो रातंदिन स्मरणांचा अमृतघन

पावसात भिजण्याचे वय निघून गेले


हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण

झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले


आणि खरेच विसाण्याची गरज दिसू लागली. रंगावर भुलण्याची हात पुढे करण्याची, चेहऱ्यात जगण्याची, नावगाव पुसण्याची मजा काही 'और' असतेः परंतु नियती इथेही भींत बनते कालसीमेच्या रुपाने. म्हणूनच काही वेळासाठी सुप्रसिद्ध गायक #सुधाकर_कदम यांचेकडे व्यासपीठ सुपूर्दः-


'हा ठोकरून गेला, तो ठोकरून गेला

जो भेटला मला तो, वांधा करुन गेला


चाहूल ही तुझी की, ही हुल चांदण्याची? 

जो चंद्र पाहिला मी, तोही दुरुन गेला।


वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे

माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला


आपल्या मनाच्या वेशीवर आलेले आपलेच सवाल आपल्याच ओठात जेव्हा जिरतात, आपल्यालाच वगळून फुलांची दिंडी जेव्हा निघून जाते तेव्हा माणसे चलबिचल झाल्याशिवाय कसा राहणार? श्रोतृवृंदास चिंतनाच्या गर्तेत सुधाकर कदमाने आपल्या मधुर कंठाने अशाप्रकारे लोटले खरे आणि सुरेश भटांनी 'अजून काही' सांगण्यास सुरूवात केली-


'तुझ्था नभाला गडे किनारे अजून काही 

तिथेच जाऊन वेच तारे अजून काही


तसा न रस्त्यात, आज धोका मला परंतु

घरात येतात वाटमारे, अजून काही।


(वाटमाऱ्यांचा पद्यांश पुन्हा ऐकावासा वाटल्यावरुन श्रोत्यातून 'वन्स मोर'चा आवाज.)


करु नका एवढ्यात चर्चा पराभवाची 

रणात आहेत झुंजणारे, अजून काही

विझून माझी चिता युगे लोटले तरीही

विझायचे राहिले निखारे, अजून काही


सुखाव्या निवांत दारास आपण नको असलो तरीही व्यथांची काही दारे अजूनही सताड उघडी आहेत आणि दिशांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करुनही बंडखोर वारे वाहत असतातच. श्रोत्यांनी मनमुरादपणे दाद दिली.


परत एकदा सुधाकर कदम मुक्तीनाथाची भूमिका बजावतात पण 'भलत्याच वेळी लाजणं बरं नव्हें' चा इशारा देत


हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


एकमेकांचा जीव जाळणे, लाजणाऱ्याने जागणे बरं नव्हे असा सुरेश भटांचा हितोपदेश सुधाकर कदमाच्या सुरेल आवाजाने रसिकांची श्रृंगार मने चाळवून गेली.


हरवलेले सुगंधित क्षण पदरात बांधून व पूर्णिमेची चांदणी वेणीत माळून येण्याची प्रतीक्षा करता करताच आयुष्याच्या संध्याकाळची दुखद चाहूल रसिकांना स्पर्शन गेली.


जितके जगावयाचे, तितके जगून झाले 

फिरते उगीच जाते, जगणे दळून झाले 


तुमच्या खिशात ठेवा, तुमचे रुमाल कोरे

आत्ताच आसवांनी, डोळे पुसून झाले।


रसिकांच्या मनातील हुरहुर विरते न विरते तोच अध्यात्मिक तार्किक विद्रोहाची विषमतेची जाण उफाळून आली ती अशी-


शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला 

मशहूर ज्ञानया झाला, गोठ्यातच जगला हेला।

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना 

कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला?


जगण्याचे मद्य व जन्माची घूंद हवी असणाऱ्यांनी हृदयाचा फुटका पेला आपल्याच रवताने विसरले पाहिजेल असे सांगून परत सुधाकरांनी माईक घेतला...


चंद्र आता मावळाया लागला 

प्राण माझाही ढळाया लागला। 


ओठ ओठांना सतावू लागले 

श्वास गालाला छळाया लागला। 


तोच मी होतो गडे हा तोच मी

जो तुला आता कळाया लागला। 


लोकप्रिय व उत्साही माजी नगराध्यक्ष डॉ. धावडे यांच्या 'फरमाईश' वरुन उपरोक्त गझल गाण्यात आली:


चंद्र तसा तो मावळतीचा, आणि आता 'हा असा चंद्र'---


हा असा चंद्र, अशी रात फिरायासाठी 

तूच नाहीस इथे हात धरायासाठीं।


काय आगीत कधी आग जळाली होती?

लोक नेतील मला खोल पुरायासाठी।


नेहमीचेचे जुने घाव मोजायचे सोडून उभा जन्म चिरायासाठी सखीला 'ये गडे' म्हणताना टाळ्यांचा कडकडाट झाला. राग, रंग, रस, जीवनानूभती, इत्यादींवर आरुढ होतहोत 'रंग माझा वेगळा'चे प्रथम चरण संपले.


कार्यक्रमाच्या पूर्वाधातील कुणी काव्यांश गुणगुणत, कुणी त्यावर भाष्य करीत करीत या रसिकांनी सभागृहात पुनश्चप्रवेश केला आणि सुरेश भटांनी गझल रूपातील 'पूर्तना' ही कविता गाण्यास सुरूवात केली.


'पूर्तता माझ्या व्यथेची, माझी मृत्यूत व्हावी

जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी।

सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला

तारकांच्या मांडवाखाली, चिता माझी जळावी।


टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने कार्यक्रमाचा उत्तरार्ध प्रारंभ झाला आणि अत्यंत उंच आवाजात सिंहाच्या आरोळी समान सभागृह दणाणून गेले ते 'भीमवंदना 'ने-


भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना 

आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना। 

कोणते आकाश हे? तू अम्हा नेले कुठे?

तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?

या भरार्‍या आमुच्या, ही पाखरांची वंदना।

जाळले गेलो तरी सोडले नाही तुला

कापले गेलो तरी तोडले नाही तुला

मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना।


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनस्मृतीच्या वंदनेनंतर सुधाकर कदमांनी आपली गझल पेश केली अश्रूला जन्मभर नानाविध बहाणे सांगितले खरे परंतु फसव्या जिण्याचे दांभिकपण शिकता येऊ नये तर. आणि मग अशी 'रात्र'-


केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली 

मिटले चुकुनि डोळे, हरवून रात्र गेली।


अजून सुगंधी येई, खोलीत मोगऱ्याचा 

गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली। 


देहभान विसरून रसिक तल्लीन झालेले: साज, रसिकता शिखर गाठतागाठताच साऱ्यांची काळिजे चरचरुन जाणारी दुःखद बातमी श्रोत्यांपर्यंत येऊन थडकली. आणि साऱ्यांचच डोकं सुन्न झाले, अचानक कु. माया बोरेले निघून गेल्याची ती दुष्ट वाता ऐकून:


पायाशी लोळण घेणाऱ्या कांचनाला तिच्या सामाजिक व साहित्यिक मनोकामनेने केव्हाच ठोकरले होतेः माया कवयित्री होती. सुरेश भटांचेही मन हेलावून गेले. काही क्षण डोक्यावर हात ठेऊन स्तब्ध बसले आणि समारोप असा केला-


कुठलेच फूल आता मजला पसंत नाही 

कळते मला अरे हा माझा वसंत नाही। 

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला 

समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही।

मी रंग पाहिला या मुदांड मैफिलीचा

कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही।


-हरिश्चंद्र भेले याजकडून

दैनिक लोकमत, नागपूर







संगीत आणि साहित्य :